महेंद्रसिंग ढोणी सर्वोत्कृष्ट कर्णधार-सचिन
'माझ्या 21 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीतील महेंद्रसिंग ढोणी हा सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे' असे सांगत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ढोणीचे जाहीर कौतुक केले.
मुंबई- 'माझ्या 21 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये मी सहा कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. त्यामध्ये महेंद्रसिंग ढोणी हा सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे', असे सांगत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने ढोणीचे जाहीर कौतुक केले. विश्वचषक जिंकल्यानंतर सोमवारी सचिनने एक पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
ढोणीच्या नेतृत्वाखाली भारतासाठी वर्ल्डकप जिंकता आला याचं मोठं समाधान असल्याचे सचिनने यावेळी सांगितले. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. हा खेळ करताना प्रत्येकजण देशासाठी खेळला. यामुळेच भारतीय संघ वर्ल्डकप जिंकू शकला असे ही त्याने यावेळी नमूद केले. या पत्रकार परिषदेत कर्णधार ढोणीविषयी सचिन भरभरून बोलला. आपल्या कारकिर्दीतील ढोणी सर्वोत्तम कर्णधार आहे. एका यशस्वी कर्णधारामध्ये जे जे गुण असायला हवे ते सर्व ढोणीमध्ये आहे. सामन्यातील कठीण प्रसंगी शांत आणि संयमाने परिस्थीती कशाप्रकारे हाताळायची याची नेमकी जाणीव ढोणीकडे आहे. अशावेळी संघातील सर्वांशी विचारविनीमय करून तो परिस्थिती ज्या नेमकेपणाने हाताळतो ते खऱोखरच कौतुकास्पद असल्याचेही सचिनने यावेळी आवर्जून सांगितले.
भारतीय संघाचे प्रशिक्षक गॅरी कस्टन यांचा संघाच्या विजयामधील वाटा मोठा असल्याचे सचिनने सांगितले. त्यांनी ज्या सूचना दिल्या त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली. यापुढेही गॅरीने प्रशिक्षक म्हणून राहिलेले आवडतील मात्र त्यांच्यावर असलेल्या काही त्याच्या काही कौटुंबिक जबाबदा-यांमुळे त्यांना जावे लागत असल्याचे सचिनने सांगितले.
शनिवार, दोन एप्रिल 2011 हा आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस असल्याचे सचिनने सांगितले. वर्ल्डकप जिंकल्यानंतर माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. वर्ल्डकप जिंकणे हे इतरांप्रमाणेच माझे देखील स्वप्न होते. देवाच्या कृपेने हे स्वप्न प्रत्यक्षात आले. 1987 मध्ये भारतात वर्ल्डकप झाला तेव्हा मी अवघा 15 वर्षांचा होतो. त्यावेळी वानखेडेवर मी बॉलबॉय होतो तेव्हा सुनील गावसकर मला ड्रेसिंगरुममध्ये घेऊन गेले होतो. तो दिवस जेव्हा आम्ही वर्ल्डकप जिंकला तेव्हा तो मला जसाच्या तसा आठवला. तो दिवस आतापर्यंतच्या माझ्या आय़ुष्यातील एक अविस्मरणीय दिवस होता. त्यानंतर दोन एप्रिल 2011 हा माझ्या आय़ुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरला आहे.
वर्ल्डकप जिंकणे हे गेल्या 21 वर्षांपासून माझे स्वप्न होते. हे स्वप्न साध्य करण्यासाठी मी खेळत आहे. वर्ल्डकप मिळाल्याचे समाधान मिळाल्याचे सचिनने सांगितले. या पत्रकार परिषदेमध्ये त्याच्या निवृत्तीबाबत विचारले असता तो म्हणाला की,क्रिकेट खेळण्याचा आनंद अजूनही काही वर्षे खेळणार असल्याचे त्याने सांगून त्याने याबाबतच्या सर्व प्रश्नांना पूर्णविरमा दिला.
वर्ल्डकपमधील भारताच्या एकूण कामगिरीबाबत सचिनला विचारले असता तो म्हणाला की, सुरुवातीला फलंदाजी,गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांच्यामध्ये योग्य तो समन्वय साधला जात नव्हता. मात्र शेवटच्या तीन सामन्यात भारतीय संघ सर्वच बाबतीत सरस ठरला. वर्ल्डकप जिंकायचाच हा एकच ध्यास सर्वच खेळाडूंनी घेत त्यासाठी प्रचंड मेहनत घेत हे स्वप्न साकारल्याचे सचिनने सांगत संघातील सर्वच खेळाडूंची मुक्त कंठाने प्रशंसा केली.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा