पुणे : पुण्यात राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शनिवारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. "हा कार्यक्रम 'छात्रों की गूंज' नसून 'पैशांची गूंज' आहे," असा टोला लगावत भाजपने असा आरोप केला की, गर्दी जमवण्यासाठी आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काँग्रेसने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिले आहेत. दुसरीकडे, काँग्रेसने भाजपच्या या आरोपांचा खरपूस समाचार घेत, तरुण पिढीचा राहुल गांधींना मिळणारा पाठिंबा पाहून भाजप घाबरल्याचा दावा केला आहे. (Navnath Ban)
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी आरोप केला की, पुण्यातील कार्यक्रमाचा प्रचार करण्यासाठी आणि प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सना ३०,००० ते ३५,००० रुपये दिल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. जर ३,००० लोकांना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये दिले गेले, तर या कार्यक्रमावर जवळपास ९ ते १० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. "हा पैसा नेमका कुठून आला? तो कोणी दिला आणि कोणामार्फत वाटला गेला?" असा सवाल करत बन यांनी या निधीच्या स्रोताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. (Navnath Ban)
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये म्हणाले की, "हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर नसून राहुल गांधींची स्वतःची राजकीय लढाई आहे. केंद्र सरकारविरोधात एकही ठोस मुद्दा न मिळाल्याने राहुल गांधी वेगवेगळे राजकीय प्रयोग करत आहेत, पण जनता त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही." (Navnath Ban)






