PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: कल्याणासाठी आघाडीलाच मत द्या! कल्याणासाठी आघाडीलाच मत द्या! ================================================================================ श्यामसुंदर सोन्नर on 30 October, 2010 10:20:00 AM डोंबिवली- निवडणूक महानगरपालिकेची आहे आणि येथे भावा-भावांची भांडणे सुरू आहेत. भजनातल्या डबलबारीप्रमाणे हे दोघे भाऊ एकमेकांवर टीका करत आहेत. या डबलबारीवाल्यांना भिरकावून द्या आणि विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाच निवडून द्या, असे आवाहन महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी केले. पश्चिम डोंबिवलीतील जाहीर सभेत विकासाच्या मुद्दय़ावर अत्यंत अभ्यासपूर्ण मतप्रदर्शन करतानाच राणे यांनी शिवसेनेच्या टीकेला चोख उत्तर दिले. ‘शिवसेना-भाजप आम्हाला सत्ता द्या, आम्ही विकास करू, असे सांगत आहेत. अरे साडेबारा वर्षे तुमच्याकडे सत्ता होती, तेव्हा का विकास केला नाहीत?’, असा सवाल करून राणे म्हणाले, दफन दफनभूमीसाठी 15 वर्षापूर्वी जागा दिली. सध्या तिथे शिवसेनेच्या लोकांनी झोपड्या बांधल्या आहेत. असे असताना शिवसेनाप्रमुखांच्या नावाने होर्डिग लागले आहेत, ‘मी बोलतो तेच करतो, म्हणून तुमचे मत मागतो’. फोटो शिवसेनाप्रमुखांचा, उद्धवचा नाही. कारण उद्धवमध्ये कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याची हिंमतच नाही, असेही राणे यांनी ठणकावून सांगितले. प्रत्येक कंत्राटामध्ये टक्केवारी खाणारे युतीचे नगरसेवक या शहराचा विकास करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना दूरच ठेवा. केंद्रात, राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. दोन्ही सरकारकडे विकासाच्या योजना आहेत. त्या योजनांच्या माध्यमातून निधी मिळवून आम्ही या शहरांचा विकास करू, अशी ग्वाही देताना राणे म्हणाले, जसा विकास करणे आमची जबाबदारी आहे, तशीच मतदार म्हणून तुमचीही जबाबदारी आहे. जे मतदार चांगल्या लोकांना निवडून देतात, त्या शहरांचा विकास होतो. आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, आम्ही या शहराचा कायापालट करू. टीका करायचे लायसन्स काय तुम्हालाच? ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना विकासावर काही बोलायचे नाही. फक्त शिवराळ टीका करायची, असे यांचे चालले आहे. माझ्यावर टीका कर, राजवर टीका कर. काय तर म्हणे राज कपडे ओले करतो. तू काय पाहत बसतो काय? हे दुस-यावर टीका करणार आणि वर म्हणणार याद राखा, आमच्यावर टीका कराल तर? टीका करण्याचे लायसन्स काय तुम्हालाच दिले आहे काय?, असा सडेतोड सवाल महसूलमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस आघाडीच्या येथील प्रचारसभेत केला. ‘‘आज टीका करतात, पण यांनीच पूर्वी आमच्या कामाचे कौतुक केले होते. विधानसभेतील माझ्या अर्थसंकल्पाच्या भाषणाचे पुस्तक शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते प्रकाशित झाले तेव्हा ते म्हणाले होते, ‘नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्यास मी उशीर केला. आधीच मुख्यमंत्री करायला पाहिजे होते.’ मला शाखाप्रमुख केले, नगरसेवक केले, मंत्री आणि मुख्यमंत्री केले तेव्हा माझ्यामध्ये दोष दिसले नाहीत. आजच टीका का करता? त्या टीकेला उत्तर दिले की म्हणतात, विरोधात बोलू नका’’, असे सांगत, ‘तुम्ही जे पेरलेत तेच उगवले, असा सणसणीत टोलाही राणे यांनी या वेळी लगावला. रणधुमाळी थांबली कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी थंडावली. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी विकासावरील मुद्दय़ांऐवजी एकमेकांची उणीदुणी काढताना केलेली चिखलफेक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा आघाडीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचाराचा झंझावात यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली. आता सा-यांचे लक्ष रविवारी होणा-या मतदानाकडे लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली शिस्तबद्ध प्रचार राबवत कल्याण -डोंबिवलीकर मतदारांत विश्वास निर्माण केला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, मधुकरराव पिचड, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आदी नेत्यांनी कल्याण-डोंबिवलीचा परिसर पिंजून काढला. त्यामुळे मतदार यंदा काँग्रेस आघाडीच्या बाजूने कौल देईल, असे चित्र सध्या दिसत आहे.