मी गंगापुत्र
गंगा नदी सध्या पावित्र्यापेक्षा प्रदूषणामुळे जास्त गाजते आहे. नद्यांच्या पाण्याचं शुद्धीकरण, किना-याचा विकास आणि प्रदूषणमुक्त निसर्गासाठी ‘गंगाजल नेचर फाऊंडेशन’च्या माध्यमातून आम्ही अनेक वर्ष काम करतोय.
गंगा नदी सध्या पावित्र्यापेक्षा प्रदूषणामुळे जास्त गाजते आहे. नद्यांच्या पाण्याचं शुद्धीकरण, किना-याचा विकास आणि प्रदूषणमुक्त निसर्गासाठी ‘गंगाजल नेचर फाऊंडेशन’च्या माध्यमातून आम्ही अनेक वर्ष काम करतोय. माझा पिंड मुळात फोटोग्राफरचा. गंगा नदीचे फोटो काढताना, ‘गंगापुत्र’ असल्याच्या भावनेतून या नदीच्या प्रेमात पडलो. पण नदीच्या सौंदर्यापेक्षा तिच्या भयंकर प्रदूषणामुळे मी मुळापासून हादरलो. हे सारं सर्वाना कळावं, या नदीचं आणि पवित्र समजल्या जाणा-या पाण्याचं महत्त्व प्रत्येक भारतीयाला समजावं या हेतूनं मग हे काम सुरू केलं.
हे काम सुरू केल्यापासून गंगानदीचा सर्वागानं शोध घेत भटकलो, वेगवेगळे उपक्रम राबवले. अजूनही शोध संपलेला नाही आणि अजूनही जनजागृतीचं प्रचंड काम बाकी आहे. आज ‘प्रहार’मधून याच प्रश्नावर वेगवेगळ्या अँगलनं तुमच्यासारख्या सुजाण वाचकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. या संधीबद्दल मी ‘दिल से’ आभारी आहे. ‘विजय मुडशिंगीकर हा फोटोग्राफर किंवा गंगाजल अभियानाचा माणूस’ एवढी माझी ओळख ठेवलीत तरी चालेल, पण खिशाला चाट लावून चाललेला माझा प्रामाणिक उद्देश, काम आणि तळमळ-कळकळ याबद्दल मात्र गांभीर्यानं बघा, असं कळकळीनं सांगावंसं वाटतं.
गंगा नदी ही देशाची प्रमुख नदी असली तरी प्रदूषणाच्या बाबतीतही ती अग्रेसर आहे. मॅगसेसे पुरस्कारप्राप्त डॉ. राजेंद्रसिंह यांच्या ‘गंगा नदी बचाव’ अभियानाची पुढची पायरी म्हणजे ‘जनजोडो गंगा यात्रा’. गंगेच्या किना-यावरील २५ महत्त्वाची शहरं निवडून तिथल्या लोकांना पाण्याची किंमत कळावी आणि जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी त्यांच्याकडूनच पाठपुरावा करावा हे या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी गंगेच्या २ हजार ५२५ किलोमीटर प्रवाहाचं स्वच्छता अभियान, लघुपट तसंच चित्रांचं व छायाचित्रांचं प्रदर्शन, पथनाट्यं, सायकलस्वारांची जलजागृती यात्रा, पर्यावरणतज्ज्ञांची व्याख्यानं, शिबिरं, कार्यशाळा असा व्यापक जागृती कार्यक्रम आहे. ‘गंगा कृती योजना’ राबवणा-या सरकारची भूमिकाही यानिमित्ताने सरकारी अधिकारीच स्पष्ट करतील. या अभियानासाठी जल, भू आणि वायूमार्गे ‘गंगासागर ते गोमुख’ असा गंगेचा उलटा प्रवास आम्ही करणार आहोत. आजवर छायाचित्रांच्या माध्यमातून गंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न मांडताना मी कित्येकदा या नदीला भेट दिली. प्रत्येक वेळी मला नावीन्याचा, नव्या प्रदूषणाचा, नव्या दुर्लक्षाचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चीड आणणा-या लोकांच्या उदासीनतेचाही प्रत्यय आला. गंगा नदीचा प्रवास करताना खटकलेल्या गोष्टी अनेक आहेत. नदीत सोडलं जाणारं मलमूत्र, सांडपाणी, निर्माल्य, अस्थी, कारखान्यातील दूषित रसायनं, मृतदेह, जनावरांची कलेवरं, किना-यावरील अतिक्रमणं, पाण्यातील नष्ट होणारे जीवमात्र यांचं दाहक चित्रण कॅमे-यात बद्ध केलं. गंगोत्रीपासून गंगासागपर्यंतच्या प्रवासातली ही सारी छायाचित्रं फक्त हौस म्हणून प्रदर्शनात ठेवली नव्हती तर भारताच्या राष्ट्रीय नदीचा होत असणारा -हास पाहून झालेली घालमेल व्यक्तही करायची होती. या नदीची महती मांडायची होतीच, तिच्यावरचं अतिक्रमणही थांबवायचं होतं. त्यासाठी जनजागृती आवश्यक होती. म्हणून ठिकठिकाणी ‘गंगाजल’ हे प्रदर्शन सादर केलं. काढलेल्या ५ हजार ते ६ हजार छायाचित्रांतून निवडक १२० प्रदर्शनात ठेवली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, लोकांमध्ये विशेषत: तरुणांमध्ये गंगेबद्दल आत्मीयता वाढली आणि मुख्य म्हणजे या प्रश्नाची दाहकता सर्वासमोर आली.


Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा