PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: कौटुंबिक वैमनस्यातून बालकाची हत्या कौटुंबिक वैमनस्यातून बालकाची हत्या ================================================================================ प्रहार वार्ताहर on 10 March, 2010 05:15:00 PM भंडारा- शेजारी राहणा-या युवकाने कौटुंबिक वैमनस्यातून उकळत्या कढीच्या गंजात टाकलेल्या तीन वर्षाच्या बालकाचा मंगळवारी मृत्यू झाला. लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे काही दिवसापूर्वी ही घटना झाली होती. येथील विश्वनाथ बावनकुळे नावाच्या तरुणाचे त्याच्या शेजारी राहणा-या सुरेश राऊत यांच्याशी क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. तरीही विश्वनाथ हा राऊत यांचा मुलगा आदित्य याला खेळवायचा. सुमारे दोन आठवडय़ापूर्वी विश्वनाथच्या गावातील नातेवाईकाकडे साक्षगंधाचा कार्यक्रम होता. सायंकाळी जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना विश्वनाथने अंगणात खेळत असलेल्या आदित्यला बळजबरीने उचलून नेले. मद्यधुंद अवस्थेतील विश्वनाथने आदित्यला घराच्या मागील बाजूस नेऊन उकळत्या कढीच्या गंजात टाकले. यावेळी विश्वनाथचा हातही भाजला. स्वयंपाकघरात उपस्थित असलेल्या लोकांनी आदित्यला बाहेर काढले. 60 टक्के भाजलेल्या आदित्यला प्रथम लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करून नंतर,चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात हलवण्यात आले होते. गेले दोन आठवडे आदित्यवर उपचार चालले होते. मात्र मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. घटनेच्या दुस-या दिवशी स्वत:हून पोलिस ठाण्यात आलेल्या विश्वनाथला अटक करण्यात आली आहे. आदित्यचा मृत्यू झाल्याने त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.