PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: नक्षलवादविरोधाचा ‘छत्तीसगड पॅटर्न’ महाराष्ट्रात नक्षलवादविरोधाचा ‘छत्तीसगड पॅटर्न’ महाराष्ट्रात ================================================================================ रामराजे शिंदे on 25 August, 2010 01:10:00 AM मुंबई- छत्तीसगडमधील नक्षलवाद थोपवण्यात यशस्वी ठरलेले एकाच बॅचचे ताज्या दमाचे पाच पोलिस अधिकारी‘पाच पांडव’म्हणून चर्चेत आले असताना, महाराष्ट्र सरकारनेही गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात हाच‘छत्तीसगड पॅटर्न’राबवत एकाच बॅचच्या तीन अधिका-यांना एकत्र आणले आहे. या अधिका-यांतील मैत्रीमुळे त्यांच्यात समन्वय राहील आणि कामगिरीही फत्ते होईल, या उद्देशाने सरकारने छत्तीसगडमध्ये यशस्वी ठरलेली‘पांडवनीती’येथे अमलात आणली आहे. नक्षलवादाला संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र पोलिस प्रशासनाने आखलेल्या आक्रमक धोरणाचा एक भाग म्हणून 2005च्या बॅचमधील सुवेझ हक यांना गोंदियात, मनोजकुमार शर्मा यांना चंद्रपूर तर, विरेश प्रभू यांना गडचिरोलीत पोलिस अधीक्षक म्हणून पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, छत्तीसगडमधील‘पाच पांडव’म्हणून ओळखले जाणारे पोलिस अधीक्षक अविनाश मोहंती (बिजापूर), राहुल भगत (नारायणपूर), अजय यादव (कांकेर), सुंदरराज पी. (बस्तर) आणि अमरेशकुमार मिश्रा व हे तिघे 2005च्या बॅचचेच सहध्यायी आहेत. भारतीय पोलिस सेवेत दाखल झाल्यानंतर अधिका-यांना हमखास नक्षलग्रस्त भागात काम करावे लागते. हुशार आणि तरुण अधिका-यांनाच या भागात पाठवण्यात येते. छत्तीसगड भागात नक्षलवाद्यांचे मोठे आव्हान आहे. त्या ठिकाणी पाठवलेल्या अधिका-यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत होता. केंद्र सरकारने या अपयशाची गंभीर दखल घेत, नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे तसेच उपाययोजना आखण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार छत्तीसगडमधील पाच जिल्ह्यांत बॅचमेट असलेल्या पाच अधिका-यांना एकत्र आणले गेले. एकाच बॅचचे असल्यामुळे त्यांच्यात उत्तम समन्वय आणि योजनांची प्रभावी अमलबजावणी असा परिणाम दिसून आला. या अधिका-यांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईमुळे काही प्रमाणात नक्षलींना थोपवणे शक्य झाले. त्यांच्या या कामगिरीमुळेच पोलिस विभागांत तसेच, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, स्थानिक जनतेतही हे अधिकारी‘पाच पांडव’म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. तोच छत्तीसगड पॅटर्न यंदा महाराष्ट्रात अमलात आणत, एकीकडे छत्तीसगड तर, दुसरीकडे महाराष्ट्रातून नक्षलवाद्यांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत.