पुरावे संपले आता युक्तिवाद
पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमिर कसाब तसेच भारतीय संशयित फहीम अन्सारी व सबाउद्दीन शेख यांच्याविरोधात आर्थर रोड तुरुंगातील विशेष न्यायालयात सुरू असलेल्या ‘२६/११’ खटल्यात बुधवारी सुनावणीच्या १७२व्या दिवशी साक्षीपुराव्यांचे काम संपले
मुंबई- पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमिर कसाब तसेच भारतीय संशयित फहीम अन्सारी व सबाउद्दीन शेख यांच्याविरोधात आर्थर रोड तुरुंगातील विशेष न्यायालयात सुरू असलेल्या ‘२६/११’ खटल्यात बुधवारी सुनावणीच्या १७२व्या दिवशी साक्षीपुराव्यांचे काम संपले. आता सरकारी पक्ष व बचाव पक्षाकडून युक्तिवाद झाल्यानंतर विशेष न्यायालयाकडून निकाल सुनावला जाईल. दोन्ही पक्षांना युक्तिवादाची तयारी करता यावी, यासाठी न्या. एम. एल. टहलियानी यांनी सुनावणी २० फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली. त्या अनुषंगाने येत्या दोन ते तीन महिन्यांत निकाल लागण्याची अपेक्षा आहे.
प्रत्यक्ष साक्षीपुरावे नोंदीचे काम ८ मेपासून सुरू झाले. सरकारी पक्षाने ६१० साक्षीदारांच्या साक्षी सादर केल्या. त्यानंतर न्यायालयाने कसाबला १५६० प्रश्न विचारले. मात्र त्याने सर्वच प्रश्नांच्या उत्तरांत हल्ल्याशी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले. फहीमनेही तसेच सांगून आपल्याला यात गोवले असल्याचा दावा केला. सबाउद्दीनलाही (आरोपी क्रमांक ३) बुधवारी यासंदर्भात न्यायाधीशांनी प्रश्न विचारले. तेव्हा ‘आपण कधी नेपाळला गेलोच नाही. त्यामुळे मुंबईतील हल्ल्याच्या ठिकाणांचे नकाशे फहीमकडून आपण काठमांडूमध्ये घेतले, हे सरकारी पक्षाचे म्हणणे साफ खोटे असून त्याबाबत फहीमचा तथाकथित मित्र, नुरुद्दीन शेखने दिलेली साक्षही खोटी आहे. नुरुद्दीनला आपण येथे न्यायालयातच प्रथम पाहिले’, असे सबाउद्दीनने सांगितले. यानंतर न्या. टहलियानी यांनी साक्षीपुरावे संपले असल्याचे नमूद करत दोन्ही बाजूंना युक्तिवादाच्या तयारीसाठी तीन आठवडय़ांहून अधिक काळ दिला. युक्तिवाद सुरू करण्याची तयारी आहे का, याविषयी २० फेब्रुवारीला सांगा, असे निर्देश विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व कसाबचे वकील अॅड्. के. पी. पवार यांच्यासह अन्य वकिलांना देऊन न्यायाधीशांनी तोपर्यंत सुनावणी तहकूब केली.



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा