PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: आयुक्तांनी जोखले महापालिकेचे पाणी! आयुक्तांनी जोखले महापालिकेचे पाणी! ================================================================================ सचिन धानजी on 29 August, 2010 07:55:00 AM मुंबईकरांवरील लागू केलेली पाणीकपात मागे घेण्यावरून महापालिकेत रणकंदन माजले असताना आजवर स्थायी समितीला न जुमानणा-या महापालिका आयुक्तांना एक महिन्यासाठी का होईना पाणीकपात शंभर टक्के मागे घेण्याची सुबुद्धी झाली. धार्मिक सणांचे निमित्त पुढे करत त्यांनी पाणीकपातीला स्थगिती दिली. पाणीकपात मागे घेतल्याने मुंबईकरांच्या नळाला थोडे का होईना पाणी मिळेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. ‘आशा’ एवढय़ाचसाठी की, एवढा पाण्याचा पुरवठा करूनही मुंबईकरांच्या नळापर्यंत हे पाणी पोहोचेलच, हे सांगता येत नाही. परंतु जे धाडस आयुक्तांनी दाखवले त्याबद्दल त्यांचे कौतुक करायलाच हवे. पाणी वाढवून देण्याची सर्वसामान्य माणसांची मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. पाणीकपातीचा निर्णय हा स्थायी समितीमध्ये घेतल्याने कपात मागे घेण्याचा निर्णयही स्थायी समितीमध्ये व्हावा, अशी आग्रही मागणी सत्ताधाऱ्यांनी करून पाणीकपातीचे श्रेय स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न होता. परंतु दोन स्थायी समितींच्या बैठकींमध्ये आयुक्तांनी ‘समिती सांगेल म्हणून मी वागणार नाही, आणि तुम्ही सांगणार म्हणून मी निर्णय घेणार नाही,’ असा पावित्रा घेतला होता. त्याच वेळी समितीच्या बैठकीत सदस्यांनी आयुक्त पाणीकपातीचा निर्णय आयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करून स्थायी समितीला अंधारात ठेवतील, असाही आक्षेप घेतला होता. पण आयुक्तांनी सदस्यांच्या आरोपांकडे लक्ष न देता स्वत:ला जे करायचे तेच केले आणि त्यासाठी स्थायी समितीच्या मान्यतेची वाट पाहात ते बसले नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने ही कपात मागे घ्यावी, अशी विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांची मागणी होती. स्थायी समितीच्या बैठकीत समीर देसाई यांनी सत्ताधाऱ्यांना याच मुद्दय़ावर कोंडीत पकडले होते. त्या वेळीही तलावांमध्ये जेवढा साठा होता जवळपास तेवढाच साठा शुक्रवारी होता. मग आयुक्तांनाच आताच ही कपात मागे घेण्याची उपरती का झाली, हा संशोधनाचा भाग आहे. आयुक्त आजवर उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरूनच ही कपात मागे घेत नव्हते का, अशी शंका सर्वानाचा आहे. पण हळूहळू कपातीचे श्रेय मिळवण्याचा मुद्दा हातचा निसटू लागल्याने ‘तुला ना मला, घाल कुत्र्याला’ असे म्हणत परस्पर हा निर्णय जाहीर करा, अशाही सूचना त्यांनी आयुक्तांना दिल्या नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु कारण काही असले तरी मुंबईकरांना त्यांच्या हक्काचे पाणी 14 महिन्यांनंतर मिळाले याचा आनंद वाटायला हवा. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी गोरेगाव येथील जवाहरनगर,भगतसिंग नगर येथील वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या वेळी प्रत्येक जण गढूळ आणि कमी दाबाने मिळणाऱ्या पाण्याच्या तक्रारी करत होते. 10 कुटुंबांमागे एक सार्वजनिक नळ, त्यातच पाण्याचा पुरवठा एक ते दीड तास. सुरुवातीला येणारे गढूळ पाणी वाहून गेल्यानंतर उरलेले पाणी मिळवताना एक-दोन हंडेही वाट्याला येत नाही. लोक डोळ्यात पाणी आणून नितेश राणे यांना कळकळीने सांगताना आम्हाला निदान पिण्यापुरते तरी पाणी द्या, असे साकडे घालत होते. अरूंद, चिंचोळ्या गल्लीतून मार्ग काढत एकेका घरांमधील लोकांच्या तक्रारी जाणून घेताना स्वत: नितेश राणे यांनाही गहिवरून आले. त्यामुळे पाणीकपात मागे घेतली तर त्यांच्या समस्यांचे निराकरण होईल, असा विश्वास वाटतो. परंतु हे पाणी वाढवल्याने पाणीचोरांची दिवाळी होईल, याचीही शक्यता नाकारता येत नाही. नितेश राणे यांनी नेमकी हीच चिंता व्यक्त करत पाणी वाढवले तसेच आता पाणी चोरांच्याही मुसक्या आवळा, अशा सूचना केल्या. सर्वसामान्यांसाठी ही कपात मागे घेतली असली तरी पाण्याचा फायदा माफियांनी उठवला तर ही कपात मागे घेऊन प्रशासनाने काय साधले, असाही प्रश्न उपस्थित होईल. आयुक्तांनी हा निर्णय घेताना लोकप्रतिनिधींशी असलेल्या चांगल्या संबंधांवर तुळशीपत्र ठेवले आहे. लोकांसाठी आयुक्तांनी जे धाडस दाखवले, त्याचे कौतुक एका वर्गाकडून मात्र दुस-या वर्गाकडून त्यांना राजकीय षङ्यंत्राचे बळी बनवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आयुक्तांचा येणारा काळ कसोटीचा ठरणार यात वादच नाही.