भारत दुस-या दिवसाखेर दोन बाद 180
वीरेंदर सेहवागच्या फटकेबाज खेळीच्या जोरावर भारताने कोलंबो कसोटीत दुस-या दिवसाखेर दोन बाद 180 धावा केल्या आहेत.
कोलंबो- गेल्या दोन कसोटी सामन्यांत विशाल धावसंख्या उभारणा-या श्रीलंकेचा डाव 425 धावांत संपवल्यानंतर, भारतीय संघाने तिस-या व अंतिम कसोटीच्या दुस-या दिवसाखेर दोन बाद 180 अशी मजल मारली आहे. सलामीवीर वीरेंदर सेहवाग शतकाच्या उंबरठ्यावर असून बुधवारी त्याने कसोटी कारकिर्दीतील सात हजार धावांचा टप्पाही ओलांडला. दुस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सेहवार 97, तर सचिन तेंडुलकर40 धावांवर खेळत होता.
मंगळवारच्या चार बाद 293 धावांवरून पुढे खेळण्यास उतरल्यानंतर श्रीलंकेच्या थिलन समरवीराने शतक पूर्ण केले. त्याने 137 धावांची नाबाद खेळी केली. मंगळवारच्या 26 धावांवरून पुढे खेळणारा अँजेलो मॅथ्युज 45 धावा करून बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. भारताकडून प्रज्ञान ओझाने चार, इशांत शर्माने तीन, तर वीरेंदर सेहवाग आणि अमित मिश्राने प्रत्येकी एक गडी बाद केला.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या वीरेंदर सेहवाग आणि मुरली विजय या बिनीच्या जोडीने 49 धावांची सलामी दिली. विजय 14 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला भरवशाचा राहुल द्रविडही 23 धावा करून बाद झाला. सेहवागने मात्र तुफान फटकेबाजी करून केवळ 87 चेंडूंत 97 धावा केल्या. सेहवाग आणि तेंडुलकरने तिस-या विकेटसाठी नाबाद 88 धावांची भागीदारी केली आहे.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा