मणिपूरमधील आर्थिक कोंडीचे 100 दिवस
मणिपूरमध्ये कुकी आणि नागा जमातींमधील मतभेदांतून सुरू झालेल्या आर्थिक कोडींला 100 दिवस पूर्ण झाले आहेत.
मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आर्थिक कोंडीला सोमवारी 100 दिवस पूर्ण झाले. मात्र, अद्यापही या कोंडीमुळे अडचणीत सापडलेल्या तेथील जनतेच्या समस्या कमी होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. कुकी आणि नागा या दोन जमातींमधील मतभेदाचा हा परिणाम आहे. एकीकडे कुकी जमातीच्या लोकांनी एक नोव्हेंबरपासून त्यांचे आंदोलन मागे घेतले असले तरी दुसरीकडे नागा जमातीने मात्र माघार घेतलेली नाही. राज्याच्या जीवनवाहिन्या असलेले इंफाळ-दिमापूर व इंफाळ-सिलचर महामार्ग त्यांनी रोखून धरलेले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. तासन् तास रांगा लावल्यानंतर एका लिटरला 240 रुपये मोजून पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. तर स्वयंपाकाच्या गॅससाठी तर एका सिलिंडरमागे 1900 रुपये मोजावे लागत आहेत.
या आर्थिक कोंडीची सुरुवात कुकींनी केली होती. नागा जमातीची अधिक संख्या असलेल्या सेनापती जिल्ह्यातून कुकींचे वर्चस्व असलेल्या वेगळ्या सदर हिल जिल्ह्याची निर्मिती करावी, या मागणीसाठी त्यांनी एक ऑगस्टपासून आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन ओकराम आयबॉबी सिंग प्रणित काँग्रेस सरकारने त्यांच्या मागण्यांवर जिल्हा फेररचना समितीचा अहवाल मिळाल्यानंतर विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचप्रकारे सदर हिल भागात आणखी तीन उपविभाग निर्माण करण्याची हमी दिली होती.
सरकारच्या या आश्वासनानंतर नागांमध्ये संतापाची लाट उसळली. आपल्याला विचारात न घेता सरकारने हे पाऊल उचलल्याबद्दल युनायटेड नागा कौन्सिलने कुकींच्या आंदोलनाला उत्तर म्हणून प्रतिआंदोलन सुरू केले. त्यांना विचारात न घेता नागाबहुल असलेल्या भागाचे विभाजन करण्याच्या प्रयत्नांना विरोध केला जाईल, असे सांगत त्यांनी 21 ऑगस्टपासून दोन महामार्ग रोखून धरले. मणिपूरमधील नागांसाठी पर्यायी प्रशासनव्यवस्था निर्माण करावी, अशीही त्यांची मागणी आहे.
या दोन्ही जमातींच्या आंदोलनाला मोडून काढण्याचा व आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयबॉबी सिंग यांनी दिला होता. मात्र, पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणा-या विधानसभा निवडणुका विचारात घेऊन आयबॉबी सरकारने कठोर कारवाईमध्ये चालढकल केली आहे. त्यातच या भागातील जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे आयबॉबींच्या लोकप्रियतेत घट होत चालली आहे. त्याचा फटका आगामी निवडणुकीत त्यांना बसण्याच्या शक्यतेमुळे ते धास्तावले आहेत. कुकींनी आंदोलन मागे घेतले असले तरी दुस-या बाजूने सुरू असलेल्या नागांच्या आंदोलनावर आता सरकार कोणता तोडगा काढते यावरच मणीपूरच्या जनतेचे भवितव्य अवलंबून आहे.




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा