PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: ‘26/11’ हल्ला म्हणजे भारताविरुद्धचे छुपे युद्धच! ‘26/11’ हल्ला म्हणजे भारताविरुद्धचे छुपे युद्धच! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 11 March, 2010 10:15:00 AM मुंबई- पाकिस्तानचा जिवंत हाती लागलेला एकमेव दहशतवादी अजमल आमिर कसाब आणि त्याच्या नऊ साथीदारांनी मुंबईवर केलेला ‘२६ नोव्हेंबर’चा हल्ला म्हणजे भारताविरुद्ध छुपे युद्धच होते. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम १२१ अन्वये देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या गंभीर आरोपाखाली त्यांना शिक्षा व्हायला हवी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी केला. हल्लेखोरांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व अत्याधुनिक उपकरणांची माहिती देत लष्करी स्वरुपाचे कठोर प्रशिक्षण का दिले गेले, हल्लेखोर हे कराचीहून सागरी मार्गाने एवढय़ा लांबचा अनेक दिवसांचा प्रवास करून येथे मुंबईतच का आले, कारस्थान्यांनी हल्ल्यासाठी मुंबईचीच निवड का केली तर त्यांना आर्थिक राजधानीवर हल्ला करून भारताची अर्थव्यवस्था कोलमडवून टाकायची होती. अर्थव्यवस्था हा कोणत्याही सुसंस्कृत समाजाचा कणा असल्याने त्याच्यावरच घाला घालायची पूर्वापार चालत आलेली रणनीतीच त्यांनी अवलंबली होती. अशा पद्धतीने आर्थिक राजधानीला वेठीस धरून काश्मीर बळकावण्यासाठी भारत सरकारवर दबाव आणण्याचाच त्यांचा डाव होता, असा युक्तिवाद निकम यांनी केला. ‘हिंदुस्तान की माली (आर्थिक) हालत मुंबई से है। इसलिए हमें हिंदुस्तान में अंदर से हमला करना है। फिर ताज, ओबेरॉय और इस्रयलियों का आवास होने वाले नरिमन हाऊस में कोई बडी हस्तियों को बंधक बनाके कश्मीर को आजाद कराने के लिए हिंदुस्तानी सियासत को चुनौदी देनी है। हम भी यहां से ई-मेल भेजकर चुनौदी देंगे..’, अशाप्रकारच्या कसाबच्या कबुलीजबाबातील विविध माहितींचा संदर्भही यावेळी निकम यांनी दिला. ‘सियासत से जब कोई आपको डिमांड्स पुछेंगे तो बोलना - जेलों मे जितने भी जिहादी है उनको रिहा करो, मुस्लिम स्टेट्स को मुसलमानों के हवाले करो, काश्मिरीयों को उनका हक दिया जाये..’, अशा हल्लेखोर व ‘लष्कर-ए-तय्यबा’च्या सूत्रधारांमधील अनेक संभाषणांचा संदर्भ देत, हा हल्ला म्हणजे छुप्या युद्धाचाच प्रकार होता, हा आपला मुद्दा निकम यांनी अधोरेखित केला. तसेच इस्रयली, अमेरिकी व ब्रिटिश लोकांना लक्ष्य करून भारताचे या देशांबरोबरचे मित्रत्वाचे संबंध बिघडवण्याचा कारस्थान्यांचा डाव कसा होता, हेही त्यांनी दूरध्वनी संभाषणांचा हवाला देत स्पष्ट केले. दहशतवाद म्हणजे काय? याचे विवेचन सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा हवाला देत यावेळी निकम यांनी केले. तसेच ‘देशाविरुद्ध युद्ध पुकारणे’ या गुन्ह्याच्या व्याख्येत कोणत्याही देशाची नागरिक येत असल्याने फहीम व सबाउद्दीनबरोबरच पाकिस्तानी कसाबवरही हे कलम लागू होत असल्याने त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असा युक्तिवादही निकम यांनी अखेरीस केला. कसाबचा ‘तो मी नव्हेच’चा दावा बोगस! कसाबने आधी आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. मात्र कलम ३१३च्या जबाबात त्याने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत पोलिसांनीच आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप केला. मात्र ‘हल्ल्याच्या वेळी आपण घटनास्थळी नव्हतोच. २० दिवसांपूर्वीच आपण भारतात आलो होतो. नंतर मुंबईत जुहू चौपाटीवर फिरत असताना पाकिस्तानी असल्याचे पाहून पोलिसांनी आपल्याला अटक केली. नंतर आपल्याला ‘रॉ’च्या हवाली केले आणि नंतर क्राईम ब्रँचकडे सोपवले गेले’, असा दावा करणाऱ्या कसाबने सुरुवातीलाच आलेल्या साक्षीदार पोलिसांची त्याप्रमाणे उलटतपासणी का नाही घेतली, असा सवाल निकम यांनी उपस्थित केला. गिरगाव (विनोली) चौपाटीवरील नाकाबंदीदरम्यान कसाब व त्याचा साथीदार अबू इस्माईल यांना ताब्यात घेणारे पोलिस अधिकारी भास्कर कदम, संजय गोविलकर व हेमंत बावधनकर यांची उलटतपासणी घेताना कसाबचे वकील अब्बास काझमी यांनी कसाबची घटनास्थळावरची उपस्थिती एकप्रकारे मान्य केली होती. त्याशिवाय घटनेच्या वेळी कसाबची छायाचित्रे घेणारे वृत्तछायाचित्रकार सबॅस्टियन डिसुझा आणि श्रीराम वेर्णेकर यांच्या उलटतपासणीवेळीही त्यांनी सीएसटी स्थानक व टाइम्स बिल्डिंगजवळची कसाबची उपस्थिती मान्य केली होती. पोलिस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे व विजय साळसकर यांच्यावरील हल्ल्याबाबतही कसाबने कातडीबचाव भूमिका घेतली होती. ‘पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर माझ्या उजव्या हाताला गोळ्या लागल्या. त्यामुळे माझ्या हातातून रायफल खाली पडली. तेव्हा अबूनेच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या..’, असा दावा कसाबने आपल्या कबुलीजबाबात केला होता.. याचा अर्थ कसाबने नंतर स्वत:चेच डोके वापरून आपल्या भूमिकेत जाणीवपूर्वक बदल करत ‘घटनास्थळी आपण नव्हतोच’चा खोटा दावा केल्याचे उघड होते. न्यायालयाने त्याचा हा जबाब फेटाळून लावावा, असे म्हणणे निकम यांनी यावेळी मांडले.