PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: मी माणसातला माणूस पाहिला मी माणसातला माणूस पाहिला ================================================================================ नारायण राणे on 09 June, 2009 09:51:00 PM आपल्या देशात १५व्या लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. तिचा निकाल १६ मे २००९ रोजी लागला. तो सगळय़ांसाठीच धक्कादायक ठरला. मात्र काँग्रेसजनांसाठी हा अपेक्षितच होता. त्यात काँग्रेसला भरीव यश मिळून देशात पुन्हा एकदा यूपीएचे सरकार स्थापन झाले आणि पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग शपथबद्ध झाले. या सर्वाचे श्रेय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष मा. सोनिया गांधी, मा. राहुल गांधी व डॉ. मनमोहन सिंग साहेब यांच्याकडे जात असल्याने या तिघांचेही मी अभिनंदन करतो. देशातील जनतेने, हा देश सुरक्षित राहावा, देशाचा सर्वागीण विकास व्हावा आणि स्थैर्य मिळावे म्हणून मतदान करून काँग्रेसवर विश्वास ठेवला. देशामध्ये काँग्रेसची सत्ता यायला या वेळेला महाराष्ट्राने चांगला हातभार लावलेला आहे. काँग्रेसचे एकूण १७ खासदार, अपक्ष २, राष्ट्रवादी ८ असा पाठिंबा मिळालेला आहे. यामध्ये १९ वर्षानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेसला यश मिळालेले आहे. या मतदारसंघातून माझे सुपुत्र डॉ. निलेश राणे हे ४६ हजार ७५० मताधिक्याने विजयी झाले. शेवटी विजय हा विजयच असतो, हार ही हारच असते. ती कितीही मतांनी असो. विजय आणि हार या दोन्ही गोष्टी पचवाव्या लागतात. ते करण्याची ज्यांची क्षमता आहे, त्यांनीच राजकारण करावे, असे माझे प्रामाणिक मत आहे. या विजयानंतर कोकण आणि राज्य पातळीवरच्या अनेक मान्यवरांनी व पत्रकारांनी सिंधुदुर्गातील मताधिक्य घटण्यासंबंधी वेगवेगळी मते मांडलेली आहेत. घटलेली मते कशामुळे व कोणामुळे घटली याचे विश्लेषणही करण्यात आलेले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मीही या सर्वाची माहिती घेऊन अभ्यास केला, त्यामुळेच हे विचार प्रकट करत आहे. गेली २० वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, पुन्हा मंत्री, सिंधुदुर्गचा पालकमंत्री या पदावर दोनदा एवढे काम मी केलेले आहे. ते करताना या सगळय़ा पदांना प्रामाणिकपणे, निष्ठेने न्याय देण्याचा प्रयत्न केला. ज्या कोकणात आपला जन्म झाला, तेथील जनतेने पदांच्या रूपाने संधी दिली आहे; त्यांच्यासाठी कृतज्ञतेच्या भावनेतून आपण काम केले पाहिजे, हे ध्येय डोळय़ासमोर ठेवले. या जिल्ह्यातील कोणत्याही जाती-धर्माची, कोणत्याही पक्षाची व्यक्ती कोणतेही काम घेऊन माझ्याकडे आली किंवा अडचणीत सापडली असेल तर तिला मदत करण्याचे कामच मी केलेले आहे. जात, पात, धर्म आणि पक्ष कधीच पाहिलेला नाही, माणुसकी हाच धर्म पाहिला. अनेक लोकांचे जीव वाचवले. काहींना शिक्षणासाठी, आरोग्यासाठी मदत केली. बेघरांना घर वसवून दिले. पैसे नाहीत म्हणून प्राण गमवावा लागला, अशी पाळी सिंधुदुर्गात कुणावरही येऊ दिलेली नाही. कुठच्याही प्रसंगी उपयोगी पडणे, हा माझा स्वभाव आहे. कालाष्टमीच्या दिवशी विद्युत खांबावरून पडून मृत्यू पावलेल्या वरवडेतील मुस्लिम बांधवाचे कुटुंब उघडय़ावर आले. सहा लहान मुले आहेत. त्यांच्या पोषणासाठी दरमहा मी मदत करतो. वैभववाडीतील धनगर समाजाच्या मुलांवरील आई-वडिलांचे छत्र हरपले. हे वृत्तपत्रात वाचून माझे मन हेलावले. त्या मुलांसाठी ‘सावली’ नावाचे घरकुल दिले. या निराधार मुलांचे वृत्त वाचून विरोधकांना का नाही कुणास मदत करावीशी वाटली? आजही सरकारचे अनुदान न घेता आमचा वृद्धाश्रम सुरू आहे. २० वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग आणि तेव्हाचा कोकण हा दारिद्रय़ाशी सामना करणारा गरीब प्रदेश म्हणून ओळखला जात होता. २० वर्षानंतर आता या सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय नाही? पायाभूत पातळीवर कोणत्या बाबतीत विकास झालेला नाही? आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज या सर्वच क्षेत्रांत करोडो रुपये आणून हा सिंधुदुर्ग जिल्हा पायाभूत सुविधांमध्ये आदर्श जिल्हा बनविण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अशा पायाभूत सुविधा महाराष्ट्रात अन्य कोणत्या जिल्ह्यात एवढय़ा कमी कालावधीत झाल्या आहेत, हे दाखवून द्यावे. या जिल्ह्यासाठी पाटबंधारे विभागाचे कमीत कमी १६०० कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. ते पूर्ण होतील तेव्हा सिंचनक्षमता १८ टक्क्यांपर्यंत जाईल. जिल्ह्यात पिण्याच्या पाणीपुरवठय़ासाठी मुख्यमंत्री असताना जवळपास १४० कोटीच्या नळपाणी योजना अंमलात आणल्या आहेत. पूर्वी १० ते १२ लाखाच्या योजनांना मंजुरी मिळायची. हा बजेट प्लान १८ ते २० लाखांपर्यंत नेऊन योजना विस्तारल्या. राज्यात उन्हाळय़ात १०० ते २०० टँकर लावलेले अनेक जिल्हे आहेत. माझ्या जिल्ह्यात या वर्षी शेवटच्या आठवडय़ात दोन ते चार टँकरपलीकडे मागणी नव्हती. एके काळी इथल्या मुलांवर शिक्षणासाठी मुंबई, पुणे येथे जायची पाळी येत होती. दहावी-बारावीचे रिझल्टही २५ ते ४० टक्क्यांच्यावर लागत नव्हते. आज शाळांचे रिझल्ट ८५ ते १०० टक्के लागत आहेत. हे कशामुळे? शिक्षणासाठीही पोषक वातावरण हवे असते. शैक्षणिक अनुशेष राहू नयेत, रिक्त पदे असू नयेत यासाठी आम्ही धोरणात्मक निर्णय घेतले, जिल्ह्यातील ३४६ डी.एड. बेकारांना नोकरीची संधी दिली. गतवर्षीच १२० बेरोजगारांना शिक्षक म्हणून सेवेत रुजू करण्यात आले. प्रत्येक तालुक्याला इंग्लिश मिडियम स्कूल, आयटीआय, मालवण येथे पॉलिटेक्निक, कणकवली येथे इंजिनीअरिंग कॉलेज सुरू केले आहे आणि आता कसाल येथे लवकरच मेडिकल कॉलेजही सुरू होत आहे. आरोग्याच्या बाबतीतही जिल्हा सक्षम असावा, असा प्रयत्न आहे. ओरोस जिल्हा रुग्णालयासाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रसामग्री अन्य जिल्ह्यांच्या तुलनेने पूर्णपणे पुरविली गेली आहे. जिल्ह्याचे १०० टक्के विद्युतीकरण अंतिम टप्प्यात आहे. हाताच्या बोटांवर मोजक्या वाडय़ा राहिल्या असतील, त्याही पूर्ण होतील. रस्ते विकासासाठी राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या रस्त्यांना मी आतापर्यंत भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. अन्यत्र कुठेही नाहीत एवढे चांगले रस्तेकरण्यात यश मिळविले आहे. जिल्हा नियोजन फंड पाच ते सहा कोटी होता. तो ६० कोटीपर्यंत नेण्याचे काम केले आहे. पायाभूत सुविधांमध्ये हा जिल्हा अग्रेसर आहे. माझ्या लोकांची आर्थिक प्रगती व्हायला हवी, हे माझे लक्ष्य आहे. म्हणूनच काँग्रेसमध्ये आल्यानंतर पुन्हा मंत्री होताच १९९७मध्ये जो पर्यटन जिल्हा घोषित केला होता, त्याला चालना देण्याचे काम मी केले. जिल्ह्यात मोठय़ा संख्येने बेरोजगार आहेत, त्यांना काम मिळावे, नोकरी मिळावी, शेती-बागायतीने हा भाग समृद्ध व्हावा, या हेतूने गेली २० वर्षे मी काम करत आहे. या जिल्ह्याची सांस्कृतिक प्रगती होण्यासाठी देशातील गाजलेले अभिनेते, गायक, कलावंत सिंधुमहोत्सवाच्या माध्यमातून लोकांसमोर आणले, नाटय़ संमेलनाप्रमाणेच अनेक उपक्रम हाती घेतले. जिल्ह्यात लोकांशी माझी नाळ जुळली आहे. त्यांनी दिलेल्या प्रेमापोटीच मी हे करीत आलो आहे. हे काही उपकार करीत नव्हतो. मी पदरचे पैसे घालवून काम करीत असताना विरोधकांनी फक्त अफवा पेरण्याचे काम केले आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवला, यामागचे कारण काय? विरोधकांनी विकासाच्या मुद्दय़ावर एकही भाषण केलेले नाही, काम केलेले नाही, तरी त्यांनी मते घेतलीच. ते लोकप्रतिनिधी असताना संकटाच्या वेळी, दुष्काळी परिस्थितीत येथील जनसामान्यांना भेटले, त्यांना मदत केली, याचे एक तरी उदाहरण द्यावे. या जनतेसाठी ते कधी उपलब्ध असतात? निवडून गेल्यानंतर जे चार वर्षे तोंडही दाखवत नाहीत, त्यांच्याकडून विकासाच्या अपेक्षा काय ठेवणार? ब्राह्मणांमध्ये जाऊन एसएमएस पाठवून आपल्या जातीचा माणूस उभा आहे, असे सांगून मते मिळविण्याचा प्रयत्न केला गेला. विविध समाजांतील लोकांना आमिष दाखवून मते वळविण्याचा प्रयत्न केला गेला. १४ वर्षे लोकप्रतिनिधी आणि मंत्री असणा-याला मतांसाठी जातीचा आधार घ्यावा लागतो, हे दुर्दैव आहे. याबाबत माझ्याकडे ठोस पुरावे आहेत. कोणी एसएमएस पाठविले? कोणी कामगारांना वेठीस धरले? मनाविरुद्ध काम करण्यास भाग पाडले? हे सर्व आम्ही जाणतो. या जिल्ह्यात मी कधीही जातीचे राजकारण न करता, पक्षाचे ध्येयधोरण डोळय़ासमोर ठेवून गुणवत्तेवर कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम केले. कुठल्याही कार्यकर्त्यांला जात विचारली नाही. मी मराठा समाजाचा आहे. तो येथे ६५ टक्के आहे, म्हणून मी या समाजाला मते द्या, असे म्हटलेले नाही. मी जर सर्वाचा विकास करीत असेन, सर्वासाठी झटत असेन. तर माझ्या पाठीमागे उभे राहा, असे मी सांगत आलो आहे. या निवडणुकीत औष्णिक प्रकल्पाचा प्रश्न निर्माण करण्यात आला. या प्रकल्पाचे अजून कशातच काही नाही, राज्याची परवानगी अद्याप नाही. यासंदर्भात माझा विरोध ठाम आहे. जनतेला जे नको आहे, ते होणार नाही, असे मी स्पष्ट केले आहे. तरीही पुन्हा-पुन्हा हा प्रश्न उगाळत विरोधाचा सूर लावला गेला. मायनिंग तर गेली ५० वष्रे सुरू आहे. हा प्रश्न आम्ही निर्माण केलेला नाही. ज्यांना मायनिंग नको आहे. त्यांनी जमिनी देऊ नयेत, अनुमती देऊ नये, मग मायनिंग येणारच नाही. पण माझे विरोधक विकासात्मक चर्चेसाठी समोर येणार नाहीत. कारण त्यांच्याकडे तसा दृष्टिकोन आणि वैचारिक समजच नाही, असे मी समजतो. असे असताना मला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही, याची खंत जरूर आहे आणि राहील. काम केल्याने मते मिळत नाहीत. द्वेष आणि अफवा पसरविणा-यांना मते मिळतात, हे या निवडणुकीतून शिकता आले. मुलगा खासदार झाला. काँग्रेसला कोकणातून एक खासदार मिळाला, याच्या आनंदापेक्षा मते घटल्याचे दु:ख अधिक आहे. या भागासाठी वीस वर्षे नि:स्वार्थीपणे, वेळप्रसंगी सरकारशी भांडून आपल्या भागात योजना आणि पैसा आणला. एवढे केल्यानंतरही मते घटवून जनतेने जी नाराजी व्यक्त केली, ती पाहून मन हेलावून गेले. मी आता विजयाच्या मूडमध्ये असायला हवा होतो. तो आजही नैराश्यातून बाहेर पडलेलो नाही. तरीही मला सांगावेसे वाटते की, मतदार हा राजा आहे. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही केले. शंभर टक्के विकास केला हा माझा दावा नाही, तो करणारही नाही. जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचले, ते तुमच्यामुळेच. तुमच्याबद्दल माझी नाराजी नाही. मतदानाच्या आकडेवारीवरून जी नाराजी आली आहे, त्यावरून रोष ठेवणाऱ्यांसारखा मी नाही. मी या जनतेला आपल्या कुटुंबाप्रमाणे मानतो. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक समृद्धी आणावयाची असेल आणि सुखी, समृद्ध समाज घडवायचा असेल तर, एकजूट करून एकविचाराने एका नेतृत्वाच्या मागे खंबीर उभे राहायला हवे. आज मी आहे. राजकारणात उद्या नसेनही. हा जिल्हा कोणत्या दिशेने न्यायचा आहे, याचा विचार सिंधुदुर्गातील जनतेने करावा, अशी माझी नम्र विनंती आहे. हे सर्व या जिल्ह्यातील जनतेवर प्रेम आणि श्रद्धा आहे, यापोटीच लिहिले आहे.ंंं