बायकांना माझी भीती वाटते..
एकटय़ा राहणा-या बाईला जगण्याचं स्वातंत्र्य असतं का, असा प्रश्नच पडतो खरंतर हे ऐकून. पुरुषाची संगत नको म्हणूनच ब-याचदा एकटं राहण्याचा निर्णय घेतला जातो. मग, एकटी राहणारी बाई सतत फक्त पुरुषाचा विचार कशाला करेल? आणि या बायकांना इतकी का भीती वाटते? स्वत:च्या नव-यावर विश्वास नसतो का त्यांचा?’
माझी एक मैत्रीण आहे. वय वर्ष 58 फक्त. तरीही चिरतरुण वर्गातली. काही वर्षापूर्वी तिचा घटस्फोट झालाय. या वयातही ती नोकरी करून पैसे कमावते आणि हौसेने ते खर्चही करते. बोलण्यावागण्यात तर मलाही लाजवेल इतका मोकळेपणा. कधीतरी आमच्या छान शिळोप्याच्या गप्पा रंगतात. एकदा तिला सहजच म्हटलं, ‘तुझी काय मज्जा आहे. एकटीच राहतेस. काही झंझट नाही.’ तर ती उत्तरली, ‘असं वाटतं गं सगळ्यांना. पण एकटं राहणा-या बाईची आणि त्यातही घटस्फोट घेऊन एकटं राहणा-या दु:खं वेगळी असतात.’ हे वाक्य ऐकल्यानंतर साधारणपणे ही दु:खं शारीरिक संबंधांबद्दलची असतील, असं कुणालाही वाटेल. पण तिनं मांडलेली दु:खं थोडी वेगळी होती. तिच्याच शब्दांत सांगायचं तर..‘त्याचं काय घेऊन बसलीस. एका वयानंतर नवरा-बायकोमध्ये तरी ते कितपत असतात? चांगल्या नात्यामध्ये सोबत महत्त्वाची असते. आणि अगदी खरं सांगायचं तर पुरुष असो की स्त्री, याबाबतीत प्रत्येक जण स्वत:ची योग्य ती सोय लावतोच.
पण माझा प्रॉब्लेम तो नाही. आता माझी नात मोठी होतेय. पण, अजूनही बायकांना माझी भीती वाटते. मी त्यांच्या नव-यांना पटवेन, असं त्यांना वाटतं. या बायकांची नजरच मला बरंच काही सांगून जाते. मला काय आयुष्यात दुसरं काही कामच नाही? चालता-बोलता काय मी फक्त समोरचा पुरुष मला कसा पटेल, याचाच विचार करत असते की काय? सोसायटीच्या मीटिंगमध्ये तर यांच्या नव-यानी माझ्याशी बोलायचंही नाही, अशी ताकीद असावी की काय अशी शंका येते. केवढी ही इनसिक्युरिटी? आसपासच्या सगळ्या बायकांना माझ्या नव-यावर कुणीही बाई लगेच फिदा होईल. पण तो अजिबात त्यातला नाही, असं वाटतं. मात्र, हेच नवरे बायका सोबत नसल्या की, माझ्या नावापुढचं ‘ताई’ संबोधन वगळून बोलतात माझ्याशी, हे त्यांना ठाऊक नसावं.
माझ्याकडे कोणत्या वेळेला कोण येतं, कोण जातं, मी कधी बाहेर जाते अशा अनेक गोष्टींकडे यांचं नको इतकं बारीक लक्ष असतं. त्यातून मग कधीमधी मला सल्लेवजा सूचनाही केल्या जातात. तुम्ही मुली ठेवा पेइंग गेस्ट म्हणून, कोणीतरी सोबतीला असायला हवं वगैरे वगैरे..
एकटय़ा राहणा-या बाईला जगण्याचं स्वातंत्र्य असतं का, असा प्रश्नच पडतो खरंतर हे ऐकून. पुरुषाची संगत नको म्हणूनच ब-याचदा एकटं राहण्याचा निर्णय घेतला जातो. मग, एकटी राहणारी बाई सतत फक्त पुरुषाचा विचार कशाला करेल? आणि या बायकांना इतकी का भीती वाटते? स्वत:च्या नव-यावर विश्वास नसतो का त्यांचा?’
जाता जाता : यात तिचं एक वाक्य मात्र मनाला चटका लावून गेलं, ‘कोणतीच बाई आनंदाने आणि फक्त मला आता एकटीला जगायचंय, या कारणासाठी स्वत:चा संसार मोडत नाही, हे एक बाई म्हणून तरी यांनी समजून घ्यायला हवं.’




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा