Nashik : हरिहर गड (Harihar Fort) हा नाशिक जिल्ह्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि थरारक गिरिदुर्ग आहे. हा किल्ला त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) रांगेत असून, खडकात कोरलेल्या त्याच्या ८० अंश तीव्र उताराच्या पायऱ्यांसाठी हा जगभरात ओळखला जातो. पावसाळयानंतर तर हा गड हिरवाईने नटलेला असतो, अशावेळेस पर्यटक याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मात्र आता या चित्तथरारक उभ्या पायऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक हरिहर गडावर (Harihar Fort) प्रशासनाने पर्यटकांना पुन्हा एकदा प्रवेशबंदी लागू केली आहे.
हरिहर गडावर पर्यटकांना प्रवेशबंदी
वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर संपत देवकर (Shekhar Sampat Devkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात गडाच्या खड्या पायऱ्या अत्यंत निसरड्या होतात. दाट धुके, अचानक बदलणारे हवामान आणि जोरदार पावसामुळे अपघाताचा मोठा धोका असतो. तसेच क्षमतापेक्षा जास्त गर्दी होणे, पर्यटक (Tourist) वनक्षेत्रात हरवणे आणि तरुणांकडून होणारी हुल्लडबाजी वा धोकादायक सेल्फीचे प्रकार यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हरिहर गडावर पुन्हा एकदा पर्यटकांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. त्र्यंबक प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने (Trimbak Regional Range Forest Officer) बुधवारी (दि. १९) अधिकृत आदेश जारी केला आहे.
प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन
या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी त्र्यंबक वनपाल, मेटेउभाडे वनरक्षक, संयुक्त वन व्यवस्थापन समिती (हर्षवाडी) आणि कळमुस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंचांना निर्देश दिले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत गड पर्यटनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत सर्व पर्यटकांना हरिहर गडाकडे न जाण्याचे आणि प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे.






