पंतप्रधानपद हे माझे ध्येय नाही- राहुल गांधी
पंतप्रधानपद भूषवणे हे माझे ध्येय नसून गेल्या 22 वर्षांपासून फसवणूक होत असलेल्या उत्तर प्रदेशचा विकास हेच ध्येय असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
वाराणसी- पंतप्रधानपद भूषवणे हे माझे ध्येय नसून गेल्या 22 वर्षांपासून फसवणूक होत असलेल्या उत्तर प्रदेशचा विकास हेच माझे ध्येय आहे, असे स्पष्ट मत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी सोमवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे व्यक्त केले. यावेळी त्यांनी मायावती सरकारबरोबरच भाजपवरही कडाडून टीका केली.
यापूर्वीच्या सरकारांनी उत्तर प्रदेशातील जनतेची फसवणूक केली. या ठिकाणी आम्ही कोणासोबत तडजोड करणार नाही. विरोधी पक्षांच्या आडमुठी भूमिकेमुळे लोकपाल विधेयक संसदेत खोळंबले आहे. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याची काँग्रेसची तयारी आहे. त्यासाठी विरोधी पक्षांनी सकारात्मक पुढाकार घ्यायला हवा. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्याबद्दल मला वैयक्तिक पातळीवर आदर आहे. मात्र त्यांनी चांगले सरकार न देता जनतेची निव्वळ फसवणूक करत विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार केला. काँग्रेसला उत्तर प्रदेशचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने काँग्रेसला मतदान करून विकासाची कास धरावी. आम्ही निवडून आल्यावर कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार नाही. आमची बांधिलकी उत्तर प्रदेशच्या जनतेशी आहे, असे उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी आम्ही 'आम आदमी'चा नारा दिला होता. त्याच आधारावर आताही सर्वसामान्य जनताच आमचा केंद्रबिंदू आहे. जनतेचा विकास हाच आमचा नारा आहे. जोपर्यंत उत्तर प्रदेश स्वतःच्या पायावर उभा राहणार नाही, तोपर्यंत राहुल गांधी येथील सर्वसामान्य जनतेमध्ये, गोरगरीबांसोबत त्यांच्या झोपडपट्ट्यांमध्ये दिसेल, गेली 22 वर्षे उत्तर प्रदेशात गुंडाराज आहे, मायावतींनी गरिबांची फसवणूक केली, माझ्या प्रत्येक सभेला काही माणसे काळे झेंडे घेऊन येतात. परंतु, मी त्यांना घाबरत नाही. मी काळे झेंडे, चप्पल-बूटांना घाबरत नाही आणि बंदुकीच्या गोळीचीही मला भीती वाटत नाही. 'मैं किसीसे नही डरता', असे राहुल म्हणाले.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देशभरातून 'रथयात्रा' काढली होती. कर्नाटकमध्ये रेड्डी बंधुंनी भ्रष्टाचार केला. झारखंड, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि पंजाबमध्येही अशीच स्थिती आहे. ते कोणत्या तोंडाने भ्रष्टाचाराविरोधात बोलू शकतात. अडवाणी यांना आपली क्षमता सिद्ध करायची आहे. त्यासाठी ते प्रचारात उतरले आहेत. मात्र भावनिक मुद्दे उपस्थित करून त्यांनी लोकांची फसवणूक करू नये. एकीकडे भाजप लोकपाल विधेयक संमत करण्याची भाषा करीत आहे तर दुसरीकडे यांचे गुजरातमधील मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा लोकायुक्ताला विरोध आहे. आता भाजपची दुटप्पी भूमिका लोकांना समजली असल्याचेही राहूल यांनी भाजपवर टिका करताना सांगितले.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा