कणकवली : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेती आणि शेतकरी अधिक सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा मिळाल्यामुळे मत्स्यव्यावसायिकांनाही शेतकऱ्यांप्रमाणे विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.(Nitesh Rane)
कोकणातील आंबा, काजू आणि भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित विशेष प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, बारामती येथील एआय संस्थेसोबत करार करण्यात आला असून जिल्हा नियोजन समितीतून २.५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या शेतीत एआयच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज, रोग व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी प्रयोग केले जाणार आहेत. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Sindhudurg)
मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा मिळाल्याने कर्जमाफी, वीजबिल माफी आणि इतर कृषी योजनांचा लाभ मत्स्यव्यावसायिकांनाही मिळावा यासाठी शासन निर्णय (CR) लवकरच जारी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय बंदरे आणि मत्स्यव्यवसाय विभागात प्रत्येकी ४५० पदांची भरती प्रक्रिया सुरू असून, पहिल्या टप्प्यात २४० पदांची भरती जाहीर करण्यात आल्याची माहिती देत अधिकाधिक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.