PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: ढगफुटीचा कहर ढगफुटीचा कहर ================================================================================ संकलन : कोमल कुंभार on 10 August, 2010 07:50:00 AM परवा लेहमध्ये झालेल्या ढगफुटीमध्ये शेकडो लोकांचे प्राण गेले आणि शेकडो लोक आजही बेपत्ता असल्याचं सांगितलं जातंय. ढग फुटला आणि आभाळ फाटलं तर तक्रार कुणाकडे करायची, असं म्हणायची वेळ तिथल्या लोकांवर आली आहे. मुंबईमध्ये 26 जुलै 2005ला झालेल्या ढगफुटीचा अनुभव मुंबईकरांनी चांगलाच घेतला आहे. त्यानंतरही कुठेकुठे ढगफुटी होतच राहिली आणि त्याचा फटका त्या-त्या भागाला बसतच राहिला. अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरावरून मोसमी पाऊस वाहून नेणारे ढग (ज्यांना ‘गर्भार’ ढग असं म्हटलं जातं) उत्तरेकडे वाहू लागतात. मध्ये आलेल्या डोंगरांना ते अडतात आणि फुग्याला कुणी भस्सकन पीन टोचावी तसे ते धबाधबा कोसळू लागतात. ताशी किमान 100 मिमी (3.94 इंच) एवढा मोठा पाऊस पडतो. हा पडणारा पाऊस खूप जास्त उंचीवरून म्हणजे कधी कधी तब्बल 15 किलोमीटर अंतरावरून पडत असतो. अवघ्या काही मिनिटांमध्ये दोन सेंटिमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडू शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. पावसाचे हळूहळू पडणारे छोटे थेंब मोठ्या थेंबांशी मिसळून जातात आणि तो अक्षरश: झोडपून काढतो. मुंबईत 26 जुलै रोजी अवघ्या आठ ते दहा तासांमध्ये 950 मिमी पावसाची नोंद झाली होती. या पावसाने भारताची आर्थिक नाडी थंडावून गेली होती. हिमाचल प्रदेशसारख्या उंचावरच्या ठिकाणी ढगफुटीचे प्रकार वारंवार होत राहतात. त्यामुळे या परिसराला आता त्याची जवळपास सवयच झाली आहे. पाऊस मोठा लहरी आहे. मोसमी पावसाच्या या लहरीपणाचा फटका कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण भारतीय उपखंडाला बसू लागतोय असं दिसतंय. मुंबई आणि महाराष्ट्राला 2005 मध्ये महापुराला तोंड द्यावं लागलं तर 2009 मध्ये दुष्काळाचा सामना करावा लागला. ग्लोबल वॉर्मिगसारख्या गोष्टींचा परिणामही पावसावर होतोय. ढगफुटीच्या घटना 31 ऑगस्ट 1960- मंडी आणि सुकेती द-यांमध्ये तीन तासांत 50 मिमी पावसाची नोंद. 103 लोक मृत्युमुखी जुलै 1970- अलकनंदा नदीच्या उगमाजवळ झालेल्या पावसाने नदीच्या पातळीत 15 मीटरची वाढ. बद्रीनाथच्या हनुमानतचट्टी ते हरिद्वापर्यंत मोठं नुकसान. अख्खं गाव वाहून गेलं. 15 ऑगस्ट 1997- सिमल्यातल्या चिरगाव इथे झालेल्या ढगफुटीच्या घटनेत 115 लोक मारले गेले. 17 ऑगस्ट 1998- रोजी कुमाऊँ इथल्या काली दरीजवळ झालेल्या ढगफुटीनंतर 250 लोक मृत्युमुखी पडले. त्यातील 50 लोक कैलास मानसरोवरचे यात्रेकरू होते. 16 जुलै 2003- कुलू इथल्या शिलागढ येथे झालेल्या ढगफुटीत 40 लोक मृत्युमुखी पडले. सहा जुलै 2004- उत्तरांचलमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे अलकनंदा नदीत गाड्या वाहून गेल्या. 17 मृत्युमुखी आणि २८ जखमी 16 ऑगस्ट 2007- घान्वीमधल्या भावी गावात 52 जणांचा मृत्यू सात ऑगस्ट 2009- उत्तराखंडमधल्या पिठोरागढ जिल्ह्यात 38 जणांचा मृत्यू