पाण्याचे सांडपाणी करणा-यांवर कर लावा
पावसाच्या पाण्याचा काळजीपूर्वक वापर आणि जल-पुनर्वापराबाबत जलसंवर्धनतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांच्याशी केलेली बातचीत
प्रत्यक्षात जेवढी चर्चा केली जाते, तेवढी खरोखर पाणीप्रश्नाची भीषणता आहे का?
होय. देशात सर्वत्र पाणीटंचाई जाणवते. मात्र हे प्रमाण सारखे नाही. मुंबईसारख्या शहरात भीषणता वाटावी अशी पाणीटंचाई नाही. पण खेडोपाडी अतिशय वाईट परिस्थिती आहे. मैलोन मैल पायपीट करून पाणी आणावे लागते. शहरातील नागरिकांना मिळणा-या पाण्याचे प्रमाण कमी झाले की त्याचा कांगावा केला जातो. येत्या एप्रिल, मे, जून महिन्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल. मात्र पाण्याचा -हास आपणच करतोय याची जोवर सर्वसामान्यांना जाणीव होत नाही, तोवर कितीही डोके आपटले तरी फरक पडणार नाही.
यावर उपाय काय?
रेन वॉटर हार्वेस्टींग अर्थात पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर ही काळाची गरज आहे. त्याचा अंगिकार केला तर पाण्याचा खूपसा साठा वर्षभर वापरता येईल. अर्थात सर्वाची मानसिकता बदलली पाहिजे. इच्छाशक्ती असेल तर सारे शक्य आहे. पाणीटंचाईची झळ हा वैयक्तिक प्रश्न नाही. परिस्थिती बदलायची असेल तर व्यक्तिगत, सामाजिक, राजकीय सर्व पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. मी आणि माझी संस्था पाणीबचतीच्या विविध योजना सर्वत्र राबवत असतो. जलसंवर्धनाचे प्रयोग हळूहळू मुंबईसारख्या शहरात वाढू लागलेत, ही चांगली लक्षणे आहेत. आपले जल‘जीवन’ सुकर व्हावे म्हणून प्रत्येकाने स्वत:हून प्रयत्न करायला हवेत. चेन्नईसारख्या शहरात पाणी विकत घ्यावे लागायचे तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी सरकारी मदतीने रेन वॉटर हार्वेस्टींग सक्तीचे केले होते. तशी योजना मुंबईत राबवली गेली पाहिजे.
तलावांचा आणि नद्यांचा प्रश्न आहेच...
जलशुद्धीकरण व्हायलाच हवे पण आजकाल तलाव संवर्धनाच्या नावाखाली सुशोभिकरणच होत आहे. त्यामुळे बागबगिचे, कठडय़ांचे बांधकाम आणि बोटिंग, फिशिंग यावर भर दिला जातोय. वास्तविक गाळ काढून तलावातील पाणी शुद्ध करून फक्त पाण्यासाठीच तलाव संवर्धन व्हायला हवे. आजच्या सिमेंट काँक्रिटच्या युगात कित्येक तलाव हरवले आहेत. अतिक्रमण, प्रदुषण, दुरवस्था, दुर्लक्ष ही कारणे आहेत. नद्यांचेही तसेच आहे. सांडपाणी नद्यांत सोडणे हा प्रत्येकाचा जणू हक्क झाला आहे. याप्रकारावर बंधन आणावे लागेल. देशभरातील नद्यांचे पाणी शुद्ध होईल, पाणी पिण्यालायक होईल हे नक्की. पण त्यासाठी जनजागृती व्हायला पाहिजे.
समुद्राचे पाणी पिण्याजोगे करण्याचा प्रयोग यशस्वी होईल?
समुद्राच्या खा-या पाण्याचे पिण्यालायक गोडय़ा पाण्यात रुपांतर करणे म्हणजे पैशाचा आणि विजेचा अपव्यय आहे. कारण समुद्राचे तीन हजार दशलक्ष पाणी पिण्यालायक करायचे म्हणजे वीज आणि पाण्याचे तंत्रज्ञान वापरणे होय. हा प्रयास म्हणजे मूठभर मुंबईकरांनाच फायदा. हे पाणी खेडोपाडी जाण्याची शक्यता नाही. आज एक माणूस पाचशे लिटर पाणी वापरतो आणि त्याचे सांडपाण्यात रुपांतर होते. पाण्याचे सांडपाणी करणा-यांवर कर लावला जावा. पाण्याचे रिसायकलींग व्हावे. हे पाणी जमिनीतच मुरले जावे. त्यामुळे मृत नद्या जिवंत होऊ शकतील, अशी मला खात्री आहे. ं


del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा