PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: एक छोटी सुरुवात मोठय़ा बदलाची.. एक छोटी सुरुवात मोठय़ा बदलाची.. ================================================================================ वसुंधरा देवधर on 15 August, 2010 11:25:00 AM 12 ऑगस्ट, गुरुवार हा दिवस ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा, कायम स्मरणात राहणारा ठरला. 22 जूनला रिक्षांचा जो अचानक संप झाला, त्या वेळी दरवाढविषयक चर्चा ही संबंधितांबरोबर चालू होती. त्यामुळे हा संप ग्राहकांच्या मनातल्या धुमसत्या भावनांवर जणू ठिणगी टाकून गेला. त्यानंतर या सदरातून सनदशीर मार्गाने अन्यायाला वाचा फोडण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. 24 जून रोजी दूरदर्शनवरच्या साडेनऊच्या बातम्यांमध्ये‘मुंबई ग्राहक पंचायती’च्या कार्याध्यक्षांनी समस्त ग्राहक वर्गाला साद घातली आणि ‘एक दिवस नाही’म्हणण्याचे आवाहन केले. त्यानंतरच्या कालखंडात हेही ध्यानात आले की, रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्याविषयी केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रातच नव्हे; तर बंगळूरुपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र असंतोष आहे. तरुण पिढीचे ही मत आणि अस्वस्थता त्यातून जाणवली, ज्या वेळी तीन तरुणांनी त्यांच्या माध्यमातून, म्हणजे इंटरनेटवरून ‘मीटर-जॅम’ आंदोलनाची हाक दिली. ग्राहक म्हणून रिक्षा किंवा टॅक्सी सेवांचे वाढते दर आपण देतो, मात्र त्या बदल्यात मिळते काय, तर ब-याच वेळा- * भराभरा धावणारे मीटर्स * इच्छित स्थळी नेण्यास नकार * उद्धट उत्तरे आणि भरीस भर म्हणून या सर्व बाबतींत या सेवा पुरवठादारांची बेपर्वा वृत्ती. अखेर ग्राहकांच्या सहनशक्तीचा अंत होऊन, त्यांनी सनदशीर मार्गाने आपल्या संतापाला वाचा फोडली. 13 तारखेच्या वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून यासारख्या मोहिमेची किती आणि कशी आवश्यकता होती हे स्पष्ट होते. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वानी आपला वाटा उचलला. रिक्षावाल्यांनीही कबूल केले की,‘ज्या अवधीत 100-125 रुपयांचा धंदा व्हायचा. त्या काळात 25-30 रुपयांचाच धंदा झाला.’रिक्षावाल्यांच्या नेत्यांकडून नाही तरी स्वत: रिक्षाचालक/मालकांचा हा जो प्रामाणिकपणा त्यांच्या प्रतिक्रियेमधून दिसला, त्यामुळे ग्राहकांनी सुधारणेची आशा धरायला हरकत नाही. मुंबई ग्राहक पंचायतीच्या पडद्यामागच्या आणि मीडियासमोरच्या अशा सर्व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी प्रतिनिधिक रूपात ग्राहकांच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली. त्याची दखल विविध माध्यमांनी, बातम्यांनी घेतली. ग्राहकाच्या तक्रारीबाबत असा अनुभव येतो की ज्या वेळी एक ग्राहक लेखणी उचलून आपली तक्रार मांडतो, त्या वेळी त्याचप्रकारे पीडित कमीत कमी लाखभर ग्राहक तो अन्याय सहन करीत असतात. रिक्षा-टॅक्सीच्या सेवेची गरज तर प्रत्येकाला कधी ना कधी पडतच असते. त्या वेळी प्रत्येकाने कधी ना कधी अरेरावी, अन्याय, नकार सहन केलेलाच असतो. विशेषत: लहान बाळे घेऊन जाणाऱ्या माता, आजीला दवाखान्यात नेणारा नातू अशी स्पष्ट गरज दिसणाऱ्या ग्राहकांनाही ‘नाही’ ऐकून घ्यावे लागते. त्या वेळी त्यांना काय वाटत असेल, याचा अनुभव ‘एक दिवस नाही’ म्हणून त्या रिक्षा-टॅक्सीवाल्यांना देण्यात आला आहे.‘सेवा नाकारणे’हा ग्राहकाचा अधिकार आहे असे नव्हे; तर ते त्याचे ‘शस्त्र’ आहे. ग्राहक नसेल तर कोणत्याच सेवा पुरवठादाराचा व्यवसाय चालणार नाही. इतकेच काय तर खरेदीदार नसेल, तर उत्पादने तरी कशी विकली जातील? समस्त ग्राहकवर्गाने आपली ही शक्ती ओळखली पाहिजे.‘एकीचे बळ’ हा केवळ शाळेत शिकण्याचा धडा नसून आचरणात आणण्याचा मार्ग आहे. त्यामुळे अन्यायाला वाचा फुटते. नुसते आपापसात कुरकुरून समस्या सुटत नाहीत. त्यासाठी १२ ऑगस्ट रोजी दाखवले, तशा प्रकारच्या कृतिशील ग्राहकत्वाची गरज असते. अशा प्रकारचे आंदोलन, काही ठिकाणी थोडय़ा प्रमाणावर सुरू होऊ शकते. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. किती तरी मोठय़ा बदलांची सुरुवात अशा छोटय़ा यशांमधूनच झालेली दिसते. त्यामुळे ग्राहक-चळवळीतील कार्यकर्त्यांसाठीच केवळ नव्हे, तर सगळ्याच ग्राहकांसाठी हे आशादायक चित्र आहे. आता आपण सर्वानी एकच करायचंय. ही घटना आपल्याला जे शिकवून गेली आहे, ते मनात जपायचंय. त्यामुळे आपलं सर्व ग्राहकांचं बळ कशात आहे, ते ध्यानात राहील. मग ‘जादा रुपया’ मागण्याचा दूधवाल्यापासून-शीतपेयाच्या दुकानदारापर्यंत सर्वाना ‘नाही’ म्हणण्याचे बळ आपणास मिळेल. मल्टिप्लेक्सपासून एस.टी. स्टॅँडपर्यंत एम.आर.पी.पेक्षा जास्त किंमत देण्यास ‘नकार’ देण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे. जरूर आहे ते जाणण्याची, व्यक्त करण्याची. बारा ऑगस्टच्या ‘रिक्षा-टॅक्सीला केवळ एक दिवस नाही’ म्हणून शकण्याच्या या आंदोलनाची परिणती, विविध क्षेत्रांकडून विविध पातळय़ांवर ग्राहकांना ज्या ज्या अन्यायाला सामोरे जावे लागते, त्याच्या निवारणात होऊ शकते हाच गर्भित संदेश, ग्राकांसाठी दिलासादायक आहे.