भारताची श्रीलंकेवर नाममात्र आघाडी
वीरेंदर सेहवागच्या शतकाच्या जोरावर भारताने तिस-या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंकेवर 11 धावांची आघाडी घेतली आहे.
कोलंबो- वीरेंदर सेहवागचे शानदार शतक तसेच व्हीव्हीएस लक्ष्मण, सुरेश रैनाच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने तिस-या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंकेवर 11 धावांची नाममात्र आघाडी घेतली आहे. भारत व श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा व अंतिम सामना येथील सारा स्टेडियमवर चालू आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात उभारलेल्या 425 धावांच्या प्रत्युत्तरादाखल भारताने 436 धावा केल्या.
श्रीलंकेने दुस-या डावात तिस-या दिवसाखेर दोन बाद 45 धावा केल्या आहेत. शतकवीर सेहवागने गोलंदाजीतही चमक दाखवत श्रीलंकेच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट बाद केले. तिस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार कुमार संघक्कारा 12 धावांवर, तर नाइट वॉचमन सुरज रणदीव शून्य धावेवर खेळत होता.
बुधवारच्या दोन बाद 180 धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यानंतर लगेचच सचिन तेंडुलकर (41) वैयक्तिक धावसंख्येत केवळ एका धावेची भर घालून बाद झाला. सेहवागने शतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर तो फार काळ तग धरू शकला नाही. लक्ष्मण (56) आणि रैनाने (62) पाचव्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी रचून भारताचा काहीसा डळमळीत झालेला डाव सावरला. कर्णधार महेंद्रसिंग धोणी मात्र केवळ 15 धावा करून बाद झाला. तळाच्या फलंदाजांपैकी अभिमन्यू मिथुन (46) आणि अमित मिश्रा (40) यांच्या सुरेख फलंदाजीमुळे भारताला 11 धावांची आघाडी मिळाली. या दोघांनी 64 धावांची भागीदारी केली.
श्रीलंकेतर्फे सुरज रणदीवने चार, लसिथ मलिंगाने तीन, तर अजंथा मेंडिसने दोन गडी बाद केले.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा