वर्ल्डकप जिंकणे हे ध्येयच होते- ढोणी
वर्ल्डकप जिंकायचाच हे लक्ष्य ठेवत त्यानुसार आखलेल्या नियोजनामुळे हा विजय मिळवू शकलो अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणी याने सामन्यानंतर व्यक्त केली.
मुंबई- वर्ल्डकप जिंकायचाच असे लक्ष्य ठेवत त्यानुसार आखलेल्या नियोजनामुळे हा विजय मिळवू शकलो, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणी याने सामन्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. भारतीय क्रिकेट खेळाडूंनी साध्य केलेल्या या विजयामुळे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर मिळाल्याचेही ढोणीने आवर्जून सांगितले.
मुंबईतील वानखेडे मैदानावर शनिवारी झालेल्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर सहा गडी राखून शानदार विजय मिळवला. यामुळे तब्बल 28 वर्षांनंतर भारताने वर्ल्डकप जिंकला. भारतीय संघाने संपादन केलेल्या या दिमाखदार विजयाचा आनंद देशभर साजरा केला जात आहे. वर्ल्डकप मिळाल्याचा आनंद हा अविस्मरणीय आहे. मात्र आठ एप्रिलपासून सुरू होणा-या आयपीएलमुळे हा आनंद साजरा करण्यासाठी पुरेसा वेळ आपल्याकडे नसल्याचे ढोणीने यावेळी सांगितले. वर्ल्डकप जिंकायचाच हे आम्ही सर्वांनी मिळून ठरवले होते. त्यादृष्टीने संघातील सर्व खेळाडूंना स्वतःला मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या तंदुरूस्त ठेवत संघाचेही नियोजन केले. वर्ल्डकमधील प्रत्येक सामन्यामध्ये संघातील प्रत्येक खेळाडूने त्याच्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम खेळी केल्यामुळे वर्ल्डकप जिंकणे शक्य झाले. हा विजय संघातील प्रत्येक खेळाडूसाठी असून तो अविस्मरणीय असल्याचे मत कर्णधार ढोणी याने व्यक्त केले.
मलिंगाच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारला तेव्हा मी पीचच्या मध्यावर आलो होतो. नेमके काय घडत आहे हे मला कळत नसल्याने मी प्रचंड गोंधळून गेलो होते. बॉल सीमापार गेल्यानंतर युवराजने येऊन मला घट्ट मिठी मारली तेव्हा मी भानावर आलो आणि आपण हा सामना जिंकल्याचे समजले तो क्षण माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय असल्याचे ढोणीने सांगितले. वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ढोणीने नाबाद 91 धावा केल्या होत्या.
वर्ल्डकपची फायनल जिंकण्यासाठी संघाने कोणती व्यूहरचना आखली होती असा प्रश्न त्याला विचारला असता त्याने याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला.मात्र गेल्या काही दिवसांपासून संघातील प्रत्येक खेळाडूने जी मेहनत घेतली आहे त्यामुळे हा विजय साकारू शकल्याचे ढोणीने सांगितले. आपल्याकडे क्रिकेट या खेळाशी अनेकांचे भावनिक नाते जुळले गेले आहे 1983 मध्ये पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकल्यानंतर हे नाते अधिकच दृढ झाले आहे. त्यामुळे भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूंवर क्रिकेटप्रेमी रसिकांच्या अपेक्षांचे ओझे आहे. अशा परिस्थितीमध्ये खेळणे खूप कठीण असते मात्र संघातील प्रत्येकाने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये नोंदवल्याचे ढोणीने सांगितले.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा