साद प्रवाही जीवनाची
नदीत फेकलेल्या मृतदेहांमुळे जलजीवसृष्टी नष्ट होतेय, पाणी प्रदूषित होतंय.. सारं समजतंय, पण डोळ्यांवर झापडं बांधून जगणा-यांना त्याचं काहीही वाटत नाही. सरकारी प्रयत्न त्यांच्या मर्यादेत होताहेत, पण लोकांचं काय? त्यांनी जागृत व्हायला हवं.
शारीरिक आणि आर्थिक संकटातून तरलो आणि गंगेच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला सज्ज झालो. दिल्लीच्या ललित कला अकादमीत निवडक छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलं. त्यासाठी नोकरी सोडली. प्रॉव्हिडंट फंडातून घेतलेल्या पैशांतून हे प्रदर्शन भरवलं होतं. या प्रदर्शनाला दिल्लीकरांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्याच शिदोरीवर माझा पुढचा प्रवास सुरू झाला. मला कोल्हापूरची पंचगंगा नदी आठवत होती. तिच्या काठावर बालपण गेलं होतं माझं, तिच्या प्रवाहात किती वेळ डुंबलो होतो मी. सारं आठवत राहिलं. तेव्हा पाठ केलेली ‘गंगेची प्रार्थना’ माझ्या अजूनही स्मरणात आहे. मोठेपणी याच गंगेच्या ओढीनं मी प्रवाहत राहीन, असं कधी वाटलं नव्हतं. पण ‘सारे तीरथ बार-बार, गंगासागर एकबार’ या म्हणीप्रमाणे गंगेच्या सान्निध्यात मी गेलो आणि तिचाच झालो. कोलकाता असो की पाटणा, गया असो की प्रयाग, पंढरीच्या वारीप्रमाणे माझ्या वा-या सुरू झाल्या. एका वारीहून परतत होतो, दुसरीला जाण्यासाठी. या प्रवासात मला गंगेचं पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक महत्त्व कळलं, माणसं कळली. तळमळीनं काम करणारे कार्यकर्ते भेटले तसेच उदासीनतेनं पछाडलेलेही दिसले. गंगेच्या प्रवाहात वाहणारा मृतदेह पकडण्यासाठी धडपडणारा कुत्रा पाहिला आणि त्याच नदीवरील एका पुलावर एका डॉक्टरनं लिहिलेला ‘गंगामें पाप धोये, न की गंदगी’ हा बोर्डही पाहिला. अशा परस्परविरोधी प्रकारांनी मन सुन्न होत होतं. पण त्यातूनच पुढे जायला प्रेरणाही मिळत होती. ‘माझ्या देहाची मूठभर रक्षा गंगेत टाकावी’ ही पंडित नेहरूंची अखेरची इच्छा आठवली. समाजमन, पाणी, हवा सगळं प्रदूषित होत आहे. अशावेळी पं. नेहरूंसारखी इच्छा व्यक्त करणारेही राहिले नाहीत. तुम्हाला ‘गंगाजल’ सिनेमा आठवतोय? गंगेच्या काठावर अनेक संस्कृती उदयाला आल्यात, त्यात संपन्नतेबरोबरच बळजबरी आणि गुंडगिरी यांचीही संस्कृती जन्माला आली आहे. त्या चित्रपटात या विकृत संस्कृतीवर प्रकाशझोत टाकला आहे. गंगेच्या प्रदूषणाबरोबरच सामाजिक प्रदूषणही रोखलं गेलं पाहिजे. ‘गंगा अॅक्शन प्लॅन’ राबवताना केंद्र सरकारने याही गोष्टींचा विचार करायला हवा. लोकांच्या श्रद्धेचा आणि भावनांचा बाजारही रोखला गेला पाहिजे. आधुनिक युगात गंगा नदीच्या पावित्र्याचा ‘धंदा’ करताना भ्रष्टाचारी लोकांना काहीही वाटत नाही. सर्वसामान्यांना कसंही नाडलं जातं. भाविकांकडून पैसे उकळणारे आणि स्वार्थासाठी कुठल्याही पातळीवर उतरलेले मी गंगाकिनारी पाहिलेत. ‘राम तेरी गंगा मैली’चं टायटल साँग तुम्हाला आठवत असेल ना? त्यातील विदारकता मी जवळून पाहिलीय. नदीत फेकलेल्या मृतदेहांमुळे जलजीवसृष्टी नष्ट होतेय, पाणी प्रदूषित होतंय.. सारं समजतंय, पण डोळ्यांवर झापडं बांधून जगणा-यांना त्याचं काहीही वाटत नाही. सरकारी प्रयत्न त्यांच्या मर्यादेत होताहेत, पण लोकांचं काय? त्यांनी जागृत व्हायला हवं. पर्यावरणाचा -हास थांबवण्यासाठी शेकडो हात पुढे येताहेत. त्यांना साथ द्यायला हवी. गंगेसारख्या अनेक नद्या आहेत भारतात. त्यांचीही गत गंगेसारखी होऊ नये म्हणून आजच प्रयत्न सुरू करायला हवेत. येणा-या पिढीला स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पाणी मिळायला हवं असेल, तर जलशुद्धीकरण प्रकल्पांना चालना मिळाली पाहिजे. पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पाणी म्हणजे जीवन, असं आपण सहजगत्या म्हणतो. पण त्यातील गांभीर्य आपल्याला कळतं का? आपल्या देशाचं हेच दुर्दैव आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, शरयू, ब्रह्मपुत्रा, पंचगंगा, मिठी.. सा-याच नद्या प्रदूषित झाल्या आहेत. पापं धुण्याऐवजी पापं करतच चाललोय आपण. आता तरी शहाणे होऊया. जल संवर्धनाच्या अभियानात सहभागी होऊयात. ‘दिल से’ सदराचा निरोप घेताना या प्रवाही जीवनाची साद घालतोय तुम्हाला. साथ देणार ना?Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा