नवी दिल्ली : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. पण सकाळी काँग्रेस मुख्यालयात एक अनेपेक्षित अशी घटना घडली. राष्ट्रध्वज फडवण्याआधी 'वंदे मातरम्' सुरू झाले. कायद्यातील नव्या तरतुदीनुसार फक्त पहिलं कडवं नाही तर पूर्ण 'वंदे मातरम्' होणार होते. यानंतरच पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तिरंगा फडकवणार होते. नियोजनानुसार 'वंदे मातरम्' सुरू झाले आणि थोड्या वेळाने एक धक्कादायक घटना घडली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी अस्वस्थ असल्याचे दिसून आले. सोनिया यांनी स्वतःची जागा सोडली आणि त्यांनी खर्गेंच्या जवळ जाऊन त्यांना काहीतरी कानात सांगितले. थोड्याच वेळात काँग्रेसचा एक कार्यकर्ता खर्गे आणि सोनिया गांधी यांच्या जवळ येऊन उभा राहिला. त्याला निरोप दिला गेला.
नियमानुसार 'वंदे मातरम्' सुरू असताना सावधान स्थितीत उभे राहणे आवश्यक आहे. पण काँग्रेस मुख्यालयातील कार्यक्रमात या नियमाचे उल्लंघन झाल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओवरून सोशल मीडियात अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. 'वंदे मातरम्'चा अपमान खपवून घेऊ नये, कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी सोशल मीडिया युझर करू लागले आहेत. अनेकांनी काँग्रेस मुख्यालयात घडलेल्या घटनेवरून काँग्रेस नेत्यांवर कडाडून टीका केली आहे.
#WATCH | Delhi: The full Vande Mataram, was played at 80th Independence Day celebrations held at Congress headquarters today
Congress President Mallikarjun Kharge, CPP chairperson Sonia Gandhi and LoP Lok Sabha Rahul Gandhi and others were present on the occassion pic.twitter.com/BOkL9lbvMQ — ANI (@ANI) August 15, 2026
या बातमीत जोडलेला व्हिडीओ हा 'एएनआय'चा आहे. या व्हिडीओत 'वंदे मातरम्' सुरू असताना काँग्रेस मुख्यालयात झालेल्या घडामोडी दिसत आहे. सावधान स्थितीचे उल्लंघन कोणी केले हे स्पष्ट दिसत आहे. यामुळे आता कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी सोशल मीडिया युझर करू लागले आहेत.
कायदा काय सांगतो ?
राष्ट्रीय सन्मान (सुधारणा) अधिनियम, २०२६ चे राष्ट्रपतींच्या सहीने कायद्यात रुपांतर झाले आहे. या कायद्यानुसार 'वंदे मातरम' गाताना हेतुपुरस्सर व्यत्यय आणणे किंवा अडथळा निर्माण करणे हा शिक्षेस पात्र गुन्हा आहे.
या कायद्याद्वारे, 'वंदे मातरम' साठी तीच तरतूद लागू करण्यात आली आहे, जी पूर्वी केवळ 'जन गण मन' साठी उपलब्ध होती.
या कायद्याच्या कलम ३ मध्ये राष्ट्रगीतासंदर्भात आधीच अशी तरतूद आहे की, ते हेतुपुरस्सर थांबवल्यास किंवा ते गायले जात असलेल्या सभेत व्यत्यय आणल्यास, पहिल्या वेळेस ३ वर्षांपर्यंत शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
या गुन्ह्यासाठी दुसऱ्यांदा दोषी ठरल्यास किमान एक वर्षाची शिक्षा आहे. नवीन सुधारणेनुसार, 'वंदे मातरम' गायनात अडथळा आणल्याबद्दल दोषी ठरल्यास तीच शिक्षा होऊ शकते.






