Home | काँग्रेस १२५ | ऑगस्ट क्रांती मैदानात आज काँग्रेसजनांची मांदियाळी

ऑगस्ट क्रांती मैदानात आज काँग्रेसजनांची मांदियाळी

 मुंबई- काँग्रेस पक्ष सोमवारी १२५व्या वर्षात पदार्पण करतो आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसच्या वतीने पुढील वर्षभरात विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. राज्यातील पक्षाच्या सर्व कार्यालयात सोमवारी सकाळी ध्वजारोहण आणि महापुरुषांना वंदन करण्यात येणार आहे. याशिवाय २८ डिसेंबर २००९ ते २८ डिसेंबर २०१० पर्यंत १२५ व्या वर्षासाठी विविध कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते बस्वराज पाटील-नागराळकर यांनी दिली.  मुंबई काँग्रेसच्यावतीने सोमवारी सकाळी साडेआठवाजण्याच्या सुमारास राजीव भवन येथे झेंडावंदन करण्यात येणार आहे. मुंबईत काँग्रेसच्या स्थापनेचे आणि पुढे १९४२च्या चलेजावना-याचे साक्षीदार ठरलेल्या ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करून महापुरुषांना मानवंदना देण्यात येणार आहे.

सोमवारपासूनच (२८ डिसेंबर) वर्षभरातल्या विविध उपक्रमांना सुरुवात केली जाणार आहे. विविध दिनविशेषांच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना फळवाटप, ग्रामस्वच्छता, रक्तदान शिबिरे, राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, राष्ट्रभक्तीपर जनजागृती कार्यक्रम, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार, सदस्य नोंदणी वाढवणे, काँग्रेसचा संदेश गावोगावी पोहोचवणे असे उपक्रम पुढच्या २८ डिसेंबर २०१० पर्यंत राज्यभरात राबवण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

 

काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपतपराय, सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, इंदिरा गांधी, राजीव गांधी या काँग्रेसनेत्यांबरोबरच, रूढार्थाने काँग्रेसशी नाव जोडले न गेलेले भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद तसेच थोर आदिवासी स्वातंत्रसेनानी बीरसा मुंडा यांनाही काँग्रेसतर्फे मानवंदना देण्यात यावी, असे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने कळवले आहे.

 वर्षभरात राज्य पातळीपासून तालुक्यांपर्यंत कायकाय कार्यक्रम घेता येतील, याच्या सूचनाही काँग्रेसच्या केंद्रीय समितीने सर्व राज्यांना याआधीच पाठवल्या आहेत. कार्यक्रमांचे स्वरूप ठरवण्यासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली १९ सदस्यांची समिती कार्यरत होती. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, पक्षाचे सरचिटणीस व युवा नेते राहुल गांधी यांचा समावेश या समितीत होता.