नॉर्वेत लहानग्यांना जेवण भरवणे ठरतो गुन्हा
आपल्याच चिमुरड्यांना जेवण भरवले आणि त्यांना जवळ झोपवले म्हणून त्यांच्यापासून दूर राहण्याची कठोर शिक्षा नॉर्वेत राहणा-या अनुरुप आणि सागरिका भट्टाचार्य या भारतीय दांपत्याला मिळाली आहे.
ऑस्लो - आपल्याच चिमुरड्यांना जेवण भरवले आणि त्यांना जवळ झोपवले म्हणून त्यांच्यापासून दूर राहण्याची कठोर शिक्षा नॉर्वेत राहणा-या अनुरुप आणि सागरिका भट्टाचार्य या भारतीय दांपत्याला मिळाली आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस.एम. कृष्णा यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
मूळ कोलकाता येथील रहिवासी असलेल्या अनुरुप आणि सागरिका भट्टाचार्य या दांपत्याला तीन वर्षांचा मुलगा अभिज्ञान आणि ऐश्वर्या ही एक वर्षाची मुलगी आहे. भट्टाचार्य यांच्या मुलाचे शाळेतील वर्तन पाहून तिथल्या शिक्षकांना त्याचे संगोपन नीट होत नसल्याचा संशय आला. त्यामुळे तिने त्याबाबत तिथल्या स्थानिक प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर चाइल्ड सर्व्हिस प्रोटेक्शनचे कर्मचारी दर आठड्याला तासाभरासाठी त्यांच्या घरी येऊ लागले. त्यावेळी त्यांनी ही मुलं आई-वडिलांबरोबरच झोपतात. तसेच त्यांची आई त्यांना हाताने भरवते हे पाहिले. हे पाहून हे दोघेही त्यांच्या मुलांचा सांभाळ करण्यास असमर्थ आणि बेजबाबदार असल्याचा सांगत या दोन्ही चिमुरड्यांना सरकारने ताब्यात घेतले.
अभिज्ञान आणि ऐश्वर्या सरकारी चाइल्ड केअर सर्व्हिस विभागाच्या ताब्यात आहे. त्यांच्या पालकांना वर्षभरात केवळ दोन वेळा आणि तेही अवघ्या तासाभरासाठीच त्यांना भेटता येणार आहे. तसेच या मुलांचा ताबा अठरा वर्षांनंतर भट्टाचार्य दांपत्याकडे देण्यात येणार आहे. पुढील महिन्यात या भट्टाचार्य दांपत्याचा व्हिसा संपत असल्याने मुलांचा ताबा लवकरात लवकर मिळावा, यासाठी हे कुटुंब प्रयत्नशील आहे.
या अन्यायाविरोधात या मुलांच्या आजी-आजोबांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेतली असून या प्रकरणात आता भारत सरकारने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नॉर्वे सरकारशी तब्ब्ल दोनवेळा पत्रव्यवहार करुन मुलांचा ताबा पालकांना मिळावा, अशी विनंती केली असून नॉर्वे सरकारने ती अद्याप मान्य केलेली नाही.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा