PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: पक्षी जाय दिगंतरा.. पक्षी जाय दिगंतरा.. ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 10 August, 2010 03:45:00 AM मलेरिया आणि बर्ड-फ्लूच्या छायेत आपण सारे जण वावरत असताना, जगभरचे संशोधक बर्ड-फ्लूचा मागोवा घेत आहेत. स्थलांतर करणा-या पक्ष्यांच्या पंखातील स्ट्रॉन्टियम धातूची जी विविध रूपे आढळतात, त्यावरून त्यांच्या स्थलांतराचा मार्गच नव्हे तर त्यांच्याठायी बर्ड-फ्लूचे विषाणू आहेत का, याचा अंदाज घेता येतो. इंग्लंडमधील डरहॅम युनिवर्सिटीच्या डॉ. लॉरा फोन्ट आणि त्यांच्या चमूने ‘थर्मल मास स्पेक्ट्रोस्कोपी’ या आत्याधुनिक उपकरणाच्या सहाय्याने पक्ष्यांच्या पंखात असलेली स्ट्रोन्टियम धातूची समस्थानके (्र२३स्री२) विश्लेषित करून, त्यांच्यात भौगोलिक परिस्थितीनुसार फरक कसा घडून येतो, त्याचा अभ्यास केला. (अणूच्या रचनेत त्याच्या केंद्रकातील प्रोटोन कण सारखे असतात, पण न्युट्रॉन कण भिन्न संख्येचे असतात, तेव्हा त्या वेगळ्या रूपांना त्या अणूचं समस्थानक म्हणून संबोधलं जातं.) या पूर्वी स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचा अभ्यास करताना, त्यांच्या पायाला छोटंसं पण मजबूत कडं बांधणं, रेडियो खूणक वापरणं किंवा पक्ष्यांच्या जत्थ्यांची मोजमाप करणं यासारखी तंत्रं वापरली जात. पण या पद्धती वेळखाऊ नि क्लिष्ट होत्या. स्थलांतर करणा-या पक्ष्यांचं वैशिष्ट्य असं असतं की, ते दीर्घ प्रवासाला निघताना पंखातली जुनी पिसं गळून टाकतात व नवीन पिसं धारण करतात. विशेष म्हणजे, ही पिसं ज्या भौगेलिक विभागात वाढतात त्या विभागाचं ते प्रतिनिधित्व करतात. ती त्या त्या पक्ष्याची एक प्रकारे ‘आण्विक सही’ (्र२३स्र््रू २्रॅल्ल) असते. जरी पक्ष्याच्या पंखात असलेल्या कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन अणूच्या समस्थानकावरून त्यांच्या भौगोलिक स्थलांतराची साधारण कल्पना येत असली तरी त्यांच्या असलेल्या स्ट्रॉन्टियम धातूच्या प्रमाणावरून त्यांच्या फेरफटक्याचा ठावठिकाणा अधिक अचूकतेने सांगता येतो. एकदा का त्यांच्या येण्याजाण्याचा मार्ग समजला की त्यांच्याठायी रोग पसरवणारे रोगजंतू असावेत का, याचाही अंदाज घेता येतो. त्यामुळे विशिष्ट विभागात पसरलेली तापाची साथ नेमकी कशामुळे पसरली आहे, हे शोधून काढण्यास मदत होते. पक्ष्यातील एन्फ्लुएन्झा विषाणूमुळे पसरणारा बर्ड-फ्लू किंवा एव्हियन फ्लू हा रोग 1900 प्रारंभी इटलीमध्ये आढळून आला होता. त्या विषाणूचा एक वाण म्हणजे ‘एच५एन१’. हा सर्वात घातक विषाणू असून तो पक्षी, डुकरं, घोडे, व्हेल आणि सील मासे तसंच मानवी देहाला ग्रासत असतो. स्थलांतर करणारे पक्षी एकावेळी हजारो मैलाचा प्रवास करीत असतात. वाटेत ते टोळीने थांबतात, पोट्यापाण्याची व्यवस्था करतात, थोडी विश्रांती घेतात नि पुन्हा उडू लागतात. तसंच ही वाटचाल सुरू असताना त्यांना आपल्या शिका-यापासून स्वत:चं रक्षणदेखील करावं लागतं. अमेरिकेतील पुर्डू युनिवर्सिटीतील पक्षी निरीक्षकांना आढळून आलंय की, हे स्थलांतर करणारे पक्षी मोठमोठ्या घनदाट जंगल भागात आसरा घेण्याचं जास्त पसंत करतात. परंतु अशा प्रकारचे छोटे वनविभाग झपाटय़ाने इथेनॉलसारख्या जैविक इंधनाच्या उत्पादनाखाली आणले जात असल्यामुळे या पक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात येत आहे. एका बाजूने ‘विस्कोन्सिन युनिवर्सिटी’तील संशोधक रुथ बॅन्का यांच्यामते स्थलांतर होणा-या काळात मिळणा-या कमी झोपेमुळे पक्षी क्षीण बनतात असा समज होता तो खरा नाही. हे पक्षी गतिमान असतानादेखील अन्नाच्या मोहाला बळी पडतात. कॅनडातील फ्रेझर युनिवर्सिटीतील डॉ. विलियम्स् यांच्या निरीक्षणानुसार मोक्सिको आणि अलास्का येथून उडणारे पक्षी आपलं वजन वाढवतात. सतत उडत राहणा-या पक्ष्यांच्या पचनसंस्थेत बदल घडून येतो व त्यांची चयापचय क्रिया शीघ्रगतीने व चांगल्या रीतीने घडून येते, हे त्यामागचं कारण असावं. हवामान बदलाचादेखील पक्ष्यांच्या स्थलांतरावर परिणाम होत आहे. वाढतं तापमान व पक्ष्यांच्या दैनिक सवयीत होणारे बदल शास्त्रज्ञांनी टिपले असून, पक्षी आपल्या स्थलांतराचे अंतर वाढवत असल्याचं त्यांच्या लक्षात येत आहे. डरॅहम युनिवर्सिटीचे आणखी एक पक्षीतज्ज्ञ डॉ. स्टीफन विल्स यांच्या मते, ही काही चांगली बातमी नव्हे. त्यांच्या अंदाजानुसार सुमारे 50 कोटी पक्षी आफ्रिका खंडातून अन्न आणि आस-याच्या शोधात युरोपियन व आशिया खंडात जातात. एखादा नऊ ग्रॅम वजनाएवढा पक्षी दरवर्षी हजारो मैलाचे अंतर कापत एका खंडातून दुस-या खंडात पोहोचत असतो. वाटेत येणा-या सहारा वाळवंटाचीदेखील या पक्ष्यांना तमा नसते. पण दुर्दैवाने या स्थलांतर करणा-या विविध जातीच्या पक्ष्यांची संख्याही आता रोडावत आहे व त्याला जंगलतोड, वाढती शेती, भूपृष्ठाचं होणारे वाळवंटीकरण आणि हवामानबदल ही मुख्य कारणं आहेत.