Thursday, September 10, 2026

Minister Nitesh Rane : संजय राऊतांनी आधी मालकाच्या 'लंडन' दौऱ्याचा हिशोब द्यावा - मंत्री नितेश राणे यांचा टोला; ‘मातोश्री’ची तिसरी शाखा लंडनमध्ये

Minister Nitesh Rane : संजय राऊतांनी आधी मालकाच्या 'लंडन' दौऱ्याचा हिशोब द्यावा - मंत्री नितेश राणे यांचा टोला; ‘मातोश्री’ची तिसरी शाखा लंडनमध्ये

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यावर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना लंडनमध्ये बोलावून सत्कार केला जात असेल तर त्याचा महाराष्ट्र म्हणून अभिमान वाटायला हवा. वैयक्तिक द्वेषातून टीका करण्याऐवजी राऊत यांनी त्यांच्या ‘मालकां’च्या लंडन-दावोस दौऱ्यांचा हिशोब महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असा टोला राणे यांनी लगावला.

शिंदे यांच्या लंडन दौऱ्याला ‘विरंगुळा’ म्हणत संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ देत राणे यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला. ‘मातोश्री’ची तिसरी शाखा लंडनमध्ये असल्याचे ऐकिवात आहे, तिच्याबाबतचा हिशोबही महाराष्ट्राच्या जनतेला कधीतरी मिळायला हवा, असा टोला त्यांनी लगावला. राऊत यांचे ‘मालक’ लंडनला किंवा दावोसला जात होते, तेव्हा त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचे, असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना लंडनमध्ये बोलावून त्यांचा सत्कार होत असेल, तर त्याचे कौतुक करण्याऐवजी वैयक्तिक द्वेषातून टीका का करायची? शिंदे हे लंडनला जाऊन तुमच्यासारखी महाराष्ट्राची प्रतिष्ठा कमी करणारे कृत्य करीत नाहीत, असेही ते म्हणाले.

भाजपच्या बुद्धिजीवी आघाडीशी संबंधित यादीवर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही राणे यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपकडून देश घडविण्यासाठी आणि राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत बुद्धिजीवींना व्यासपीठ दिले जात असेल, तर त्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार विरोधकांना आहे का, असा सवाल त्यांनी केला. अर्थखाते मिळावे यासाठी सुनेत्रा पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याच्या प्रश्नावर राणे यांनी ‘ही माहिती कुठून आली?’ असा प्रतिप्रश्न केला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याच्या विकासाला पदापेक्षा अधिक महत्त्व देत काम करीत आहेत. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी तरुण पत्रकारांनीही सरकारला साथ आणि मार्गदर्शन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सरकार मराठा समाजाच्या पाठिशी

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याबाबत उदय सामंत यांनी दिलेल्या संदेशाच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकार हिंदू समाजातील सर्व घटकांच्या पाठीशी सक्षमपणे उभे असल्याचे ते म्हणाले. मराठा, ओबीसी, धनगर तसेच १२ बलुतेदार आणि १८ पगड जातींना सोबत घेऊन राज्याचा विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे राणे यांनी सांगितले. मराठा आंदोलकांवरील प्रकरणांची तपासणी करून ती मागे घेण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता आणि सरकार तो शब्द पाळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व समाजांनी सरकारसोबत वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >