भारत-कोरिया यांच्यात संरक्षण सहकार्य करार
भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्यावर सहमती झाली असून त्या संदर्भातील दोन करारांवर भारताचे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी आणि द. कोरियाचे संरक्षणमंत्री किम ताए-यंग यांनी सोल येथे शुक्रवारी स्वाक्ष-या केल्या.
दिल्ली- भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्यावर सहमती झाली असून त्या संदर्भातील दोन करारांवर भारताचे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी आणि द. कोरियाचे संरक्षणमंत्री किम ताए-यंग यांनी सोल येथे शुक्रवारी स्वाक्ष-या केल्या.
ए. के. अँटनी दक्षिण कोरियाच्या दोन दिवसांच्या दौ-यावर गेले आहेत. संरक्षण क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात पाच वर्षे मुदतीचे दोन सामंजस्य करार झाल्यामुळे भारत-द. कोरिया यांच्यातील संबंधांचे नवे पर्व सुरू झाले असून व्यूहात्मक भागीदारी मजबूत झाली आहे, असे संरक्षणप्रवक्ते सीतांशू कार यांनी सोल येथून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पहिल्या सामंजस्य करारात संरक्षणविषयक माहिती आणि अनुभवांची देवाणघेवाण, संरक्षणतज्ज्ञ आणि लष्करी अधिका-यांचे दौरे, लष्करी सराव, युद्धनौका आणि लढाऊ विमानांच्या भेटी, आंतरराष्ट्रीय शांततारक्षणाचे कार्य आणि मानवतावादी साआदी घटकांचा अंतर्भाव आहे. या समझोत्याची मुदत पाच वर्षे असून आणखी पाच वर्षे मुदतवाढीची तरतूद करण्यात आली आहे. भविष्यातील संरक्षणसामग्रीचा धांडोळा, संशोधन आणि विकास या घटकांचा दुस-या सामंजस्य करारात समावेश आहे. अँटनी आणि यंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळांत विविध मुद्दयांवर दीड तास चर्चा झाली. संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्य केवळ खरेदीदार-विक्रेता या परिघातच मर्यादित राहू नये तर तंत्रज्ञान हस्तांतर, संयुक्त उत्पादन आणि संशोधन या क्षेत्रांत विस्तारित व्हावे, अशी अपेक्षा अँटनी यांनी व्यक्त केली. हे करार उभय देशांसाठी लाभदायक आहेत, अशी ग्वाही यंग यांनी दिली. भारतीय संरक्षणमंत्री प्रथमच द. कोरियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. भारताच्या शिष्टमंडळात संरक्षण सचिव प्रदीपकुमार, नौदलाचे व्हाइस अॅडमिरल आर. के. ढोवन, सैन्यदलाचे लेफ्टनंट जनरल के. टी. पटनायक, डीआरडीओचे डॉ. प्रल्हाद आणि संरक्षणमंत्र्यांचे सल्लागार सुंदरम कृष्ण यांचा समावेश आहे.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा