इकोफ्रेंडली गणेशोत्सवास प्रतिसाद वाढतोय
ध्वनि आणि पाणी प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासंदर्भात मंडळाचे सदस्य सचिव राधेश्याम मोपलवार यांच्याशी केलेली बातचीत.
इकोफ्रेंडली उत्सवासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रयत्नांना कसा प्रतिसाद मिळत आहे?
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवाबाबत विशेष सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसारच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्ती वापरण्याबाबत तसेच रासायनिक रंगांऐवजी शिसेविरहित नैसर्गिक रंग वापण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याबाबत जनजागृतीही केली जात होती. या उपक्रमास भाविकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन महिन्यांपूर्वी आयोजित केलेल्या सभेचेच येथे उदाहरण देता येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रहिवासी संकुले, घरगुती गणेशोत्सव साजरे करणारे आणि पर्यावरण तज्ज्ञांचा या सभेत सहभाग होता. यावेळी प्रमोद पालव या सिंधुदुर्ग येथील मूर्तीकाराने तयार केलेल्या इको फ्रेंडली मूर्तीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले होते. या सभेला मिळालेल्या प्रतिसादामुळेच पालव यांच्याकडे तब्बल दोन हजार मूर्तीसाठी मागणी नोंदवली गेली. वरळी येथील आदर्श गणेशोत्सव मंडळ ग्लोबल वॉर्मिगवर जनजागृती करणार असून या मंडळाची मूर्तीही इको फ्रेंडली असणार आहे. गिरगावच्या कुडाळदेशकर मंडळही फायबरच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणार असून या मूर्तीचे विसर्जनही केले जाणार नाही. तळ कोकणातल्या अनेक गावांमध्ये तर एक गाव एक गणपती राबवण्यास सुरूवात झाली आहे. अनेक केमिकल कंपन्यांनीही आता इको फ्रेंडली रंग बनवण्यास सुरूवात केली आहे.
कृत्रिम तलावांत गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याच्या संकल्पनेस गेल्या वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदाही असाच प्रतिसाद अपेक्षित आहे. गेल्यावर्षी ठाणे येथे निर्माल्य कलशात जमा झालेल्या निर्माल्यातून 12 टन खत निर्मिती करण्यात आली होती. अनेक लोक निर्माल्यासह प्लास्टिक पिशव्याही नदीत, समुद्रात सोडतात, यामुळे होणारे प्रदूषण निर्माल्य छोटय़ा उपक्रमातूनही ब-याच अंशी टाळता येते.
लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कोणते उपक्रम आखले?
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण स्नेही संस्थांच्या माध्यमातून विविध ठिकाणी शाडूच्या मूर्तींपासून तसेच कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. तसेच अशा मूर्ती कुठे उपलब्ध आहेत, याची माहितीही घरगुती गणेशोत्सव तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांना पुरवण्यात आली होती. पथनाट्यांसारखे जनजागृतीपर उपक्रमही राबवण्यात आले होते.
उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याबाबत..
गणेशोत्सवा दरम्यान ध्वनिक्षेपकांचा वापर ही चिंतेची बाब आहे. ध्वनिप्रदूषण नियमांच्या धर्तीवर पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु यासाठी आपण सर्वानीच वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेथे ध्वनिप्रदूषणामुळे त्रास उद्भवत असेल तेथे रहिवाशांनी पोलिसांशी संपर्क साधावा. एमपीसीबीतर्फे ध्वनिप्रदूषणाचे मॅपिंग केले जाणार आहे. पहिले पाच दिवस ध्वनिप्रदूषणाचे पातळी मोजून त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा