जिवाला धोका हा बनाव
जयपूर साहित्य महोत्सवापासून दूर ठेवण्यासाठीच जिवाला धोका असल्याचा बनाव राजस्थान पोलिसांनी रचल्याचा आरोप सलमान रश्दी यांनी केला आहे.
जयपूर- जयपूर साहित्य महोत्सवापासून दूर ठेवण्यासाठीच आपल्या जिवाला धोका असल्याचा इशारा देण्याचा बनाव राजस्थान पोलिसांनी रचला, असा आरोप वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांनी केला आहे. राजस्थान पोलिसांनी ही खोटी माहिती कोणाच्या सूचनेवरून दिली याची आपल्याला कल्पना नाही. मात्र, हेच पोलिस काही लेखकांना आपल्या पुस्तकातील परिच्छेद वाचल्याबद्दल अटक करायला निघाले होते, असा उद्वेग त्यांनी ट्विटरवर व्यक्त केला.
रश्दी यांची हत्या करण्यासाठी काही भाडोत्री मारेकरी जयपूरकडे रवाना झाले आहेत, अशा प्रकारची माहिती राजस्थान पोलिसांना दिल्याचे वृत्त मुंबई पोलिसांनी फेटाळल्यानंतर आलेली रश्दी यांची ही प्रतिक्रिया गुंतागुंत वाढवणारी आहे.‘सेटॅनिक व्हर्सेस’ या वादग्रस्त पुस्तकाचे लिखाण केल्यामुळे रश्दी यांच्याविरोधात जगातील काही मुस्लिम संघटनांनी काही वर्षापूर्वी मोठा गहजब केला होता. अजूनही या पुस्तकावर अनेक देशांमध्ये बंदी आहे. जयपूर साहित्य महोत्सवात रश्दी येणार, अशी कुणकुण लागताच भारतातील काही मुस्लिम संघटनांनी त्यांच्या उपस्थितीला विरोध दर्शवला होता. तशात, त्यांच्या मागावर महाराष्ट्रातून काही भाडोत्री मारेकरी जयपूरला जात असल्याची ‘खबर’ मिळाल्यामुळे राजस्थान सरकार आणि पोलिस अधिक दक्ष झाले होते. जिवाला धोका असल्याचा समज करून रश्दी यांनी हा दौराच रद्द केला.
- गेहलोत यांच्याकडून खंडन
रश्दी यांनी केलेले आरोप राजस्थान सरकारने फेटाळले आहेत. हे आरोप चुकीचे असून, त्यांची हत्या करण्याचे प्रयत्न होणार असल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाली होती, असे स्पष्टीकरण राजस्थान सरकारने दिले आहे. त्यांच्या जिवाला धोका असल्याची माहिती मिळाल्यामुळेच, त्यांच्या आणि या महोत्सवाच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले. ‘केंद्रीय पातळीवरून एखादी खबर दिली जाते, तेव्हा तिची दखल घ्यावी लागते. रश्दी हे भारतीय वंशाचे असल्यामुळे त्यांना व्हिसाची गरज नव्हतीच. पण जिवाला धोका असल्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राजस्थान सरकारवर आली होती. लोकप्रिय महोत्सवांमध्ये अशा वेळी काही काळजी घ्यावी लागते.’ दरम्यान, जयपूर साहित्य महोत्सवात रश्दी यांच्या वादग्रस्त पुस्तकाचे वाचन केल्याबद्दल संबंधितांवर न्यायालयीन कारवाई करण्याची मागणी काही मुस्लिम संघटनांनी केली आहे.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा