दुहेरी आरोग्य संकट

भारताने आरोग्य क्षेत्रात गेल्या काही दशकांत महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. कुपोषण, माता व बालमृत्यू दर कमी झाले असून आयुर्मानही वाढले आहे. मात्र, या प्रगतीसोबतच लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांचे प्रमाण वाढत असून नवीन आरोग्य आव्हाने निर्माण झाली आहेत.


भारताने पूर्वीच्या कुपोषण, माता आरोग्य आणि बालकांच्या आरोग्य क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. पूर्वी सरासरी आयुर्मान केवळ ३५ ते ४० वर्षे इतके होते, मात्र आज वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, डॉक्टरांचे प्रयत्न आणि विविध रोगांवरील प्रभावी औषधांमुळे ते वाढून सुमारे ७० वर्षांपर्यंत पोहोचले आहे; काही व्यक्तींचे आयुर्मान ८० ते ९० वर्षांपर्यंतही दिसून येते. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०२३-२४ च्या अहवालानुसार बालकांचे कुपोषण आणि मातांच्या आरोग्य स्थितीत सकारात्मक सुधारणा झाल्याची नोंद आहे. तथापि, वाढता लठ्ठपणा आणि मधुमेहाचे वाढते प्रमाण हे नव्या सार्वजनिक आरोग्य आव्हानांपैकी ठरत आहे. या सर्वेक्षणानुसार १४ ते ४९ वयोगटातील महिलांमध्ये ओव्हरवेट आणि लठ्ठपणाचे प्रमाण ३०.७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे, जे पूर्वीच्या अहवालात २४ टक्के होते. पुरुषांमध्येही हे प्रमाण वाढून २७.३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. हीच प्रवृत्ती भारतातील बहुतांश राज्यांमध्ये दिसून येते. उदाहरणार्थ, गोव्यात महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ४५.१ टक्के इतके उच्च आहे. यावरून स्पष्ट होते की भारतात आज 'दुहेरी आरोग्य संकट'निर्माण झाले आहे. एकीकडे कुपोषणाचे आव्हान कमी होत असताना दुसरीकडे जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहे. भारताच्या एका भागात अजूनही कुपोषणाचे गंभीर संकट आहे, तर दुसरीकडे लठ्ठपणा (ओबेसिटी) हे लोकांच्या आरोग्यासमोर मोठे आव्हान बनत आहे.




एकीकडे अंडरन्यूट्रिशन म्हणजेच कुपोषण हे भारतासमोरचे महत्त्वाचे प्रश्न आहे, तर दुसरीकडे चुकीच्या आहाराच्या सवयी आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे मधुमेहासारख्या आजारांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. आंध्रप्रदेशमध्ये लठ्ठपणाचे सर्वाधिक प्रमाण आढळले असून, तेथे ४७.९ टक्के महिला या ओव्हरवेट किंवा लठ्ठ वर्गात मोडतात. यावरून स्पष्ट होते की भारतासमोर आता दुहेरी आव्हान उभे आहे—एकीकडे कुपोषणाची समस्या आणि दुसरीकडे वाढता ओव्हरवेट व लठ्ठपणा. त्याचबरोबर, मुलांच्या कुपोषणाच्या स्थितीत मात्र लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे, ही एक सकारात्मक बाब आहे. ज्या मुलांमध्ये स्टंटिंग (खुरटलेली वाढ) आढळते, त्यांचे प्रमाण या सर्वेक्षणानुसार ३५.५ टक्क्यांवरून २९.३ टक्क्यांपर्यंत घटले आहे. ही केवळ आकडेवारी नसून एक सकारात्मक बदल दर्शवते. खुरटलेली वाढ असलेल्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली, म्हणजेच क्रॉनिक कुपोषणापासून अधिक मुले मुक्त झाली. यामागे अनेक कारणे आहेत. मातांच्या आरोग्यस्थितीत सुधारणा झाली असून आयर्न-फॉलिक अॅसिड गोळ्यांचे नियमित सेवन वाढले आहे. तसेच रुग्णालयांमध्ये प्रसूतीचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले.



मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण ७६.६ टक्क्यांवरून ८२.६ टक्क्यांपर्यंत वाढले. या सुधारणांमागे सरकारी कल्याणकारी योजना, आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांमध्ये झालेली सुधारणा तसेच वाढते शैक्षणिक आणि सामाजिक जागरूकतेचे वातावरण ही प्रमुख कारणे आहेत. पूर्वी शिक्षणाचे प्रमाण तुलनेने कमी असल्यामुळे आरोग्य आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत पुरेशी जागरूकता नव्हती. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. आजच्या विकसित होत असलेल्या भारतात लोक अधिक जागरूक झाले आहेत आणि सरकारही विविध योजना प्रभावीपणे राबवत आहे. माता व बाल आरोग्याबाबत जनजागृती वाढली असून स्वच्छता सुविधांमुळे आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसतो. स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन आणि वीजपुरवठा सुधारणा यांसारख्या उपक्रमांमुळे पायाभूत सुविधा मजबूत झाल्या आहेत.महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणातही महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. महिला अधिक शिक्षित, स्वावलंबी आणि सक्षम झाल्या असून त्याचा सकारात्मक परिणाम सामाजिक व आर्थिक स्थितीवर दिसतो. लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब कल्याण क्षेत्रातही सुधारणा झाली असून आधुनिक गर्भनिरोधक साधनांच्या उपलब्धतेमुळे एकूण प्रजनन दरात घट झाली आहे.तथापि, ही प्रगती अजून पूर्ण समाधानकारक नाही; काही क्षेत्रांमध्ये पुढील सुधारणा आवश्यक आहे.




राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानुसार कुपोषणाच्या समस्येत काही सुधारणा झाल्या असल्या तरीही महिला व बालकांच्या आरोग्याशी संबंधित काही गंभीर प्रश्न अद्याप कायम आहे. विशेषतः बालकांमधील खुंटलेल्या वाढीच्या समस्येत घट झाली असली तरी ती पूर्णपणे दूर झालेली नाही. दुसरीकडे, लठ्ठपणाही चिंताजनक समस्या बनली आहे. महाराष्ट्रात सुमारे ३१.१% महिला या समस्येचा सामना करत आहे, तर नागरी भागात हे प्रमाण सुमारे ४०.१% पर्यंत पोहोचते. बीएमआय २५ किंवा त्याहून अधिक असणे हे हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि यकृताशी संबंधित आजारांना आमंत्रण देते. त्यामुळे लठ्ठपणा हा केवळ सौंदर्याचा प्रश्न नसून गंभीर आरोग्याचा विषय आहे. गेल्या काही वर्षांत या समस्येची प्रमुख कारणे म्हणजे बदललेली जीवनशैली, अपुरी शारीरिक हालचाल, असंतुलित आहार आणि शहरीकरणामुळे वाढलेला ताण. विशेषतः शहरी भागातील प्रौढ व महिलांमध्ये व्यायामाच्या सवयी कमी झाल्या, हे एक महत्त्वाचे कारण आहे.



म्हणूनच, या सर्व सकारात्मक बदलांसोबतच वाढत्या आरोग्य समस्यांकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली यावर भर देऊन लठ्ठपणासारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये लठ्ठपणाची समस्या अधिक तीव्र झाली असून ती केवळ शहरी भागापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ग्रामीण भागातही वाढताना दिसते. महाराष्ट्रातही ग्रामीण व शहरी दोन्ही भागांत लठ्ठपणा ही केवळ महिलांची नव्हे, तर पुरुषांचीही महत्त्वाची समस्या बनली आहे. हे बदल जीवनशैलीतील फरक दर्शवतात. विकसित देशांमध्ये बैठे काम अधिक असल्याने शारीरिक हालचाल कमी होते आणि हाच ट्रेंड आता भारतातही दिसू लागला आहे. अहवालातून एक सकारात्मक बाब समोर आली आहे. महिलांमधील कुपोषणाचे प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेत कमी झाले आहे. तसेच कोविडनंतर लसीकरणाबाबत लोकांचा विश्वास वाढल्याचेही दिसते. एकूणच, हा अहवाल बदलत्या आरोग्य परिस्थिती आणि जीवनशैलीतील बदल अधोरेखित करतो.

Comments
Add Comment

डिजिटल आर्थिक क्रांतीतील नवे पर्व

अलीकडेच भारताने डिजिटल क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये एक एतिहासिक पाऊल टाकले. आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी

मराठवाड्यात पिकांना नवसंजीवनी

मराठवाड्यात समाधानकारक सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा

जेथे जाऊ तेथे...

तुकाराम मुंढे सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात आहेत. मुंढेंनी महाराष्ट्रातील अनेक मातब्बर ब्रँड, आस्थापनांना

India : आव्हान समान ऊर्जावाटपाचे

आज भारताकडे ऊर्जा क्षेत्रात जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे; मात्र देशातील प्रत्येक घर, शेत, शाळा आणि

Nashik : नाशिकमध्ये ‘स्टार रेट’वरून रणकंदन

नाशिक महानगरपालिकेच्या विकासकामांसाठी प्रशासनाने अलीकडेच ‘स्टार रेट’ ही दरनिर्धारण प्रणाली लागू केली आहे.

Government in India : अराजकाशी दोन हात

भारतात सरकारकडे एवढी प्रचंड शासनक्षमता आहे, की तिचा पूर्ण वापर करण्याची वेळ क्वचितच येते. इथलं सामाजिक, राजकीय