पहिले पान | मनोरंजन | गाजावाजाशिवाय सुलोचनादीदींना महाराष्ट्रभूषण

गाजावाजाशिवाय सुलोचनादीदींना महाराष्ट्रभूषण

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

ढोल ताशा, मिरवणुका, भव्य- दिव्य सोहळे हे महाराष्ट्र राज्याचे एक वैशिष्टय़ असताना सरकारने मंगळवारी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना कोणताही गाजावाजा न करता आणि प्रसिद्धी माध्यमांना कानोकान खबर लागू न देता राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान सोहळा उरकला.

 

मुंबई- ढोल ताशा, मिरवणुका, भव्य- दिव्य सोहळे हे महाराष्ट्र राज्याचे एक वैशिष्टय़ असताना सरकारने मंगळवारी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना कोणताही गाजावाजा न करता आणि प्रसिद्धी माध्यमांना कानोकान खबर लागू न देता राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान सोहळा उरकला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेल्या या कार्यक्रमाची पुरेशी पूर्वप्रसिद्धी न झाल्यामुळे महाराष्ट्रभूषणसारखा सर्वोच्च पुरस्कार आनंद सोहळा न होता केवळ एक औपचारिकता पूर्ण करणारा सोहळा झाला. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडेच सांस्कृतिक खात्याची धुरा असताना हा सावळागोंधळ राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांची चिंता वाढविणारा आहे.

प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्र्याच्या हस्ते मोनोरेलची चाचणी आणि हिंदमाता उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. या सोहळ्याच्या पानभर जाहिराती सर्वच प्रमुख वृत्तपत्रांमध्ये झळकल्या. खरे तर मंत्र्यांच्या पत्रकार परिषदांसाठी माध्यमांनी यावे म्हणून जीवाचा आटापिटा करणारे संबंधित मंत्री, जनसंपर्क अधिकारी किंवा सांस्कृतिक खात्यानेही या कार्यक्रमाच्या योग्य प्रसिद्धीसाठी कोणतेही पावले उचलली नाहीत. २५ जानेवारीला आलेल्या सरकारी पत्रकांमध्येही मुख्यमंत्र्यांचा प्रजासत्ताक दिनाचा संदेश आहे, टॅक्सी-ऑटो रिक्षांची चिंता आहे. मात्र सुलोचना दीदींच्या सत्काराच्या प्रसिद्धीची कळकळ नाही. या पूर्वीही राज्य सरकराच्या सांस्कृतिक खात्याने लेखकांसाठी पुरस्कार जाहीर केले तेव्हा खुद्द सरकारच्याच माहिती खात्यालाही याची कल्पना नव्हती. दुपारीच या पुरस्कारांची घोषणा होऊनही त्या दिवशी या घोषणेचे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले नव्हते.

२६ जानेवारीला जरी वृत्तपत्रांना सुटी असली तरी किमान या कार्यक्रमाची प्रेस नोट तरी वेळेवर यावी अशी अपेक्षा होती. मंगळवारी हा कार्यक्रम उशिरा संपल्याचे कारण देत या कार्यक्रमाची प्रेस नोटही बुधवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत काढण्यात आली नव्हती. मराठी चित्रपटांना जनतेने भरघोस प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली. अर्थात त्याची सुरुवात शासनाकडूनच झाली असती तर बरे झाले असते.

राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात हा पुरस्कार दिला जात आहे, याचेही भान सरकारी यंत्रणेने ठेवले नाही. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सुलोचना दीदींच्या देशप्रेमाच्या आठवणींना उजाळा दिला. सुलोचना दीदींच्या कारकीर्दीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेणारा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. पुरेशा प्रसिद्धीअभावी या कार्यक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतले मोजकीच मंडळी उपस्थित राहिली.

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0