मुंबई : मुसळधार पावसात लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या वादातून बुधवारी झालेल्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना गुरुवारी विधानसभेत त्याचे तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणी येत्या सोमवारपर्यंत निवेदन सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनाला दिले.
उबाठा गटाचे आ. भास्कर जाधव, काँग्रेस आ. नाना पटोले यांच्यासह इतर सदस्यांनी या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला होता. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “काल मुंबईच्या लोकलमध्ये घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर, देशाला हादरवून गेली. सर्वसामान्य लोकांनी जगावे की, नाही, अशी परिस्थिती आहे. प्रवाशी रेल्वे स्थानकात जातात तेव्हा सुरक्षेसाठी तिथे त्यांची स्कॅनिंग होते. मी आज सकाळी मुद्दाम ती स्कॅनिंगची पद्धत बघायला गेलो. पण ते फक्त दिखावे असून तिथे कुठलेही स्कॅनिंग होत नाही. २६/११ ची घटना आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सर्वसामान्य माणूस रेल्वेने प्रवास करतो, अशावेळी त्याच्या सुरक्षेसाठी कुठली व्यवस्था नसल्यास ही गंभीर बाब आहे.”
यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर म्हणाले की, “सदस्यांनी मांडलेला हा स्थगन प्रस्ताव अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. मुंबईसारख्या शहरात हजारोंच्या संख्येने लोक असलेल्या रेल्वे स्थानकात भरदिवसा कुणाचा खून होत असल्यास ती अत्यंत गंभीर बाब आहे. रेल्वे स्थानकांचे नियंत्रण रेल्वेकडे असले तरी त्या स्थानकावरील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी पूर्णपणे महाराष्ट्र शासनाची आहे. त्यासाठी शासनाचे रेल्वे सुरक्षा दल आहे. त्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. असे असतानाही मुंबई शहरात अशी गंभीर घटना होत असल्यास ते खेदजनक आहे. शासनाने यासंदर्भात त्वरित उपाययोजना करावी. तसेच सोमवारी सायंकाळपर्यंत सभागृहात यासंदर्भातील निवेदन करावे,” असे आदेश त्यांनी दिले.