धान्यापासून मद्यनिर्मिती शेतक-याच्या हिताचीच!
धान्यापासून मद्यनिर्मिती करायची की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवत असतानाच धान्यांपासून मद्यनिर्मिती करण्याचा निर्णय शेतक-याचे हित डोळय़ांसमोर ठेवूनच घेतला आहे, असे मत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी मांडले.
लातूर- धान्यापासून मद्यनिर्मिती करायची की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवत असतानाच धान्यांपासून मद्यनिर्मिती करण्याचा निर्णय शेतक-याचे हित डोळय़ांसमोर ठेवूनच घेतला आहे. त्यामुळे हा शेतक-याच्या फायद्याचाच निर्णय आहे, असे मत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी मांडले.
लातूरमध्ये देशमुख पत्रकारांशी बोलत होते. ‘महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले जाते. ज्वारी काळी झाली की, ती सरकारच्या गोदामात पडून राहते. कालांतराने ही ज्वारी सडते. त्याचे काय करायचे, हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर २००२मध्ये या सडलेल्या ज्वारीपासून मद्यनिर्मिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. शेतक-यांच्या काळय़ा ज्वारीस न्याय देण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे विलासराव देशमुख यांनी सांगितले. पावसाळय़ात ज्वारी काळी झाल्यानंतर ही ज्वारी खरेदी करावी म्हणून शेतक-यांचे मोर्चे निघतात. आंदोलने केली जातात. त्यामुळे या ज्वारीपासून मद्यनिर्मिती करण्याचा प्राथमिक निर्णय २००२मध्ये घेतल्यानंतर २००७मध्ये याबाबतचा अंतिम निर्णय झाल्याचे देशमुख यांनी सांगितले. आता हा प्रश्न न्यायालयाच्या क्षेत्रात असल्याने त्याबाबत अधिक बोलणे योग्य नाही. न्यायालय घेईल त्या निर्णयाची अमलबजावणी करण्यास सरकार बांधील राहील, असे देशमुख म्हणाले.
काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा ठासून मांडत आहेत. याबाबत विचारले असता, ती त्यांची वैचारिक भूमिका असल्याचे देशमुख म्हणाले. मी स्वत: संयुक्त महाराष्ट्रवादी असल्याचे विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केले.


del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा