३५ वर्षाची कामे ५ वर्षात केली
अलिबाग मतदारसंघातील काँग्रेस- राष्ट्रवादी - रिपाइं (गवई गट) आघाडीचे उमेदवार मधुकर ठाकूर
अलिबाग, मुरुड व रोहा तालुक्यांच्या विकासाला वरदान ठरणा-या सांबरकुंड मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यास मी शासनास भाग पाडले असून अलिबाग तालुक्याला पाणीपुरवठा करणा-या सारळपोळ व झिराड येथील येथील त्रिभुवन बंधारा या नवीन धरणांच्या सर्वेक्षणाचे आदेश दिलेले आहेत. आमदार निधीतून कोळगाव, नवेदर बेली, कोपर, सातीर्जे येथे नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. त्याप्रमाणे खनिज विकास निधीतून शहाबाज व कामार्ले येथे पाणीपुरवठा योजना मी सुरू केल्या आहेत.
अलिबाग तालुक्यातील मच्छीमार बांधवांसाठी राष्ट्रीय सहकार निगम एन.सी.डी.सी.अंतर्गत सुमारे ११ रुपयांची प्रकरणे मी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने मंजूर करून घेतली आहेत. अलिबाग बंदरच्या ठिकाणी नवीन बंदर बांधण्यासाठी शासनाकडे ६.५० कोटी रुपये निधीची मागणी केली असून उद्योग व बंदर मंत्री नारायण राणे यांनी कोकण पॅकेजअंतर्गत या कामाचा समावेश करण्याचे मान्य केले आहे. बोंडणी येथे बंदर विभागामार्फत नवीन जेट्टी उभारण्याचे काम लवकरच मंजूर होणार आहे. उरण तालुक्यातील केगाव येथे धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी १४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास शासनाने माझ्या विनंतीवरून मान्यता दिलेली आहे.
जवाहर विहीर योजना लाभार्थीची निवड या समितीचा अध्यक्ष म्हणून ५ वर्षात बहुसंख्य शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिलेला आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला ७० हजार रुपये इतके अनुदान शासनातर्फे मिळवून दिले. तसेच मतदारसंघातील शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या शेतात वैयक्तिक शेततळी शासनाच्या अनुदानातून खोदण्याची महत्त्वांकाक्षी योजना मी शासनाच्या कृषी विभागाकडे सादर केली आहे. त्यास शासनाने अनुकूलता दर्शविली असून या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
अलिबाग तालुक्यातील श्री कनकेश्वर देवस्थानास पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर करण्याबाबत माझ्या विनंतीवरून शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांचे रेवदंडा येथे स्मारक उभारण्यासाठी मी मंजुरी मिळवून घेतली आहे. मी स्वत: आदिवासी समाजामध्ये वावरलेलो असल्यामुळे आदिवासींच्या सुख-दु:खांची मला पूर्ण जाणीव आहे. आदिवासी बांधवांसाठी घरकुल, खावटी कर्ज, गॅसशेगड्या इ. योजना मी माझ्या ५ वर्षाच्या कार्यकालात मोठ्या प्रमाणात राबविल्या आहेत.
अलिबाग शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता अलिबागसाठी शहर विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करण्याबाबत मी प्रयत्न करीत असून यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. ही सुधारणा झाल्यावर अलिबाग शहरामध्ये बहुमजली इमारती बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अलिबागचा झपाट्याने विकास होत असल्याने वेगवान दळणवळण व्यवस्थेची आवश्यकता लक्षात घेऊन चोंढी ते पेण, पेण ते मुंबई अशा रेल्वेमार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याबद्दल चर्चा सुरू असून कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या पेण येथे थांबविण्यात याव्यात याबाबत मी प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे रेवस-करंजा पुलास बी.ओ.टी तत्त्वावर मान्यता मिळवून देण्यासारखी महत्त्वपूर्ण कामे मी मागील ५ वर्षात पूर्ण केली आहेत.
वरील सर्व कामांकडे पहिल्यास अलिबाग-मुरुड-रोहा तालुक्याचा विकास होऊन हे तिन्ही तालुके सुजलाम् सुफलाम् होतील यात शंका नाही. याबाबत मतदारांचा माझ्यावरील विश्वास मी मागील पाच वर्षात मिळविला आहे. विरोधी पक्षाच्या ३५ वर्षात कारकीर्दीत झाली नसतील इतकी विकासकामे मी फक्त ५ वर्षात पूर्ण केली आहेत. म्हणूनच श्रमीक मुक्ती दलानेही मला पाठिंबा दिला आहे.
सत्ताधारी पक्षाचा आमदार काय करू शकतो, हे या मतदार संघातील सूज्ञ जनतेने प्रत्यक्ष पाहिलेले आहे. सामान्यात सामान्य व्यक्ती मला पूर्वभेट न ठरवता भेटू शकतो. जनतेच्या अडीअडचणीकरिता धावून येणारा आमदार म्हणून माझी निर्माण झालेली ओळख मी कायम राखीन. जनतेचा एक सेवक म्हणून अलिबाग मतदारसंघातील मतदार मला पुन्हा निवडून देतील, याबाबत माझ्या मतदारसंघातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे.



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा