Tuesday, September 1, 2026

Eknath Shinde : ७.८ टक्के जीडीपी वाढ देशाच्या प्रगतीचे द्योतक!

Eknath Shinde : ७.८ टक्के जीडीपी वाढ देशाच्या प्रगतीचे द्योतक!

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत

मुंबई : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि अनेक अर्थव्यवस्थांवर त्याचा परिणाम होत असताना भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के जीडीपी वाढीसह मजबूतपणे पुढे जात आहे. ही देशाच्या आर्थिक प्रगतीची आणि स्थैर्याची सकारात्मक बाब असून, विकसित भारत २०४७च्या संकल्पाच्या दिशेने भारताने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केले. (Eknath Shinde)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असून, पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी देशाची वाटचाल सुरू आहे. या प्रवासात महाराष्ट्र सरकारही आपले मोठे योगदान देईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. जगातील काही देशांमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर मोठा परिणाम झाला आहे. अशा प्रतिकूल जागतिक परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के दराने वाढत असल्याचे चित्र निश्चितच आश्वासक आहे. भारताची आर्थिक ताकद वाढत असल्याचा हा महत्त्वाचा संकेत असल्याचे शिंदे म्हणाले. (Eknath Shinde)

देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असताना त्याचा अभिमान सर्वांनी बाळगला पाहिजे. मात्र, देशाच्या प्रगतीचे अभिनंदन करण्याऐवजी विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील राजकीय आकसापोटी देशाच्या प्रगतीकडेही नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याची टीका त्यांनी केली. पंतप्रधानांकडून नागरिकांना करण्यात येणारे आवाहन हे देशाच्या हितासाठी, देशाच्या उत्थानासाठी आणि प्रगतीसाठी असते. मात्र, विरोधक या आवाहनांकडेही राजकीय दृष्टिकोनातून पाहत असल्याचे शिंदे म्हणाले. देशाची प्रगती होत असताना प्रत्येक भारतीयाने त्याचा अभिमान बाळगायला हवा. देशाच्या प्रगतीवर टीका करण्याऐवजी ती आणखी वेगाने कशी होईल, यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Eknath Shinde)

भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या २०४७च्या संकल्पाच्या दिशेने देश पुढे जात आहे. पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांना महाराष्ट्र सरकारकडून पूर्ण सहकार्य केले जाईल. महाराष्ट्र देशाच्या आर्थिक विकासात आपली भूमिका अधिक बळकट करेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भारताची आर्थिक प्रगती ही केवळ सरकारची नव्हे, तर १४० कोटी भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. देशाच्या प्रगतीला विरोध करणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. (Eknath Shinde)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >