पहिले पान | कोलाज | इथे चमत्कार नव्हे, माणसं घडतात!

इथे चमत्कार नव्हे, माणसं घडतात!

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image मुक्तांगणची येरवड्यातील वास्तू Facebook this story प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा

‘व्यसनमुक्त समाजनिर्मिती हे आमचे ‘स्वप्न’ आहे,’ या ध्येयातून 29 ऑगस्ट 1986 रोजी पुण्यातील येरवडा भागात सुरू झालेलं‘मुक्तांगण’हे व्यसन मुक्ती केंद्र आज रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. व्यसनमुक्तीच्या कामाची निराळी पद्धत राबवणा-या, पेशंटला केंद्रस्थानी मानणा-या या केंद्राच्या आजवरच्या वाटचालीचा हा आढावा..

 

मला दारूचं व्यसन होतं. मी एका कंपनीत कामाला होतो, पण दारूच्या व्यसनामुळे माझी तब्येत खूप ढासळली. परिणामी मला व्हीआरएस घ्यावी लागली. मुक्तांगणमध्ये दाखल झाल्यावर एकाच अ‍ॅडमिशनमध्ये माझं व्यसन सुटलं. तरीही मी मुक्तांगणच्या संपर्कात होतो. डे केअर विभागात जाऊन- येऊन काम करत असे. त्यात काही दिवस काम केल्यावर मला सुनंदा मॅडमनी विचारलं की, तू आता आमच्याबरोबर काम करावंस असं मला वाटतं. मग मी रिसेप्शन काउंटरवर काम करू लागलो.’’

- प्रकाश वायंगणकर, रिसेप्शनिस्ट, मुक्तांगण

‘‘मी मूळचा ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथचा. पण गेली 18 वर्ष पुण्यात राहतोय. ऐंशीच्या दशकात ब्राऊन शुगरची लाट आली होती. त्यातला मी एक बळी. माझं मल्टीअ‍ॅडिक्शन होतं. ब्राऊन शुगर.. त्याची पूर्तता झाली नाही तर झोपेच्या गोळ्या.. मग दारू , चरस-गांजा..ही सर्व व्यसनं 1992 पर्यंत सुरू होती. पहिली दोन-तीन वर्षे मी जे कमवायचे त्यातून भागत होतं, पण जसजसा व्यसनावरला खर्च वाढला तसतसा मी गुन्हेगारीकडे वळलो. खिसे कापू लागलो. मग जेल, लॉकअप अशा फे-या झाल्या. काही दिवस मेंटल हॉस्पिटलला अ‍ॅडमिट होतो. पण व्यसन काही सुटत नव्हतं. 89 मध्ये मला ठाणे-मुबंई-रायगड या जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आलं. माझ्यावर केस होत होत्या. एखादी खोटी जरी असली तरी मी गुन्हा कबूल करून टाकत होतो. कारण जेलमधून कोर्टात लवकर नेत नाहीत. शिवाय मला सोडवायला कुणी येत नव्हतं. जेलबाहेर गेल्यावर परत व्यसन सुरू व्हायचं. मग 92 मध्ये मी मुक्तांगणमध्ये आलो. वर्षभरानंतर चमत्कार झाला. माझे घरचे सगळेच मला भेटायला आले. दुस-या वाढदिवसाला पुण्यातल्याच एका मुलीशी मी मुक्तांगणमध्ये लग्न केलं. 93 पासून मुक्तांगणमध्येच काम करायला लागलो. सुरुवातीला किचनमध्ये काम करत होतो, पण मग केवळ अनुभवाच्या जोरावर काउन्सिलर म्हणून बढती झाली. ’’  

- दत्ता श्रीखंडे, काऊन्सिलर, मुक्तांगण

‘‘मी पुण्यातला रिक्षा ड्रायव्हर. व्यसनात अनेक वर्षे बुडून गेलो होतो. रिक्षाची विल्हेवाट लागली होती, माझी पत्नी मला सोडून गेली होती. समाजापासून मी खूप दूर गेलो होतो. माझे वडील सबइन्सपेक्टर म्हणून रिटायर झाले होते. त्यांची पेन्शन तुटपुंजी असल्याने तेही मला सांभाळायला तयार नव्हते. माझे सगळे भाऊ चांगल्या लायनीला गेले होते, माझा एकटय़ाचाच ट्रॅक चुकला होता. नातेवाइकांच्या लग्नाला, एवढंच काय पण मयतीलाही मी दारू पिल्याशिवाय जात नव्हतो. अशा परिस्थितीत 87 मध्ये मी मुक्तांगणमध्ये जॉइन झालो. माझा व्यसनमुक्तीचा पहिला वाढदिवस मुक्तांगणमध्ये साजरा करण्यात आला. त्या दिवशी रस्त्यानं चालताना मला जग जिंकल्याचा आनंद झाला! मग मी दिवसभर मुक्तांगणमध्ये आणि संध्याकाळी मॅडमसोबत त्यांच्या मदतीला गाडीखान्यातल्या दवाखान्यात जाऊ लागलो. त्या वेळी मला पु.ल. आणि सुनीताबाई 100 रुपयांचा चेक देत. माझ्यासारख्या बेवड्याला मुक्तांगणने आत्मसन्मान मिळवून दिला.’’  

- अशोक पवार, काउन्सिलर, मुक्तांगण

मुक्तांगण हे राज्यातलं पहिलंच व्यसन मुक्ती केंद्र. ते सुरू कसं झालं याची कहाणीही थोडीशी गंमतीशीर आहे. अनिल अवचट त्या वेळी सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते, सामाजिक प्रश्नावर लिहीत होते; तर डॉ. सुनंदा (अनिता) अवचट येरवडा मेंटल हॉस्पीटलमध्ये सायकॅट्रिस्ट म्हणून काम करत होत्या. त्या वेळी व्यसनी व्यक्तीवर उपचार करण्याची खास अशी काही पद्धत नव्हती. उपचार म्हणजे त्याला सरळ मेंटल हॉस्पिटलला पाठवणे. तिथे काही उपचार नव्हते. ते फक्त झोपेच्या गोळ्या द्यायचे. थेरपी वगैरे काही नव्हती. तसे पेशंट येरवड्याच्या रुग्णालयात भरती व्हायचे. पण यांच्यावर वेगळ्या पद्धतीने उपचार केले पाहिजेत, यांना इथं ठेवणं बरोबर नाही असं सुनंदा अवचटांना वाटत असे. दरम्यान त्यांच्या मैत्रिणीचा मुलगाच गर्दच्या विळख्यात सापडला. मग सुनंदाताईंनी त्याच्यावर घरीच उपचार सुरू केले. तो ब-यापैकी बाहेर आल्यावर अनिल अवचट त्याला फिरायला नेऊ लागले. त्यातून त्यांना या व्यसनाबाबत माहिती झाली.

तोवर त्यांना वाटायचं की, हे श्रीमंतांचं व्यसन आहे, आपल्याला काही देणंघेणं नाही. सामाजिक प्रश्न असेल तर आपण त्याकडे लिहिण्यासाठी बघू. पण गरीब लोकांमध्येच- कामगार, रिक्षा ड्रायव्हर, कचरा वेचणारे-यांच्यामध्येच हे व्यसन जास्त आहे हे समजल्यावर अवचटांनी त्यावर लिहायचं ठरवलं. आधीगर्दलेखमाला प्रसिद्ध झाली. ती वाचून लोक त्यांच्याकडे जायला लागले. मग अवचट पती-पत्नी खात्री करून त्या पेशंटना ससूनकडे पाठवायचे. पण ससूनच्या लोकांनी एक-दोन दिवसांतचआमच्याकडे पाठवू नकाअसं सांगितलं. मग करायचं काय? दरम्यान गर्द पु. लं. नी वाचलं होतं. त्यानं ते खूप अस्वस्थही झाले होते. त्यांना ही हकिकत समजली. मग त्यांनी अवचट पती-पत्नीला बोलावून घेतलं. ते म्हणाले, यांच्यासाठी तुम्ही काहीतरी सुरू करा. पैशाला आम्ही कमी पडू देणार नाही.

येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये डॉ. सुनंदा अवचटांकडे अल्कोहोलिक पेशंट यायचे. तेव्हा सुनंदाताईंना वाटायचं की, या लोकांना इथं ट्रीटमेंट देणं काही बरोबर नाही. कारण एक दारूचं व्यसन सोडलं तर ते तसे नॉर्मल असायचे. परंतु त्यांच्यासाठी दुसरी कुठलीच सोय उपलब्ध नव्हती.

पु. लं. च्या आश्वासनानं सुनंदाताईंना हुरूप आला. मेंटल हॉस्पिटलच्या आवारात एक वापरात नसलेली इमारत होती. तिथे मुक्तांगण सुरू करायचं ठरलं. मग सरकारी परवानग्या वगैरे सुरू झाल्या. सरकारने ब-याच अटी लादल्या, पण एकदाची परवानगी दिली अन् मुक्तांगण सुरू झालं.

सुनंदाताई सायकॅट्रिस्ट असल्या तरी व्यसन मुक्ती केंद्र चालवण्याचा त्यांच्याकडे कुठलाच अनुभव नव्हता आणि अशा प्रकारच्या कामाची त्यांना माहितीही नव्हती. त्यावर त्या म्हणायच्या, गरज आहे, करायचं. आपल्याला जे ज्ञान नाही ते पेशंटकडून शिकायचं.आणि खरोखरच पेशंटकडून त्या प्रत्येक गोष्ट शिकत गेल्या. त्या येणा-या पेशंटला विचारात, तुझ्यासाठी काय झालं असता तुझं व्यसन सुटेल? त्यांचं हे शिकणं कधी थांबलं नाही. आपल्या पेशंटविषयी कमालीची आत्मीयता आणि त्याला विश्वासात घेणं हा त्यांचा मूलमंत्र होता. त्याविषयी अनिल अवचटांनी एका लेखात म्हटले आहे,‘‘एक उद्योगपती त्यांच्या अ‍ॅडिक्ट मुलाला अ‍ॅडमिट करायला आले. ते सुनदाला सांगू लागले, याला हे सांगा, ते सांगा. सुनंदा त्यांना म्हणाली,त्याला काय सांगायचं ते मला कळतं, मी जेव्हा तुम्हाला काही विचारेन, तेव्हा तुम्ही सांगा. ते चमकलेच. त्यांच्या आक्रमकतेला असं कुणी अडवलं नव्हतं; पण हे ऐकणारा तिचा पेशंट मात्र खूश झाला, की तो सुनंदाचा भक्तच झाला. सुनंदाला कुठल्याही उच्च पदस्थाचं कधी दडपण येत नसे. एकदा एक खासदार बाई त्यांच्या मुलाला दाखल करायला आल्या. बरोबर इथल्या अ‍ॅडिशनल कमिशनरना घेऊन आल्या. त्या बोलत सुटल्या. सुनंदानं त्यांना थांबवले. म्हणाली,हे तुम्ही आधी सांगितलं आहे. काही नवीन असलं तर सांगा. त्या एकदम थांबल्याच. नंतर सावरून शेजारच्या कमिशनरना म्हणाल्या, बघा, आमचं राजकारणी लोकांचं असंच असतं. बोलतच राहतो; पण कोणी अडवत नाही. या बाईंनी हे केलं नसतं, तर समजलं नसतं. तिच्यामध्ये गरीब-श्रीमंत असाही कधी वागण्यात फरक पडत नसे. ज्याला कोणी नाही त्याला तर ती अधिक जवळ करीत असे.’’

एक पेशंट दहा-बारा वेळा अ‍ॅडमिट झाले. नंतरनंतर त्याला मुक्तांगणमध्ये अ‍ॅडमिट करायला घरचे वैतागायचे. पण सुनंदाताई मात्र शांत असायच्या. त्या म्हणायच्या, तो दमतोय का मी दमतेय ते मी बघणार. तोपर्यंत मी त्याला उपचार देणार. शेवटी त्या पेशंटने हार मानली. नंतर तो अतिशय चांगला राहिला. या उलट एखादा पेशंट परत पिऊन यायचा, तेव्हा त्या त्याला म्हणायच्या, हरकत नाही. आपलं मागच्या वेळेला काय चर्चा करायचं राहिलंय. आपण परत चर्चा करू. ही तुझी पहिलीच अ‍ॅडमिशन आहे, असं समजू. हे लोक चुकताहेत, वाईट वागताहेत या दृष्टीनं त्यांनी कधी पेशंटकडे पाहिलं नाही.

सुनंदाताईंनी एक उपचाराची पद्धत शोधून काढली, ती फॉलो करणारा स्टाफ तयार केला. तोही नव्वद टक्के मुक्तांगणमध्ये व्यसनमुक्त झालेल्या लोकांमधूनच. शिक्षण कमी असलं तरी ती इथं आडकाठी ठरत नाही. कामावर निष्ठा आणि निष्ठेनं काम हाच प्राधान्यक्रम मानला जातो. आता सुनंदाताई नाहीत, तरीही मुक्तांगणचे काम याच पद्धतीने चालले आहे. त्याविषयी अनिल अवचट म्हणतात, ‘‘आम्हाला फक्त मुक्तांगण चालवायचं होतं. लोक म्हणत होते, तुमचं सेंटर बंद पडणार. कारण डॉक्टरच्या नावावर दवाखाने चालतात. हासुद्धा सुनंदाचा एक प्रकारे दवाखाना होता. पण तसं काही झालं नाही. तिच्या काळात पेशंटला जी आत्मीयता मिळायची, जो अनुभव मिळायचा तसाच आताही मिळेल अशा जिद्दीनं आम्ही मुक्तांगण चालवलं. त्यामुळे अनेक पेशंट सांगतात, आम्हाला जावंसं वाटत नाही. ते येतात तेव्हा त्यांना इथं थांबायचं नसतं. ते पळून जायचे प्रयत्न करतात. खूप आरडाओरडा करतात. ते एका आठवड्यानंतर शांत होताना आम्ही पाहतो. जाताना त्यांचा पाय निघत नाही, याचा अर्थ सुनंदानं घालून दिलेला रस्ता नीट आहे.’’

1997 साली डॉ. सुनंदा अवचटांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यानंतर मुक्तांगणच्या ट्रस्टींनी मुक्ता पुणतांबेकर यांच्यावर उपसंचालक म्हणून जबाबदारी सोपवली. मुक्ताताई सांगतात, आईबरोबर मला चार वर्षे काम करायला मिळालं. सुरुवातीचे एक-दोन महिने तर मी फक्त तिच्या रूममध्ये बसून ती रुग्णांशी कसं बोलते, कसं वागतं हे शिकू लागले. मला तिचा काम करतानाचा उत्साह बघायला खूप आवडायचं, ती आजारी असली तरी. आमच्याकडे जे रुग्ण मित्र येतात. त्या प्रत्येकाला एकच गोष्ट खूप वेळा सांगायला लागते. आई पहिल्या पेशंटशी ज्या उत्साहाने बोलायची त्याच उत्साहाने ती शेवटच्या पेशंटशीही बोलायची. ती याबाबतीत दमायची नाही. मी तिला एकदा विचारलं, तुला कसा एवढा उत्साह? तेव्हा ती म्हणाली, तो माणूस हे पहिल्यांदाच ऐकतोय याचं भान मला ठेवावं लागतं. आईच्या अशा छोट्या छोट्या गोष्टींतून मी खूप शिकत गेले.’’

 मी कधीच लीडर नव्हते. आय वाज ऑलवेज फॉलोअर. पण ती लीडरशिप माझ्यावर पडली. असं मुक्ताताई म्हणत असल्या तरी ही लीडरशिप त्या उत्तम प्रकारे निभावत आहेत.

2000 साली मुक्तांगण येरवडय़ाच्या जागेतून प्रतीकनगरातल्या स्वत:च्या स्वतंत्र वास्तूत गेलं. सध्या मुक्तांगणमध्ये एका वेळी 120च्या आसपास रुग्ण असतात. त्यातील सत्तर टक्के दारूचे असतात. पूर्वी ब्राऊन शुगरचे 80 टक्के आणि दारूचे 20 टक्के असायचे. आता ते उलट झालं आहे. सध्या मेडिसिनल अ‍ॅब्यूजचं प्रमाण खूप वाढतंय. औषधांचा दुरुपयोग केला जातो. हे प्रमाण बायकांमध्येही वाढतंय. व्हाइटनर आणि इंटरनेटचेही व्यसनी असतात. या वर्षात मुक्ताताईंनी इंटरनेटचे व्यसन असलेल्या तिघांवर उपचार केले. फक्त जुगाराचे व्यसन असलेले पेशंट येतात; पण यातल्या 90 टक्के लोकांना निकोटीनचंही व्यसन असतं.

ज्याचा त्या लोकांना अजिबात सिरिअसनेस वाटत नाही.

आतापर्यंत मुक्तांगणने 18,500 पेशंटवर उपचार केले आहेत. मुक्तांगणकडून प्रेरणा घेऊन दुसरीकडे सुरू झालेलीही काही व्यसनमुक्ती केंद्रे आहेत. नागपूरला मुक्तांगणचा पूर्वीचा एक पेशंटच केंद्र चालवतो आहे, महेश फडणीस हेही ठाण्यानजीक, कळवा इथं केंद्र चालवत आहेत.  शिवाय अशा प्रकारचे काम जे करू इच्छितात, त्यांना प्रशिक्षण देण्याचंही काम मुक्तांगणमध्ये केलं जातं. महाराष्ट्राखेरीज छत्तीसगड, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात या राज्यांतल्या 92 केंद्रांना असं प्रशिक्षण देणारी संस्था, म्हणूनही मुक्तांगण कार्यरत आहे.

मुक्तांगणचा 18,500 हा आकडा महाराष्ट्राच्या तुलनेत लहान असला तरी एका संस्थेसाठी तो खूप मोठा आणि आश्वासक आहे. आजकाल व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे. अ‍ॅडिक्ट असणा-यांची मोठी फौज तयार होते आहे.मुक्तांगणत्यातल्या काहींनाच दुरुस्त करू शकते. अनिल अवचटांच्या भाषेत सांगायचं तर हे गणित कायमच विसंगत दिसणार. या परिस्थितीत आम्ही काय करू शकतो? जो माणूस अडकला आहे, त्याला मदत करणं हे आमचं काम आहे. नुसतं कामच नाही तर स्वप्न आणि ध्येयही. मुक्तांगण सुरू झाले तेच मुळी व्यसन मुक्त समाज निर्मिती हे आमचे स्वप्न आहे या ध्येयातून. गेल्या पंचवीस वर्षातली मुक्तांगणची त्या वाटेवरील कामगिरी कौतुकास्पद म्हणावी अशीच आहे.

शकुनाचे पेशंट

मुक्तांगणच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मेंटल हॉस्पिटलच्या रिक्रीएशन हॉलमध्ये चालला होता. डॉ. सरदेसाई, बाबा आमटे आणि पु. ल. पाहुणे म्हणून आले होते. त्याविषयी अनिल अवचटांनी स्थानिक वर्तमानपत्रात लेख लिहिला होता. तो वाचून एका शाळेतल्या शिक्षिकांनी एका शिपायाला आणलं. तो म्हणत होता, मी घरी सांगितलं नाही. त्या म्हणाल्या, आम्ही सांगू. तो शिपाई म्हणजे मुक्तांगणचा पहिला पेशंट, महादेव घारे. त्यांचाही व्यसनमुक्तीचा रौप्यमहोत्सव साजरा होतोय. सुनंदा अवचट त्यांना शकुनाचे पेशंट म्हणायच्या. ते आजतागायत व्यसनमुक्त आहेत. ते अजूनही मुक्तांगणमध्ये येतात. मागच्या सोमवारी मुक्ता पुणतांबेकरांनी त्यांना मुद्दामहून बोलावलं, आता अ‍ॅडमिट असलेल्या लोकांशी बोलण्यासाठी. ते आता सगळ्यांसाठी एक रोल मॉडेल आहेत.

महादेव घारे मागच्याच वर्षी रिटायर झाले. त्यांच्यावर खूप संकटं आली. त्यांची राहती झोपडी अतिक्रमणात उठवली गेली. मुलीचं लग्न करून दिलं तर जावईच गेला. असे सगळे प्राब्लेम येऊन सुद्धा ते आजतागायत व्यसनमुक्त आहेत. ते फार शिकलेलेही नाहीत. ते म्हणतात, मी मोठ्या मॅडमना (सुनंदा अवचट) शब्द दिला होता की, मी आता व्यसन करणार नाही. तो शब्द मला पाळला पाहिजे. या त्यांच्या प्रतिक्रियेवर मुक्ता पुणतांबेकर उत्तरतात, अशिक्षित पेशंटची रिकव्हरी आम्हाला जास्त चांगली दिसते. ते विश्वास टाकतात, श्रद्धा ठेवतात, शब्द देतात. जास्त शिकलेले असतात ते थोडे विश्वास टाकायला काचकूच करतात.

कमावती सहचरी! 

19 फेब्रुवारी 1997 ला डॉ. सुनंदा अवचटांचे निधन झाले आणि 10 मार्चला मुक्तांगणचा सहचरी ग्रुप सुनंदाताईंच्या स्मृत्यर्थ सुरू झाला. या ग्रूपमध्ये पीडित स्त्रिया एकत्र जमतात, शेअरिंग करतात. त्यातून त्यांना मानसिक आधार मिळतो. मात्र तीन -चार वर्षानी त्या म्हणायला लागल्या की, आम्हाला फक्त मानसिक आधार नको. आम्ही नोकरी करत नाही. त्यामुळे आम्हाला भविष्याबद्दल खूप असुरक्षित वाटतं. मग त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी सहचरी नावाने केटरिंगचा ग्रूप सुरू करण्यात आला. मुक्तांगणला रोज 1200 पोळ्या लागतात. पूर्वी त्या बाहेरून मागवल्या जायच्या. (बाकी स्वयंपाक मात्र इथेच केला जायचा.) त्या आता सहचरी करतात. एवढंच नव्हे तर या ग्रूपला अनेक सॉफ्टेवअर कंपन्यांच्या ऑर्डर आहेत. त्याविषयी मुक्ता पुणतांबेकर सांगतात, आम्हाला आधी असं वाटलं की आम्ही त्यांना मदत म्हणून करू. त्या बायका आता प्रॉफिट जनरेट करायला लागल्या.’’

शिस्तीचा समूह

मुक्तांगणमध्ये समूह उपचारांवर भर असतो आणि हे समूह आठवडय़ानुसार ठरतात. या केंद्रात अ‍ॅडमिशन होते ती फक्त शुक्रवारीच. प्रत्येक आठवड्याला- प्रत्येक शुक्रवारी साधारणपणे 22-25 पेशंट अ‍ॅडमिट होतात. त्यांची एक बॅच होते. आपापल्या बॅचचं नाव हे पेशंटच निवडतात.परिस, नवजीवनतर कुणी फुलाचं नाव घेतात. त्यांचा एक मॉनिटर आणि एक ग्रुप काउन्सिलर असतो. ही बॅच पाच आठवडय़ानंतर बुधवारी डिस्चार्ज होते. असा हा पाच आठवड्यांचा प्रोग्राम असतो. प्रत्येक आठवडय़ाचा मुक्तांगणचा अभ्यासक्रम ठरलेला असतो, अगदी एकेका दिवसाचा. प्रत्येकाला वैयक्तिक काउन्सिलर असतो. तो त्या रुग्णाशी वैयक्तिक बोलतो. याखेरीज सामूहिक काउन्सिलरही असतो.

सकाळी योगापासून सुरुवात होते. नऊ वाजता कॉमन ग्रूप असतो. पावणे बाराला प्रत्येक आठवडय़ाचा एकत्र ग्रूप. नंतर जेवण. अडीच ते पावणे तीनपर्यंत ग्रूप थेरपी. चार वाजता पीटी असते. पाच वाजता अल्कोहोलिक अ‍ॅनानिमस, नार्कोटिक अ‍ॅनानिमस, गॅम्बलिंग अ‍ॅनानिमस अशी व्यसनानुसार सत्रं होतात.. दर रात्री पंधरा मिनिटं मौन पाळलं जातं, आजचा दिवस कसा गेला यावर विचार करण्यासाठी! दहानंतर मात्र झोपावं लागतं. शुक्रवार अणि शनिवारी आर्ट बेस्ड थेरपी असतात. गुरुवार हा नातेवाइकांना भेटण्याचा दिवस असतो. त्यांच्यासाठीसुद्धा मीटिंग घेतल्या जातात. समूहाचा आपण भाग आहोत हे मान्य करण्याचं आणि समूहाची शिस्त पाळण्याचं, व्यसनामुळे वाहून गेलेलं शिक्षण या दिनक्रमातून आपोआपच मिळत राहतं.

महिलांसाठी निशिगंध

अलीकडच्या काळात महिलांमध्येही व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेऊन मुक्तांगणने जानेवारी 2009मध्ये खास अशा महिलांसाठी निशिगंध हा वेगळा विभाग सुरू केला. या विभागात एका वेळी आठ-नऊ महिला उपचारासाठी अ‍ॅडमिट होतात. त्याविषयी मुक्ताताई सांगतात,‘‘एक गोष्ट चांगली की, बायकांचा रिकव्हरी रेट जास्त चांगला आहे. तो जवळपास 85 टक्के दिसतो. मात्र बायका सुरुवातीला जास्त त्रास देतात, खूप आरडाओरडा करतात, सारखं रडत राहतात.. असाही अनुभव आहे. पण आठवडा झाला, त्या नीट सेट झाल्या की अगदी भरभरून प्रतिसाद देतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपला असा समज असतो की, व्यसनाधीनतेमध्ये एकतर झोपडपट्टीतल्या किंवा श्रीमंतच बायका असतात. मुक्तांगणमध्ये मात्र अगदी टिपिकल मध्यमवर्गीय गृहिणीही पाहायला मिळतात. त्याखालोखाल कॉल सेंटर, आयटी क्षेत्रातल्या महिलांचं प्रमाण वाढतं आहे. विशेष म्हणजे ज्या स्त्रिया निशिगंधमध्ये काऊन्सिलर म्हणून काम करतात, त्यांचे नवरे आधी व्यसनाधीन होते. त्यांचा मुक्तांगणमध्ये सहचरी नावाचा ग्रूप होता. त्यातल्याच काही महिला ट्रेनिंग घेऊन आता निशिगंधमध्ये काम करतात

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0