विश्वासार्हतेची पंचवीस वर्षं
वाचकांना काय हवं, यापेक्षा त्यांना काय द्यायचं, याचा विचार होत असल्याने ‘फ्रंटलाइन’ला वाचकांचा अनुनय करण्याची गरज भासलेली नाही. या अर्थाने ते ‘इंडिया टुडे’ किंवा ‘आऊटलूक’ इतकं लोकप्रिय नसेलही, मात्र त्याने सुजाण वाचकांच्या मनामध्ये निर्भीड पत्रकारितेसंदर्भात एक विश्वास निर्माण केला आहे. याच विश्वासार्हतेला नुकतीच पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत.
प्रसिद्ध इतिहासकार आणि ‘इंडिया आफ्टर गांधी’ या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक रामचंद्र गुहा यांनी अलीकडेच ‘१९८४’ या सालाविषयी ‘द अॅक्सिस इयर’ या नावाचा एक लेख लिहिला आहे. त्याची सुरुवातच मुळी त्यांनी पुढील विधानाने केली आहे- When1984 finally did arrive, it was not an especially bad year for the countries that George Orwell had in mind.
काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी खरं तर दरवर्षीच घडत असतात. तशा त्या १९८४लाही घडल्याच. पण या वर्षाला भारतीय इतिहासात थोडं खास महत्त्व असण्याचं कारण म्हणजे, याच वर्षी इंदिरा गांधी यांची हत्या झाली. शाहबानो प्रकरण, भोपाळ दुर्घटना, महंमद अझरुद्दीनचा क्रिकेट संघात प्रवेश, हॅलेचा धूमकेतू, राकेश शर्माला पहिल्या भारतीय अवकाशयात्रीचा मान, बचेंद्री पालची एव्हरेस्ट चढाई, कोलकात्यात भारतातील पहिली मेट्रो रेल सेवा अशा काही घटना घडल्या त्याही १९८४लाच. यात एक छोटीशी चांगली घटना घडली, ती म्हणजे चेन्नईच्या ‘हिंदू ग्रूप ऑफ पब्लिकेशन’ने डिसेंबर ८४मध्ये ‘फ्रंटलाइन’ हे पाक्षिक सुरू केलं. ३१ ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधींची हत्या झाल्याने ‘फ्रंटलाइन’चा पहिलाच अंक इंदिरा गांधींविषयीच होता. त्याच्या कव्हरस्टोरीचं शीर्षक होतं, ‘अ इयर ऑफ पोलिटिकल अपसेट्स.’
‘इंडियाज नॅशनल मॅगझिन’ अशी सार्थ टॅगलाइन असणा-या या पाक्षिकाला नुकतीच पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत.
‘फ्रंटलाइन’ हे इंग्रजीतील ‘युनिक’ म्हणावं असं पाक्षिक आहे आणि बहुधा एकमेवही. गंभीर आणि जबाबदार पत्रकारिता करणा-या ‘हिंदू’ ग्रूपच्या ते मालकीचं आहे. त्यामुळे ‘हिंदू’ वृत्तपत्राला जी प्रतिष्ठा आहे, तीच आणि तशीच पाक्षिक म्हणून ‘फ्रंटलाइन’ला आहे. ‘फ्रंटलाइन’ निर्विवादपणे एलिट क्लासचं पाक्षिक आहे. त्यातले सर्वच लेख गंभीर आणि सविस्तर असतात. हॉलिवुड-बॉलिवुड या गोष्टींना त्यात थारा नसतो. क्रिकेटविषयीही फारसं काही नसतं. क्रिकेट हा विषय गेल्या पंचवीस वर्षात ‘फ्रंटलाइन’च्या एकदाही कव्हरस्टोरीचा विषय होऊ शकलेला नाही!
पॉप्युलर पत्रकारिता, पीत पत्रकारिता आणि चिप पत्रकारिता यापासून सदैव लांब राहण्याची दक्षता ‘फ्रंटलाइन’चे संपादक एन. राम यांनी घेतलेली आहे. त्यामुळे ‘फ्रंटलाइन’ला वाचकांचा अनुनय करण्याची गरज पडत नाही.
शोधवृत्तांत, चर्चा आणि भाष्य हे ‘फ्रंटलाइन’चं बलस्थान आहे. केवळ प्रादेशिक भाषांमध्येच (त्यात मराठीही आली) नव्हे तर इंग्रजीमध्येही पाक्षिक हा प्रकार चालत नाही. वर्तमानपत्र, साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक या चढत्या क्रमवारीत पाक्षिक आणि मासिकांच्या वाट्याला ‘लोकप्रियता’ आणि ‘ग्लॅमर’ या गोष्टी येत नाहीत. पण म्हणून त्यांचा दबदबा नसतो, असं मात्र नाही. ‘फ्रंटलाइन’ आणि ‘सेमिनार’ याची उत्तम उदाहरणं म्हणून सांगता येतील. बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक पाठराखण, विचारांचा आदर, सामाजिक बांधीलकी मानणारी पत्रकारिता आणि राजकारण, अर्थकारण, सांस्कृतिक आणि बौद्धिक प्रश्नांविषयीची सजगता ही ‘फ्रंटलाइन’ आणि ‘सेमिनार’ची म्हणून खास वैशिष्ट्यं सांगता येतील.
‘फ्रंटलाइन’चं वेगळेपण असण्याची चार प्रमुख कारणं आहेत. एक, ते नियतकालिक पत्रकारिता गांभीर्याने घेतात. गंभीर पत्रकारितेचे सध्याच्या काळात आणि भविष्यात काय तोटे होऊ शकतात, हे माहीत असूनसुद्धा ‘फ्रंटलाइन’ हे जाणीवपूर्वक करत आहे. दोन, ‘फ्रंटलाइन’चा भर मुख्य विषयावर असतो. ‘बिहाइंड एव्हरी इश्यू, देअर्स अ डिपर इश्यू’ हा त्यांचा बाणा आहे. तिसरं, अमूक विषयाकडे कसं पाहावं, हा दृष्टिकोन देण्यावर ‘फ्रंटलाइन’चा जोर असतो. त्यामुळे त्यात सर्व प्रकारच्या विचारांच्या लेखांना स्थान दिलं जातं. भलेही मग ते संपादकीय धोरणाच्या विरोधात असलं तरी आणि चौथं कारण आहे, आपली स्वत:ची स्वतंत्र आणि वेगळी ओळख सातत्याने जपणं.
आणि असं सगळं असूनही ‘फ्रंटलाइन’ व्यावसायिक मूल्यांना कमी मानते, असंही नाही. उत्तम निर्मिती, चांगली छपाई, चांगला कागद आणि मांडणी याबाबत कसल्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. २००६मध्ये ‘हिंदू’ आणि ‘फ्रंटलाइन’ या दोन्हींचं रि-डिझायनिंग करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजल्या गेलेल्या गार्सिया मीडियाच्या टीमला बोलावण्यात आलं होतं. एकविसाव्या शतकाचा विचार करून मारिओ गार्सिया, जॉन मिलर आणि गुंटर झवेरिना यांनी ‘फ्रंटलाइन’चं दृश्यरूप बदलवलं. तेव्हापासून ते अधिक देखणं झालं आहे.
एखाद्-दुसरा चांगला अंक काढणं ही तशी तुलनेने सोपी गोष्ट असते, पण प्रत्येक अंक चांगला काढणं आणि सलग अनेक वर्ष त्यात सातत्य ठेवणं ही खूपच कठीण गोष्ट असते. सातत्य, समयसूचकता आणि अचूकता याबाबत स्वत:ला सतत अग्रेसर ठेवणं ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. ‘फ्रंटलाइन’ गेली २५ वर्ष तारेवरची कसरत करत आहे. त्यामुळे त्याचे मुख्य संपादक एन. राम आणि त्यांचे संपादकीय सहकारी आर. विजय शंकर, के. के. केशवर मेनन, व्ही. एम. राजेश्वर, के. जयंती, आर. कृष्णकुमार, सरबारी सिन्हा आणि सैन्यअल अब्राहम यांचं अभिनंदन करायला हवं.
सध्याचा काळ हा घटना, वास्तव आणि सत्य यांच्या सरमिसळीचा काळ आहे. ‘घटना’च जणू काही वास्तव आणि अंतिम सत्य आहेत, अशा पद्धतीने आपल्यापुढे मांडण्याचं काम काही प्रसारमाध्यमांकडून होत आहे. वास्तववादाशी फारकत आणि सत्याशी गफलत असणा-या सध्याच्या काळात ‘फ्रंटलाइन’ची विश्वासार्हता मात्र अबाधित आहे.
बेस्ट ऑफ फ्रंटलाइन
२५ वर्षाच्या निमित्ताने ‘२५ इयर्स ऑफ एक्सलन्स इन जर्नालिझम’ हा ‘फ्रंटलाइन’चा विशेषांक नुकताच प्रकाशित झाला आहे. १७६ पानांच्या या विशेषांत ‘बेस्ट ऑफ फ्रंटलाइन’ ठरलेल्या निवडक ४६ लेखांचं पुनर्मुद्रण करण्यात आलं आहे. राजकारण, अर्थकारण, जातीयवाद, सामाजिक न्याय, जागतिक घडामोडी, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, इतिहास आणि विज्ञान अशा एकूण दहा विषयांमध्ये त्यांची विभागणी केली आहे. प्रत्येक विभागाच्या सुरुवातीला त्या क्षेत्रातील गेल्या २५ वर्षाच्या घडामोडींचा आढावा घेणारा एक निबंध समाविष्ट केला आहे.
‘राजकारण’ या पहिल्याच विभागातला ‘राजकीय स्थैर्य कसं येईल?’ हा निबंध ‘फ्रंटलाइन’चे मुख्य संपादक एन. राम यांनी लिहिला आहे. याशिवाय सी. पी. चंद्रशेखर, के. एन. पण्णीकर, एस. विश्वनाथ, जॉन चेरियन, जयंती घोष, आशीष कोठारी, पार्वती मेनन आणि आर. रामचंद्रन यांचे निबंधही आवर्जून वाचावेत असे आहेत. उर्वरित लेख ‘बेस्ट ऑफ फ्रंटलाइन’ असल्याने त्यांच्याबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. ते प्रत्यक्षच वाचायला हवेत.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा