भाजपकडून “सोनार बांग्ला” घडवण्याचा व्यक्त केला निर्धार
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला अवघे 13 दिवस उरले असताना भाजपने आज, शुक्रवारी कोलकाता येथे आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या जाहीरनाम्याचे प्रकाशन करत त्याला “भरोसा पत्र” असे नाव दिले.
अमित शहा यांनी सांगितले की, भाजप सरकार आल्यास थकित महागाई भत्ता देण्यात येईल आणि सत्तेत आल्यानंतर 45 दिवसांच्या आत सातवे वेतन आयोग लागू केले जाईल. तसेच आयुष्मान भारतसह सर्व केंद्रीय योजना पश्चिम बंगालमध्ये लागू केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे म्हटले की, घुसखोरीवर “झिरो टॉलरन्स” धोरण राबवले जाईल आणि सीमा पूर्णपणे सील करण्यात येतील. यासोबतच गायींच्या तस्करीवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.याशिवाय, राज्यात एक कोटी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच पुढील 6 महिन्यात समान नागरी कायदा लागू करण्याचेही वचन त्यांनी दिले. पश्चिम बंगालमध्ये बदलाची गरज असून लोक आता नव्या दिशेने विचार करत असल्याचे शाह यांनी यावेळी सांगितले.






