अपंगांना सहानुभूती नको, सहकार्य हवे!
अपंगत्वावर मात करत मोटारसायकलवरून भारतभ्रमणाची मोहीम आखणारे किरण अशोक जोशी यांच्याशी केलेली बातचीत...
या मोहिमेची कल्पना कशी सुचली?
पोलियोमुळे माझा एक पाय कायमचा अधू झालेला आहे. माझ्यासारखे अनेक आहेत. पोलियोरुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार त्रास मी पाहिला आहे, अनुभवला आहे. अशी दु:स्थिती कोणावर येऊ नये. भारतभर फिरून सर्व राज्यातील जनतेला पल्स पोलियोचे महत्त्व कळावे, हा माझ्या मोहिमेचा मुख्य हेतू आहेच पण एड्सच्या भस्मासूराला आळा घालण्यासाठी जनजागृती होणेही गरजेचे आहे. त्यासाठी मी मोटारसायकलवरून एकटाच २० राज्यांत फिरणार आहे.
या प्रवासाचे टप्पे कसे असतील?
येत्या १० फेब्रुवारीला दादरच्या शिवाजी पार्क येथून माझ्या प्रवासाला प्रारंभ होईल. दीड महिन्यांचा प्रवास आहे. १० हजार किलोमीटरचे अंतर मी मोटारसायकलवरून पूर्ण करून या मोहिमेची सांगता शिवाजी पार्क येथेच करणार आहे. मुंबई, सुरत, अहमदाबाद, उदयपूर, जयपूर, कोटा, अजमेर, दिल्ली, जालंदर, इसा, जम्मू, श्रीनगर, सिमला, डेहराडून, बरेली, वाराणसी, पाटणा, दार्जिलिंग, गुवाहाटी, कोलकाता, भुवनेश्वर, ब्रह्मगिरी, चेन्नई, विवेकानंद स्मारक, रामेश्वर, केरळ, कोचीन, त्रिपूर, मदुराई, मंगलोर, गोवा, चिपळूण ते मुंबई असे टप्पे आहेत.
या मोहिमेची प्राथमिक तयारी कशी केली?
मी १९९४पासून मोटारसायकल चालवतो. १९९५मध्ये डोंबिवली ते अजमेर असा प्रवास केला. १९९७मध्ये हिमालयीन रॅलीत भाग घेतला. त्यात मला सहावा क्रमांक मिळाला होता. माझा आत्मविश्वास वाढत गेला. त्यामुळे अपंग असूनही मोटारसायकल चालवणे मला कठीण गेले नाही. २००३मध्ये मी ठाणे ते श्रीनगर असा सलग १४ दिवसांचा प्रवास केल्याने आत्मविश्वास अधिकच दुणावला. माझ्या कुटुंबियांनीही मला सतत प्रोत्साहन दिलं आणि सहकार्य केले. मित्रमंडळी, सहयोगी संस्था, देणगीदार यांची मदतही आहेच. त्यामुळे एकटय़ानेच भारतभ्रमण करण्याचा निर्णय घेतला. मी ही यात्रा पूर्ण केली तर ‘लिम्का विक्रम’ तसेच ‘गिनिज विश्वविक्रमा’त नोंद होईल. अर्थात विक्रमासाठी नव्हे तर जनजागृतीसाठीच माझा उपक्रम असेल. अपंगांना सहानुभूती नको, तर सहकार्य हवे असते. याच सामाजिक बांधिलकीचे आवाहन मी देशभर करणार आहे. या मोहिमेत दिल्लीत १६ फेब्रुवारीला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याशी भेट ठरली आहे. त्यांना मी पल्स पोलियो आणि एड्स संदर्भात ७२ समस्यांची प्रश्नावली देणार आहे.
या साहसी प्रवासामुळे समस्या सुटतील?
मी प्रयत्न करणार आहे. समस्यांच्या मुळावरच घाव घालण्याचा माझा प्रयत्न आहे. खेडोपाडीच नव्हे तर शहरातही सर्वसामान्य जनतेला वैद्यकीय सुविधांची माहिती नसते. उदासिनता हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. माझा प्रयत्न ही उदासिनता घालवण्यासाठी आहे. माझ्यासारखा एका पायानं अधू असणारा माणूस जनजागृतीसाठी प्रयास करतोय, तिथे सुदृढांनी प्रयत्न करायला काय हरकत आहे. समाजातील उदासिनतेच्या अनेक समस्या एका रात्रीत सुटणार नाही, पण त्या सुटाव्यात म्हणून जीवापाड प्रयत्न करावेच लागतील.


del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा