ढोणीने घेतली अपयशाची जबाबदारी
ऑस्ट्रेलिया दौ-यातील भारताच्या निराशाजनक कामगिरीबद्दल कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने स्वत:लाच जबाबदार धरले आहे. त्याचप्रमाणे तिस-या कसोटी सामन्यात षटकांची गती न राखल्याने त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
पर्थ- ऑस्ट्रेलिया दौ-यातील भारताच्या निराशाजनक कामगिरीबद्दल कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने स्वत:लाच जबाबदार धरले आहे. ‘‘संघाचा कर्णधार म्हणून मीच अपयशाला जबाबदार आहे. त्यामुळे मी दोष स्वत:वर घेतो,’’ असे ढोणीने सांगितले. मात्र सर्वच बाबींना तांत्रिकदृटय़ा मी जबाबदार नाही असा बचावही त्याने केला. ‘‘संघाच्या यशापयशाला सर्व क्रिकेटपटू जबाबदार असतात. गोलंदाजांनी योग्य दिशेत गोलंदाजी करणे अपेक्षित असते. मात्र इंग्लंड दौऱ्यापेक्षा येथे बरी गोलंदाजी झाली असे मी म्हणेन. आमचे फलंदाज सातत्याने अपयशी ठरत आहेत. किमान तीनशे धावांचा पल्ला तरी गाठता आला पाहिचे. क्षेत्ररक्षकांनीदेखील सातत्य राखणे गरजेचे आहे. योग्य दिशेत आणि योग्य टप्यात गोलंदाजी करून फलंदाजांना कशा चुका करायला लावायच्या हे आम्ही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडून शिकलो आहोत. माझी फलंदाजी आणि कर्णधाराबद्दल बोलले जात आहे. माझी कामगिरी पाहता निश्चितपणे चिंतेची बाब आहे,’’ असे ढोणीने स्पष्ट केले.
व्ही.व्ही.एस. लक्ष्मणची पर्थ कसोटी शेवटची असू शकते अशा आशयाची वृत्ते भारतातील मिडियात झळकत असली तरी याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे ढोणीने स्पष्ट केले. संघातील सिनियर क्रिकेटपटूंबाबत त्याला विचारले असता,‘‘ सिनियरना वगळायचे की नाही याबाबतचा निर्णय कसोटी मालिका संपल्यावर घेण्यात येईल. सिनियर क्रिकेटपटूंना काय वाटते हेदेखील ध्यानात घेण्यात येईल. सिनियरना वगळणे सोपे नसले तरी याबाबतचा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागणार आहे. त्यांनी देशासाठी जे योगदान दिले आहे ते मोठे आहे. त्यातच संघात युवा आणि अनुभवी असे दोन प्रकार असणे गरजेचे असते. कारण कसोटी क्रिकेट हे अनुभवातूनच शिकता येते,’’ याकडे ढोणीने लक्ष वेधले.ढोणी अॅडलेड कसोटीतून ‘आउट’
षटकामागे स्लो-ओव्हररेट ठेवल्याने भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली असून त्यामुळे तो अॅडलेड येथे 24 जानेवारीपासून सुरू होणा-या चौथ्या कसोटीला मुकणार आहे. त्यामुळे भारताच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पर्थ कसोटीत नियोजित वेळेप्रमाणे भारताने दोन कसोटी कमी टाकल्याचे आढळले. ढोणीच्या मॅचफीमधून 40 टक्के कापण्यात आले असून संघातील अन्य क्रिकेटपटूंच्या मानधनातून 20 टक्के कापण्यात येणार आहेत. भारत गेल्या 12 महिन्यांत दुस-यांदा स्लो ओव्हरेटच्या कचाटय़ात सापडला. आयसीसीचे सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी ही कारवाई केली. ढोणीला याआधीच त्यापासून सावधही करण्यात आले होते. नव्या नियमाप्रमाणे 12 महिन्यात एकदाच स्लो-ओव्हरेट माफक आहे. ढोणीच्या अनुपस्थित चौथ्या कसोटीत वीरेंदर सेहवाग संघाचे नेतृत्व करेल आणि यष्टिरक्षणाची जबाबदारी वृद्धिमान सहावर असेल.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा