सलामीचा गंभीर प्रश्न
मुंबई- मायदेशात इंग्लंड आणि वेस्ट इंडिजला सहज हरवणा-या भारताला ऑस्ट्रेलिया दौ-यात विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. भारताची अस्थिर फलंदाजी (त्यातच सलामी) पराभवाचे प्रमुख कारण ठरत आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यातील गेल्या 10 डावांत भारताची सर्वाधिक सलामी 26 धावांची आहे. सलामीचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, त्याचा सहज अंदाज येतो.
96 कसोटी आणि 241 वनडे सामन्यांचा अनुभव असलेला वीरेंदर सेहवाग तसेच 48 कसोटी आणि 125 वनडे सामने खेळलेला गौतम गंभीरवर सध्या भारताच्या सलामीची धुरा आहे. बिनीच्या जोडीला आवश्यक अनुभव दोघांकडेही आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत मैदानावर त्यांचे सूर जुळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मोठी धावसंख्या उभारण्यासाठी किंवा मोठय़ा धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दमदार सलामी आवश्यक असते. कुठल्याही संघाच्या बहरलेल्या फलंदाजीत सलामीचा मोठा वाटा राहिला आहे. वाईट आणि ढिसाळ सलामीमुळे भारताच्या मधल्या फळीवर अधिक ताण येत आहे. विक्रमवीर सचिन तेंडुलकरसह ‘द वॉल’ राहुल द्रविड आणि ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मणने मायदेशात इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध भारताला तारले. परिणामी सलामीवीरांचे अपयश झाकले गेले. मात्र ऑस्ट्रेलिया दौ-यात सिनियर्सनाही ‘मामा’ बनवण्यात यजमान गोलंदाजांना यश आल्याने भारताचे तीन तेरा वाजले नि सलामीचे अपयश निदर्शनास आले.सलामीवीरांना नव्या चेंडूचा सामना करायचा असतो. त्यामुळे त्यांच्या संयमाची परीक्षा लागते. प्रत्येक चेंडूला पारखून खेळतानाच प्रतिस्पर्धी गोलंदाजाला निष्प्रभ करण्याचे कसबही त्यांच्याकडे असावे लागते. दोन्ही सलामीवीरांचा ‘ऑफ स्टंप’ अधिक ‘परफेक्ट’ असावा लागतो. ऑफ स्टंपवरील चेंडू सराईत आणि सहज खेळणाराच सवरेत्तम सलामीवीर नव्हे तर सवरेत्तम फलंदाज असतो. सेहवाग असो किंवा गंभीर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात या सलामीच्या दुकलीलाच नव्हे तर सिनियर्सनाही ‘ऑफ स्टंप’ कुठे आहे, हेच कळले नाही. वास्तविक पाहता भारताच्या अधिकाधिक फलंदाजांचा तो ‘विक पॉइंट’ आहे.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पाहुण्यांच्या कमकुवत बाबी हेरल्या. वास्तविक पाहता भारताच्या फलंदाजांनाही चुका सुधारण्याला वाव होता. मात्र त्यांनी सरावाला प्राधान्य दिले नाही. विक्रमादित्य सुनील गावस्करांनी ‘टीम इंडिया’च्या या कमकुवत बाबीवर बोट ठेवले. मात्र गांभीर्याने घेतील तर ते भारतीय कुठले? भारताकडे सलामीसाठी फारच कमी पर्याय आहेत. त्यामुळे सेहवाग आणि गंभीरने वेळीच सावरायला हवे. तरच संघ सावरेल.
सलामीची दशा (तिरंगी मालिका)
विरुद्ध | धावा | जोडी |
| श्रीलंका | 14 | (सेहवाग - तेंडुलकर) |
| ऑस्ट्रेलिया | 9 | (तेंडुलकर - गंभीर) |
कसोटी मालिका (वि. ऑस्ट्रेलिया)
- चौथी 26 आणि 14- (सेहवाग - गंभीर)
- तिसरी 4 आणि 24
- दुसरी 0 आणि 18
- पहिली 22 आणि 17
गत 10 डावांतील
सलामीवीरांची कामगिरी(कसोटी, वनडे मिळून)- सेहवाग 228 धावा (तीन अर्धशतके)
- गंभीर 248 धावा (दोन अर्धशतके)
