मनसेच्या मेळाव्याला ‘रेड सिग्नल’
मुंबई उच्च न्यायालयाने मनसेच्या 13 फेब्रवारी रोजीच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्याला शुक्रवारी ‘रेड सिग्नल’ दिला.
मुंबई- निवडणूक काळात शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी एका पक्षाला परवानगी दिली तर इतर पक्षांनाही परवानगी नाकारणे शक्य होणार नसल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने मनसेच्या 13 फेब्रवारी रोजीच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्याला शुक्रवारी ‘रेड सिग्नल’ दिला. दरम्यान, ‘सरकारने कितीही केसेस टाकल्या तरी बेहत्तर, पण सभेसाठी मैदान मिळाले नाही तर, रस्त्यावरच सभा घेऊ,’ अशी सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी पालिकेकडे 28 अर्ज आले आहेत. यात काही राजकीय पक्षांनीही अर्ज केले आहे. एकाला परवानगी दिली तर इतरांनाही द्यावी लागेल. त्यामुळे मनसेलाही मेळाव्यासाठी परवानगी देता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
मेळाव्यासाठी राज्यभरातून येणा-या कार्यकर्त्यांची गर्दी, मैदान परिसरात होणारी घोषणाबाजी तसेच कार्यकर्त्यांच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे मेळाव्याला परवानगी देऊ नये, हा राज्य सरकारचा युक्तीवाद मान्य करत उच्च न्यायालयाने परवानगी देण्यासाठी नकार दिला.तत्पूर्वी दसरा मेळाव्यासह जाणता राजा, दुर्गापूजा आणि अगदी अलीकडे बालमोहन विद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्याने तशीच परवानगी आपल्यालाही मिळावी असा युक्तीवाद मनसेचे वकील वाय. एस. जहागिरदार यांनी केला. तसेच कार्यकर्त्यांचे मेळावे घेणे आपला राष्ट्रीय हक्क असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित करत मेळाव्यादरम्यान ध्वनी प्रदूषण होणार नाही याची सर्व खबरदारी घेण्याचे आश्वासनही न्यायालयाला दिले.
मनसेच्या या युक्तीवादावर निवडणुकीचा काळ नसता तर या मेळाव्याला विरोध केला नसता अशी भूमिकाही राज्य सरकारचे वकील पी. जी. लाड यांनी मांडली. तसेच शिवाजी पार्क हे मैदान मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी राखीव आहे की खेळाचे मैदान आहे या बाबीचा खुलासाही पालिकेने अद्याप केला नसल्याने, यावेळी ही परवानगी नाकारणेच योग्य होईल असा मुद्दा सरकारी पक्षाने मांडला. सरकारी वकिलांचा हा मुद्दा ग्राह्य धरत न्यायालयाने मनसेच्या मेळाव्याला परवानगी नाकारली. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, दसरा मेळाव्यात शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी शिवसेनेला परवानगी दिली जाते. मात्र, निवडणूकीच्या कालावधीत आम्हाला सभेसाठी परवानगी नाकारून उच्च न्यायालयाने दोन पक्षातील निकालाबद्दल समतोल राखलेला नाही. एकीकडे शिवसेनेला परवानगी द्यावी म्हणून राज्य सरकार प्रयत्न करते आणि सरकारच्या सांगण्यावरून न्यायालयही त्याला परवानगी कशी देते असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. ‘सरकारने कितीही केसेस टाकल्या तरी बेहत्तर, पण सभेसाठी मैदान मिळाले नाही तर, रस्त्यावरच सभा घेऊ,’ अशी घोषणाही केली.




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा