रशिया भारतात 12 अणुऊर्जा प्रकल्प उभारणार
रशियाचे पंतप्रधान पुतीन यांच्या भारत दौ-यामध्ये दोन्ही देशांनी नागरी अणू सहकार्य करारासह 19 करारांवर स्वाक्ष-या केल्या.
नवी दिल्ली- द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून भारत आणि रशियाने शुक्रवारी तब्बल 19 करारांवर स्वाक्ष-या केल्या. गेली गोर्शकोव्ह या विमानवाहू जहाजाच्या खरेदीसाठीच्या, गेली तीन वर्षे वाटाघाटींमध्ये अडकलेल्या, नवीन करारावर दोन्ही देशांनी स्वाक्ष-या केल्या. त्याचप्रमाणे नागरी अणू सहकार्य करार आणि मिग-29 विमानांच्या खरेदीसाठीच्या करारावरही दोन्ही देशांनी स्वाक्ष-या केल्या.
नागरी अणू सहकार्य कराराअंतर्गत रशिया भारतात 12 अणुऊर्जा संयंत्र उभारणार आहे. यापैकी सहा तामिळनाडूमधील कुंडनकुलममध्ये तर सहा पश्चिम बंगालमधील हरीपूरमध्ये उभारली जाणार आहेत. रशियाचे पंतप्रधान ब्लादिमिर पुतीन यांच्या भारत दौ-यादरम्यान या करारांवर स्वाक्ष-या झाल्या. करारांपूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पुतीन यांच्यात सर्वसमावेशक चर्चा झाली. द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याच्या संधींवरही दोन्ही पंतप्रधानांनी चर्चा केली.
मनमोहन सिंग आणि पुतीन यांनी अनेक प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांबाबत दहशतवादासंदर्भात चर्चा झाली.
गोर्शकोव्ह खरेदीसाठीच्या फेरनियोजित करारावरही दोन्ही देशांनी शुक्रवारी स्वाक्ष-या केल्या. रशियाकडून गोर्शकोव्ह हे विमानवाहू जहाज दीड अब्ज अमेरिकी डॉलर्सना खरेदी करण्यासाठी 2004 साली करार केला होता. मात्र त्यानंतर या जहाजाचे आधुनिकीकरण झाल्याने रशियाने 2.9 अब्ज अमेरिकी डॉलर्सची मागणी केली होती. भारताने एवढी किंमत मोजण्यास नकार दिला होता. तीन वर्षांच्या वाटाघाटींनंतर दोन्ही देशांमध्ये 2.34 अब्ज अमेरिकी डॉलर्स या किमतीवर सहमती झाली आणि याच रकमेसह नवीन करारावर शुक्रवारी स्वाक्ष-या झाल्या.
याशिवाय रशियाकडून मिग-29 के या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठीच्या करारावरही स्वाक्ष-या झाल्या. यासाठी भारत दीड अब्ज अमेरिकी डॉलर्स मोजणार असून 2012 साली ही विमाने भारताला मिळणार आहे.लष्करी अंतराळ क्षेत्रात सहकार्यासाठीही दोन्ही देशांमध्ये एक करार झाला आहे. खतांच्या क्षेत्रात सहकार्यासाठी दोन, तर हिरे क्षेत्रात सहकार्यासाठी पाच करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्ष-या केल्या.
रशिया यांचा भारत दौरा अत्यंत फलदायी ठरल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नमूद केले. रशिया हा भारताचा विश्वासू सहकारी असून देशाच्या परराष्ट्र धोरणाचा महत्वाचा भाग आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
रशियाने कायम भारतासोबतच्या संबंधांना अत्युच्च महत्त्व दिले असून पाकिस्तानसोबत रशियाने कोणत्याही प्रकारचे लष्करी करार केलेले नाहीत, असे पुतीन यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा