PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: कोकण रेल्वे बनली ‘दक्षिण व उत्तर’ रेल्वे कोकण रेल्वे बनली ‘दक्षिण व उत्तर’ रेल्वे ================================================================================ नंदू पेडणेकर on 12 March, 2010 07:15:00 AM सावंतवाडी- कै.अ.बा.वालावलकरांपासून ते बॅ.नाथ पै, प्रा.मधु दंडवते यांचे आणि तमाम कोकणवासीयांचे स्वप्न असलेली कोकण रेल्वे प्रा.दंडवते यांच्याच पुढाकाराने तसेच जॉर्ज फर्नाडिस यांच्या कल्पकतेमुळे बारा वर्षापूर्वी सुरू झाली. या रेल्वेमुळे कोकणचा विकास होईल, रोजगार निर्माण होईल या आशेने कोकणातील भूमिपुत्रांनी लाखमोलाच्या जमिनी दिल्या. परंतु आज एका तपानंतर ही कोकण रेल्वे त्यांची राहिलेली नाही. कोकणातून जात असली तरी ही रेल्वे गोव्यासह दक्षिणेतील राज्य थेट उत्तरेतील राज्यांशी जोडली गेली असल्याने तेथील प्रवाशांनाच याच मार्गाचा अधिक उपयोग होत आहे. अवघ्या दोन पॅसेंजर गाड्या आणि एक कोकणकन्या इतक्याच गाड्या कोकणाच्या वाट्याला आल्या असल्या तरी या गाड्या गोव्यावरून येत असल्याने कोकणवासीयांना गर्दीच्या हंगामात सोडाच पण अन्य हंगामातही साध्या ऑर्डिनरी डब्यातदेखील जागा मिळत नसल्याची परिस्थिती आहे. सावंतवाडी-दादर अशी नवीन गाडी सुरू करण्याबरोबरच कोकण रेल्वेचा मार्ग दुपदरी करावा, या मागणीलाही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने कोकणाची उपेक्षा सुरूच आहे. कोकणातील नदीनाले, डोंगरद-या पार करीत कोकण रेल्वे उभारणीचे आव्हान महामंडळाच्या अधिका-यांनी आणि कर्मचा-यांनी पेलले आणि एक तपापूर्वी कोकण रेल्वे सुरू झाली. परंतु सध्या ही रेल्वे कोकणची राहिलेली नाही. सुसाट वेगाने जाणा-या एक्सप्रेस गाड्या पाहणे आणि पॅसेंजर गाडीतून लोंबकळणे एवढेच कोकणी माणसांच्या हाती राहिले आहे. या मार्गावरून 15 हून अधिक एक्सप्रेस गाड्या रोज धावतात. त्यातील काही गाड्यांना सिंधुदुर्गचा थांबा असला तरी त्याचे आरक्षण करणे म्हणजे अग्निदिव्यच असते. या गाड्या दीर्घपल्ल्याच्या असतात. थेट नवी दिल्लीहून सुटणारी एक्सप्रेस गाडी मुंबईमार्गे गोवा-केरळकडे पुढे दक्षिणेकडील राज्यात जाते. तर दक्षिणेतील सर्वच स्टेशने उत्तर प्रदेशशी जोडली गेल्याने दक्षिण आणि उत्तर प्रांतातील लोकांना कोकण रेल्वे सध्या मोठा आधार बनली आहे. कोकणमधील जनता मुंबईशी संबंधित आहे. सावंतवाडी ते मुंबई असाच प्रवास कोकणी जनता करत असते. परंतु त्यांच्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाने इन मिन तीनच गाड्या सुरू केल्या आहेत. दिवा, मांडवी या पॅसेंजर गाड्यांबरोबरच कोकणकन्या एक्स्प्रेस यांचाच आधार कोकणी जनतेला आहे. मात्र या तिन्ही गाड्यांत हंगाम अगर बिगर हंगाम एकच गर्दी असते. साध्या ऑर्डनरी डब्यातही तोबा गर्दी असते. परिणामी अर्ध्याहून अधिक गाडी गोव्यातून हाऊसफुल्ल होते आणि नंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील स्टेशनवर ती जणू पॅकबंद होते. सावंतवाडी-दादर गाडीची गरज या पार्श्वभूमीवर सावंतवाडी-दादर अशी गाडी दररोज सोडल्यास कोकणातील जनतेची मोठी सोय होणार आहे. परंतु सावंतवाडीत टर्मिनस नाही, दादरवरून गाडी सोडण्याची सोय नाही, अशी तांत्रिक कारणे रेल्वे प्रशासन पुढे करीत आहे. कोकण रेल्वे मार्ग दुपदरी करावा, अशी मागणी गेल्या काही वर्षापासून केली जात आहे. हा दुपदरी मार्ग करणे व्यवहार्य असल्याचा अहवाल रेल्वे प्रशासनाने दिला आहे. मात्र तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याची सूचना या अहवालात आहे. परंतु याचीही दखल घेतली गेलेली नाही.