बरबादी आयुष्याची..
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण कमी असलं तरी सध्याच्या प्रगतीच्या मार्गावर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणा-यै महिलांमध्येही हे प्रमाण वाढू लागलं आहे. सोशलायझेशनच्या नावाखाली ही व्यसनं केली जात असली तरी ती त्यांच्यासाठीही तितकीच धोकादायक आहेत, हे विविध पाहण्यांनी सिद्ध केलं आहे. क्षणिक आनंद देणा-या या व्यसनांची धुंदी आयुष्यभरासाठीची बरबादी ठरू शकते.
वास्तविक व्यसन ही एखाद्याची खासगी बाब मानली जाते. पण ती चव्हाट्यावर आणण्याचं पातक व्यसनी मंडळी करतात. याची अनेक जिवंत उदाहरणं आपल्या आजूबाजूला असतात. त्यामुळे व्यसन हा पुराण काळापासून समाजासाठी शाप ठरला आहे. भारतातीलच नव्हे तर अन्य देशांतली वाढती व्यसनाधीनता त्या त्या देशांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. अलीकडच्या काळात समाज प्रचंड वेगाने विकास पावत आहे. मात्र त्याबरोबर अनेक चांगल्या रीतीरिवाजांना तिलांजली दिली जात आहे. त्यातलाच एक म्हणजे एकत्रित कुटुंबपद्धती. या पद्धतीत घरातल्या ज्येष्ठांचा तरुणांवर काही प्रमाणात वचक असायचा. पण आता हा वचकच नाहीसा झाला. सामाजिक नीतिनियम धाब्यावर बसवले गेले आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे स्वनियंत्रणच हरवल्यानं व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढू लागलं.
फक्त देशापुरता विचार केला तरी तब्बल साडेसात कोटी भारतीय कोणत्या ना कोणत्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. आणि हा आकडा वाढतोच आहे. ते केवळ मुंबई, दिल्लीसारख्या शहरांपुरते मर्यादित राहिले नसून आता लहान आकारांची शहरे आणि ग्रामीण भागातही वाढू लागले आहे. केंद्र सरकारनं संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थ आणि गुन्हेगारी संबंधीच्या विभागाच्या मदतीने केलेल्या पाहणीत या व्यसनाधीनतेचं प्रमाण, स्वरूप आदींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यात 12 ते 18 वर्षे वयोगटातील तरुणांचा प्रामुख्याने विचार केला होता. त्या वयोगटातील 21.4 टक्के युवक मद्यपान (सहा कोटी 25 लाख), तीन टक्के युवक अफू, गांजासारखी व्यसने(90 लाख), 0.7 टक्के युवक अफू(2.5 लाख) तर 3.6 टक्के (10 लाख) मंडळी अन्य अंमली पदार्थाचं सेवन करणारे आहेत. व्यसनाधीनतेचं प्रमाण देहविक्रय करणा-या महिला, वाहनचालक आणि रस्त्यांवरील लहान मुलांमध्ये अधिक आहे. जगातील सुमारे १० टक्के धूम्रपान करणारे एकटय़ा भारतातच असून दरवर्षी तंबाखूजन्य आजारानं बळी पडणा-यांचं भारतातलं प्रमाण सुमारे 10 लाख आहे.
भारताचा विचार केला तर ईशान्येकडील राज्ये, सीमेकडील राज्ये आणि अफूचे पीक घेणाऱ्या राज्यांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण जास्त असल्याचं या पाहणीत दिसून आलं आहे. यातली धक्कादायक बाब म्हणजे महाविद्यालयांत प्रवेश घेण्याच्या तयारीत असलेली उच्च माध्यमिक वर्गातली किंवा महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या काळात बावचळलेली मुलं या व्यसनांच्या आहारी जाण्याचं प्रमाण अधिक असल्याचंही हा अहवाल सांगतो.
गेल्या काही वर्षात महिलांमध्येही व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढतं राहिलं आहे. या पाहणीसाठी एकंदर 4,648 महिलांशी चर्चा करण्यात आली त्यातल्या 371 महिलांनी त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्यसन असल्याची कबुली दिली. हे प्रमाण आठ टक्क्यांच्या जवळपास आहे. महिलांमध्ये मात्र, तंबाखूजन्य उत्पादनांचं सेवन करण्याचं प्रमाण अधिक आहे. धुम्रपानाचा विचार केला तर शहरी भागांतील महिलांमध्ये हे प्रमाण 0.5 टक्के तर ग्रामीण भागात हेच प्रमाण दोन टक्के आहे. मात्र, अन्य देशांच्या तुलनेत ते प्रमाण कमीच आहे. अन्य देशांची एकंदर टक्केवारी काढली तर हेच प्रमाण 10 टक्क्यांच्या जवळपास जाते. भारतात तंबाखू खाण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये 33 टक्के तर महिलांमध्ये आठ टक्के आहे. मात्र, शहरी भागात महिलांमधील तंबाखू खाण्याचं प्रमाण सहा तर ग्रामीण भागात 12 टक्के आहे. शिक्षण आणि तंबाखूचं व्यसन यांचं प्रमाणही व्यस्त असून हिंदू स्त्रियांच्या तुलनेत मुस्लिम, ख्रिस्ती, समाजात तंबाखूसेवनाचं प्रमाण अधिक असून मद्यपानात मात्र हिंदू स्त्रिया इतर समाजापेक्षा आघाडीवर आहेत. अन्य एका पाहणीत शीख समाजातील महिलांना कोणत्याही प्रकारचं व्यसन नसल्याचं दिसून आलं. अनुसूचित जमातीतील महिलांमध्ये मद्यपानाचं प्रमाण अधिक असून पुढारलेल्या जातीवर्गाच्या तुलनेत त्यांच्यातील मद्यपानाचं प्रमाण सुमारे साडेदहा टक्क्यांनी अधिक आहे.
मद्यपानाचा विचार केला तर भारतात मद्यपान करणा-या महिलांची संख्या सुमारे 2.8 टक्क्यांच्या जवळपास आहे.
केवळ आकडेवारीचा विचार केला असला तरी ही बाब विचार करायला लावणारी आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण कमी असलं तरी सध्याच्या प्रगतीच्या मार्गावर पुरुषाच्या खांद्याला खादा लावून काम करणा-या महिलांमध्येही हे प्रमाण वाढू लागलं आहे. सोशलायझेशनच्या नावाखाली ही व्यसनं केली जात असली तरी ती त्यांच्यासाठीही तितकीच धोकादायक आहेत, हे विविध पाहण्यांनी सिद्ध केलं आहे. क्षणिक आनंद देणाऱ्या या व्यसनांची धुंदी आयुष्यभरासाठीची बरबादी ठरू शकते.
व्यसनाधीनता रोखण्यासाठी 350 सेवाभावी संस्था कार्यरत आहेत, त्यांच्या माध्यमातून 387 व्यसनमुक्ती केंद्रं देशभरात राबवली जात आहेत. त्या शिवाय 52 समुपदेशन केंद्रांच्या माध्यमातूनही हे काम केलं जात आहे. पण मुद्दा आहे, व्यसनमुक्ती केंद्रांपर्यंत पोहोचण्याचा.‘व्यसन नाहीच’असं म्हणणारे व्यसनी, त्या व्यसनापासून सुटकेचा प्रयत्न करायला हवा हेही मान्य करत नाहीत. कुटुंबीय वा नातेवाइकांनी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं तरी, हा जणू आपल्यावर अन्याय आहे, अशा समजुतीमुळे व्यसनमुक्तीसाठी अधिक वेळ लागतो.
महाराष्ट्राचं काय?
देशाला दिशा देणारे राज्य अशी ओळख असणा-या महाराष्ट्राची व्यसनाधीन मंडळींची सर्वाधिक संख्या असणारं राज्य अशी वेगळी ओळख प्रस्थापित होत आहे. सुमारे दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रातील 43,280 जण व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेताना आढळून आले होते आणि हे प्रमाण भारतातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा अधिक आहे. त्यातच मुंबईसारख्या महानगरापेक्षा सातारा, सांगली, कोल्हापूरसारखी शहरे या व्यसनाधीनतेत आघाडी घेत असल्याचं दिसून आलं आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या गोव्यात तस्करीच्या मार्गानं येणा-या अमली पदार्थाचा व्यापार महाराष्ट्रातूनच होत असल्यानं त्याचे परिणाम महाराष्ट्रावर होतात. पुण्यात परदेशातून शिकायला येणा-या विद्यार्थ्यांचं प्रमाण मोठं आहे. त्यांच्यासाठी अशाच तस्करीच्या मार्गानं हे अमली पदार्थ येतात.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा