Sunday, August 30, 2026

मंगलतीर्थ

मंगलतीर्थ

भालचंद्र ठोंबरे

निमिषारण्यात जमलेल्या अनेक ऋषीमुनींना सुतांनी अनेक तीर्थक्षेत्रांची माहिती व महत्त्व सांगितल्याचा उल्लेख स्कंद पुराणात आहे. स्कंद पुराणानुसार प्रभू रामचंद्रांनी माता सीतेला सोडविण्यासाठी, लंकेवर आक्रमण करण्यासाठी रामसेतू बांधला. रावणाचा वध करून सीतेला मुक्त केले; परंतु प्रभू रामचंद्रांनी माता सीतेला तिचे सतित्व निष्कलंक असल्याचे सिद्ध करण्यास सांगितले. सीतेने सर्वांसमोर अग्निपरीक्षा दिली, म्हणजे अग्नीत प्रवेश करूनही सुखरूपपणे बाहेर पडून आपले सतित्व निष्कलंक असल्याचे सिद्ध केले. तसेच त्या ठिकाणी सीतेने आपल्या नावे एक तीर्थ निर्माण केले. त्याला सीताकुंड अथवा सीता सरोवर असे म्हणतात. सामान्य प्रजाजनांच्या कल्याणासाठी निर्माण केलेल्या या तीर्थात स्नान केल्यास भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. रामसेतू असलेल्या सभोवतालच्या भागात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. यातच सीतातीर्थ व मंगलतीर्थ असल्याचा उल्लेख आहे.

पूर्वी मनोजव नावाचा एक राजा होता. प्रारंभी राजा अतिशय सदाचारी व धार्मिक वृत्तीचा होता. मात्र पुढे त्याला गर्वाने पछाडले. तो प्रजेवर विविध प्रकारचे कर लावून जबरदस्तीने वसुली करू लागला. त्यामुळे प्रजेत असंतोष पसरला. या असंतोषाचा फायदा घेऊन त्याच्या शेजारच्या गोलभ नावाच्या राजाने मनोजवच्या राज्यावर स्वारी करून त्याला पदच्युत केले. पदच्युत झालेला मनोजव आपल्या कुटुंबासह रानावनात भटकू लागला. एकदा अतिश्रमाने तो मूर्च्छित पडला. त्याच वेळी ऋषी पाराशर तेथे आले असता राणीने सर्व परिस्थिती कथन केली. ऋषींनी राजाला शुद्धीवर आणले. राजा-राणीने त्यांना नमस्कार करून संकटमुक्तीचा मार्ग विचारला. पाराशर ऋषींनी त्याला जवळच असलेल्या मंगलतीर्थात स्नान करून रामनामाचा जप करण्याची सूचना केली.

मनोजव राजाने पाराशर ऋषींच्या सांगण्यानुसार मंगलतीर्थात सपत्नीक स्नान केले व रामनामाचा जप आरंभिला. काही दिवसांनी राजासमोर एक दिव्य रथ, विविध शस्त्रे तसेच धनुष्यबाण व न संपणारा अक्षय भाता प्रकट झाला. त्या रथात आरूढ होऊन मनोजव राजाने आपले राज्य जिंकणाऱ्या गोलभ राजाला युद्धाचे आव्हान केले व त्यास पराभूत करून आपले गेलेले राज्य व वैभव पुन्हा प्राप्त केले. आपल्या कुटुंबीयांसह अनेक वर्षे सुखाने राज्य करून वृद्धपणी मनोजवाने आपल्या पुत्राकडे राज्यकारभार सोपवला व त्याने वानप्रस्थ स्वीकारला. पुन्हा एकदा मंगलतीर्थात स्नान करून त्याने शिवाची आराधना केली. या तपश्चर्येच्या प्रभावाने त्या दोघांनाही शिवलोक प्राप्त झाल्याचा उल्लेख स्कंद पुराणात आहे. रामेश्वर व रामसेतू परिसरातील एकांत राम मंदिराजवळ असलेले हे तीर्थ मंगलतीर्थ म्हणून ओळखले जाते, अशी मान्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा