Thursday, September 17, 2026

Marathwada Liberation War Day : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात; मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे आणि कोकणातील पाणी आणणार- मुख्यमंत्री फडणवीस

Marathwada Liberation War Day : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात; मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे आणि कोकणातील पाणी आणणार- मुख्यमंत्री फडणवीस
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण, मानवंदना आणि हुतात्मा स्मारकास अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विविध लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Marathwada Liberation War Day)
मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी  (Devendra Fadnavis) मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा शब्द दिला. कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त 30 टीएमसी पाणी भीमा खोऱ्यातून मराठवाड्यात आणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच कोकण आणि उल्हास खोऱ्यातील तब्बल 70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याची योजना आखली जात आहे. आगामी 7 वर्षांत ही कामे पूर्ण करून पुढील पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना पूर्ण मदत आणि कर्जमुक्ती
यंदा पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर 5 ऑक्टोबरनंतर पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना त्वरित मदत पुरवली जाईल. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत 15 लाखांहून अधिक शेतकरी कर्जमुक्त झाले असून, 48 हजार कोटी रुपयांची जुनी वीजबिले रद्द करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधा
छत्रपती संभाजीनगरमधील शेंद्रा-बिडकीन (Maharashtra News) औद्योगिक वसाहत देशातील प्रमुख केंद्र बनत आहे. टोयोटा आणि जेएसडब्ल्यू सारख्या कंपन्यांमुळे हे क्षेत्र ई-व्हील मॅन्युफॅक्चरिंगचे हब बनेल. उद्योगांसाठी आणखी 8 हजार एकर जागा अधिग्रहित केली जात आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांचे रस्ते प्रकल्प आणि जालना ड्रायपोर्टचे काम वेगाने सुरू आहे. सोबतच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करून प्रत्येक घरी रोज पाणी दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सर्व घटकांच्या जीवनात परिवर्तन मराठवाडा हा आकांक्षी प्रदेश आहे. अनेक अडचणींचा सामना करणारा प्रदेश आहे. सगळ्यांना सोबत घेऊन मराठवाड्याला विकासाच्या वाटेवर आणण्याचे आणि परिवर्तित करण्याचे कार्य आपण सुरू केले आहे. समाजातल्या सर्व घटकांच्या पाठीशी उभं राहून त्यांना शिक्षण, रोजगार, आरोग्य सुविधा देऊन त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तनआणण्याचा प्रयत्न सुरु आहे,असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >