‘स्वाभिमान’कडून कोका-कोलाला ताकीद
मुंबईकरांवर भीषण पाणीटंचाईचे संकट घोंघावत असतानाच वाडा येथील वैतरणा प्रकल्प तलावाला थेट जलवाहिन्या जोडून पाणी मिळवणा-या ‘कोका-कोला’ या शीतपेय उत्पादक कंपनीला ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी ताकीद देणारे पत्र लिहून या पाण्याचा वापर करणे बंद करा, असा इशारा दिला आहे.
मुंबई- मुंबईकरांवर भीषण पाणीटंचाईचे संकट घोंघावत असतानाच वाडा येथील वैतरणा प्रकल्प तलावाला थेट जलवाहिन्या जोडून पाणी मिळवणा-या ‘कोका-कोला’ या शीतपेय उत्पादक कंपनीला ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी ताकीद देणारे पत्र लिहून या पाण्याचा वापर करणे बंद करा, असा इशारा दिला आहे. महापालिका आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनादेखील या प्रकरणी लक्ष घालून हा पाणीपुरवठा त्वरित बंद करण्याची विनंती केली असून हा पाणीपुरवठा बंद न झाल्यास ‘स्वाभिमान’च्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा दिला आहे.
वैतरणा तलावापासून सहा किलोमीटर अंतरावर वाडा येथे कोका- कोलाचा प्रकल्प आहे. तलावाजवळ बसवण्यात आलेल्या पंपहाऊसद्वारे तलावातून सातत्याने मोठय़ा प्रमाणात पाणी कोका-कोला कंपनीमध्ये खेचले जाते. या कंपनीच्या प्रकल्पामध्ये १० हजार लीटर क्षमतेच्या सुमारे ९० ते १०० पाण्याच्या टाक्या आहेत. त्या दिवसातून दोनदा भरण्यात येतात. एकीकडे घरगुती वापरासाठीच्या पाणीपुरवठय़ात १५ टक्के पाणीकपात केली असताना दुसरीकडे कोका- कोला दिवसाला १० लाख लीटर पाणी उपसा करते. या पाण्याच्या पुरवठय़ाबाबत महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर पावले उचलावीत, अशी विनंती राणे यांनी स्वाधीन क्षत्रिय यांना केली आहे.
ऐरणीवर आलेल्या पाणी-प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी डिसेंबरमध्ये ‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांनी राणे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर मोर्चा नेला होता. या मोर्चाने मुंबईकरांवर पाणीटंचाईच्या रूपाने ओढवलेल्या भीषण आपत्तीकडे महाराष्ट्र आणि देशाचे लक्ष वेधण्याचे काम केले. त्यानंतर संघटनेने आक्रमक पवित्रा घेत पाणीमाफियांना पळता भुई थोडी करून सोडली. शहरात ठिकठिकाणी होत असलेली पाणी चोरी व गळतीचा शोध लावून प्रशासनाचा नाकर्तेपणा चव्हाटय़ावर आणण्याचे काम केले. सध्या शहराला एकूण गरजेच्या ७० टक्के पाणीपुरवठा होत आहे. पाण्याची दरडोई गरज २३० लीटर असताना प्रत्येक मुंबईकराच्या वाटय़ाला ९० लीटरच पाणी येत आहे. झोपडपट्टीतील रहिवाशांची अवस्था याहून बिकट आहे. तिथे माणशी २५ लीटरच पाणी मिळते. अशा परिस्थितीत कोका- कोलावर मेहेरनजर कशाला, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित करून प्रथम मुंबईकरांची तहान भागवा, नंतर शीतपेयांच्या कंपन्यांची तहान भागवा, असे बजावले आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिल डिग्गीकर यांनी मात्र आपण हे पत्र वाचलेले नसून जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर नक्कीच कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. परंतु सध्या कमर्शियल वापरासाठी एकूण पुरवठ्याच्या १० टक्केच पाणी दिले जाते. त्या एकूण १० टक्के पाण्यामध्ये ३० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे जर ‘स्वाभिमान’ची तक्रार असेल तर त्यांच्याकडून नक्कीच दखल घेतली जाईल, असे ते म्हणाले.



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा