PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: वसईत मासळीच्या भावात 50 टक्के घट वसईत मासळीच्या भावात 50 टक्के घट ================================================================================ प्रहार वार्ताहर on 03 September, 2010 01:30:00 AM वसई- पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेल्या मासेमारीला खऱ्या अर्थाने नारळी पौर्णिमेनंतर सुरुवात झाली. तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर वसई आणि परिसरात मुबलक प्रमाणात मासळी उपलब्ध होत असल्याने पावसाळ्यात सुक्या मासळीचा आधार घेतलेल्या खवय्यांची पावले आता मासळी बाजाराकडे वळू लागली आहेत. श्रावणात मासे मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होत असल्याने मासळीचा वधारलेला बाजारभाव आता निम्म्यावर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे मासे खाणाऱ्यांना कमी पैशात जास्त मासे मिळत आहेत. गेल्या काही वर्षाचा मासेमारीचा आलेख पाहता मत्स्यदुष्काळाची तलवार लटकत होती. उत्पादन कमी झाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मच्छीमारांनी आपल्या बोटी बंदरातच ठेवणे पसंत केले होते. डिझेलचे वाढलेले दर, माशांचा तुटवडा, अवैध मासेमारी, मार्गदर्शनाचा अभाव याचा एकत्रित परिणाम मत्स्य उत्पादनावर झाला होता. मुंबईतील किना-याजवळ झालेली जहाजांची टक्कर यामुळे सुरुवातीला खवय्यांनी माशांकडे पाठ फिरवली होती. परंतु आता चित्र बदलत आहे. सुरमई, सरंगा, पापलेट, हलवा, बोंबिल आदी नफा मिळवून देणारी मासळी बंदरावरून आणण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या चेह-यावरही समाधान दिसत आहे. मासळीच्या निर्यातीत वसई आघाडीवर आहे. पाचुबंदर, अर्नाळा, रानगाव आदी भागातून वसईसह मुंबई परिसरात मासे निर्यात केले जातात. गेल्या वर्षी क्रॉफर्ड मार्केटमध्ये वसई, अर्नाळा परिसरातून केवळ पापलेटची 65 हजार टन विक्री झाली होती. सध्या माशांचे भाव कमी झाले असल्याचे दिसते. सुरमई 100 रुपयांऐवजी 50 ते 60 रुपयांना उपलब्ध आहे. सरंगा 250 रुपयांवरून 150 रुपये, हलवा 300 रु. वरून 150 ते 100 रुपये, बोंबिल 50 रुपये 4 नगावरून 20 रुपयांना सहा नग मिळत आहेत. पापलेटही निम्म्या किमतीत मिळत आहेत. असे असले तरी यंदा मासे चांगले मिळत असल्याने मच्छीमारांचा मागील वर्षाचा तोटा भरून निघण्याची आशा व्यक्त होत आहे.